20/05/2016
||जय गुरू||
|| जय गुरु ||
दि. २० मे २०१६,
आज वैशाख शु. चतुर्दशी श्री नृसिंह जयंती या दिवशी श्री सद्गुरू जंगली महाराज यांच्या #रेठरे_हरणाक्ष या गांवतील मठातील भंडाऱ्याचा मुख्य दिवस .
श्री सद्गुरू जंगली महाराज हे श्री क्षेत्र नरसोबची वाडी येथून जवळ असणाऱ्या जिल्हा इस्लामपूर तालुका वाळावा येथे असणाऱ्या रेठरे हरणाक्ष या गावी स्थानिक गांवकरी लोकांकडून महाराजांना बोलवणे करण्यात आले. महाराज गावी आल्या नंतर कृष्णा नदीच्या तिरावर असणाऱ्या "श्री क्षेत्र पशुपतीनाथ मंदिरात "वास्तव्य करीत येथे महाराज साधना करीत.मंदिराच्या शिवलिंगा लगत एक छोटे गर्भगृह असून महाराज येथेच साधना करीत. पुढे गावकारी भक्तानी महाराजांसाठी मठ बांधला महाराज या मठात वास्तव्य करात असे. महाराजांचे रेठरे गावावर व येथील भक्तांवर नितांत प्रेम होते. मठावरुन जाता येता लहान मुले स्त्री-पुरुष त्यांचा आशिर्वाद घेऊन पुढे जात असत . आपपर भाव त्यांनी कधीच मनात ठेवला नही. जातीयवाद नष्ट करून एकोपा सलोखा साधला . गरीब श्रीमंत असाही भेद कधी बाळगला नाही. महाराजांचे कुठलेही कार्य सर्वजण खांद्याला खांदा लावून करीत. रेठऱ्यातील सर्व जाती जमातीची व सर्व थरातील मंडळी महाराजांचे भक्त होते. गांवतील बहुतेक पहिलवान मंडळी महाराजांचे शिष्य होते . सर्वांवर महाराजांचे सारखेच प्रेम करीत तेथील व आजूबाजूच्या गावातील अनेकजण भजनी - पूजनी लागलेली होते .
रेठरे गावी महाराजांचे कृपांकित भक्त होते. यातील एक विख्यात शाहीर तमासगीर व लावण्यांचे रचनाकार कै. पठ्ठे बापूराव हे होते .महाराजांना आपल्या लावण्या , वघ , संवाद वगैरे गोष्टी न चुकता दाखवून त्यांचे मार्गदर्शन घेत. महाराजांना कवित्व करण्याचा विलक्षण छंद होता व हे साहित्याचे एक मोठे रसिक महाभाग होते त्यामुळे बापूरावाना भरपूर मार्गदर्शन मिळत असे. याच प्रमाणे महादेव वडगावकर हे रेठरेकर मोरे घराण्याचे जावई होते. ते एक नामवंत पैलवान होते ते महाराजांच्या मठात राहत असत . महादेव वडगावकर व रामपुरचे सिदू नाईक हे दोघे महाराजांचे अत्यंत आवडते भक्त होते. महाराज आपल्या शिष्य गणामध्ये फार रमले होते. येथेच समाधी घेणार असल्याचेही आपल्या निकटवर्ती भक्त मंडळीत ते बोलले होते. पण एका दुर्दैवी घटनेमुळे महाराजांनी आपले विचार बदलला . प्रिय शिष्य महादू वडगावकर याचा आपसातील वैमनस्यामुळे शेतात रात्रीच्या वेळी खून झाला. "आज शेतात गेला नाहीस तर चालणार नाही का ? " असे महाराजांनी त्यास सुचविले होते . पण त्याकडे दुर्लक्ष केले व वैऱ्यांनी ही संधी साधली व त्यचा शेवट केला. या अमानुष घटनेमुळे महाराज अती व्यथित झाले. या हृदयद्रावक घटनेची आठवण नको म्हणून त्यांनी आपला हा अत्यंत प्रिय परिसर सोडून ते देहू , पुणे, भांबुर्डे या ठिकाणी संचारार्थ गेले.
दर वैशाख पौर्णिमेस महाराज मोठी यात्रा भरवीत . या भंडारा म्हणत . या भांडाऱ्याचे वेळी मोठमोठ्या कहिलींमध्ये गव्हाची खीर शिजवून ती प्रसाद म्हणून सर्वाना पोटभर वाढली जाई . दुपारच्या प्रहारा नंतर कुस्त्यांचा मोठा फड होत असे . महाराजांनी घालून दिलेले ही प्रथा आजही चालू आहे. श्री सद्गुरू जंगली महाराज भांबुर्डे, पुणे येथे समाधिस्थ झाले. नंतर पुढील काळात वैशाख शु . चतुर्दशी श्री नृसिंह जयंती या दिवशी रात्री मठातील पादुका पालखीत ठेवून मिरवणूक काढण्यात येते व मध्य रात्री मंदिरात संदल,गलफ(महाराजांच्या समाधी वरील वस्त्र),फुलाची जाळी, हार अशी पूजा करून आरती करण्यात येते . या मिरवणुकीत पुणेकर व इतर ठिकाणी असणाऱ्या महाराजांच्या सर्व मठांच्या भक्ताचा सहभाग असतो. या पालखी मिरवणुक सोहळ्यात श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ ,भांबुर्डे पुणे.
श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ , रेठरे हरणाक्ष हे मुख्य मानकरी असतात .