27/08/2026
(३२)
*किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा |*
*येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगाः सुखानिच ||३२||*
श्लोक बात्तिसवा..!🌺
हे गोविंदा, ज्यांच्यासाठी हे युद्ध जिंकायचे,राज्य स्थापन करायचे तेच सारे या रणांगणात समोर उभे आहेत.मग मला,आम्हाला त्या राज्याचा,सुखाचा,उपभोगाचा काय उपयोग आहे..?
कथार्थ -- अर्जुन इथे श्रीकृष्णाला गोविंद ह्या नावाने आवाहन करतो आहे.सर्व प्राणिमात्रांच्या इंद्रियांना तसेच गोमातेला सुख देणारा,पालन करणारा म्हणजे गोविंद होय.
सुखाची निर्मिती,सुखाचे संस्करण,अनुकरण घडवून आणणारा हा कृष्ण म्हणजेच गोविंद.
या सुखाचा अधिपती असलेल्या कृष्णा,हे युद्ध जिंकून,सर्वतोपरी याच लोकांचा नाश माझ्याकडून करवून मला तू सुख मिळवून देणार असशील तर त्या सुखाची अभिलाषा मी कशी करावी..?या साऱ्या नाशाला कारणीभूत मी होऊन ते सुख मला आनंद कसे देईल..?
वास्तविक सुख ही वैयक्तिक अनुभव अवस्था आहे.पण ती इतरांना दाखवणे किंव्हा त्याचे प्रदर्शन करणे,साजरे करणे यात मनुष्याला स्वारस्य जास्त असते.खऱ्या सुखाचा एकांतात अनुभव घेणे हे मनुष्याला शक्यतो आवडत नाही.प्रदर्शन करणे या मनुष्य सवयी प्रमाणे अर्जुनालाही हाच प्रश्न पडला आहे.युद्ध करून राज्य मिळवणे हा केवळ जय पराजयाचा विषय नसून हा संघर्ष न्याय अन्याय,पाप पुण्य या मधला आहे हे या मोहामुळे अर्जुन विसरू लागला आहे.
श्रीकृष्णार्पणमस्तु..!!
©प्रवीण मुकुंद कुलकर्णी
श्रीसमर्थ सेवा मंडळ,सज्जनगड
९८२२६३५९०२