13/05/2026
✽ श्रींचे मंदिरात खरी शांतता अवतरली ✽
दिनांक ११/०५/२०२६ ला श्री ग.म संस्थान,शेगांव द्वारे मोबाईलवरील निर्बंधांमुळे खरंतर आता श्रींचे मंदिरात पुन्हा एकदा शांतता, प्रसन्नता आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळत आहे मंदिर परिसरात काही वर्षांपासून हरवलेली शांतता पुन्हा अनुभवायला मिळत आहे. कुठेही अनावश्यक गोंधळ नाही, मोठ्या आवाजातील बोलणे नाही आणि जणू श्री महाराज अवतीभवतीच आहेत अशी दिव्य अनुभूती भक्तांना मिळत आहे. श्रींचे दर्शन घेताना मंदिर स्वर्गाहून अधिक शांततेचे स्थान वाटत आहे.
परंतु गेल्या १–२ वर्षांमध्ये या गोष्टी खूप वाढल्या होत्या — श्रींचे मंदिरासोबत स्वतःचे व्हिडिओ काढून रिल्स स्टार बनणे, सेल्फी काढणे, ग्रुप फोटो घेणे या गोष्टी मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. अनेक वेळा काही मंडळींना आपण मंदिरात आहोत याचेही भान राहत नव्हते आणि मंदिरातील पवित्र व शांत वातावरण हरवत चालल्याचे जाणवत होते.
श्रींचे मंदिर हे श्रद्धा, शांतता आणि अनुभूतीचे स्थान आहे; स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नाही. मोबाईलच्या पडद्यामधून बाहेर येऊन शांत मनाने श्रींचे दर्शन घेतल्यावर खरी आध्यात्मिक अनुभूती काय असते हे जाणवते.
श्री गजानन महाराज संस्थान,शेगांव
श्रींचा पालखी सोहळा