01/03/2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या ‘ज्ञानोबा ते तुकोबा’ या तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात, बीजभाषण करताना स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी संतपरंपरेविषयी एक मांडणी केली. त्यांच्या मते, संतपरंपरेत दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ असून, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्ये तर नामदेव महाराज व तुकाराम महाराज यांच्या गाथा या संकलन असल्यामुळे त्या स्वतंत्र ग्रंथ मानता येत नाहीत.
या मांडणीशी वारकरी विद्यार्थी म्हणून मी नम्रपणे असहमती नोंदवू इच्छितो.
समर्थ रामदास स्वामींचे वाङ्मयीन कर्तृत्व उच्च असून, दासबोध हा मराठी तत्त्वचिंतनाचा महत्वाचा ग्रंथ आहे मात्र समर्थांचे मोठेपण अधोरेखित करण्यासाठी इतर संतांच्या ग्रंथपरंपरेचे स्वतंत्रत्व नाकारणे आवश्यक नाही. उलट, अशा विधानांमुळे समर्थांचेच विचारविश्व अनावश्यक वादाच्या भोवऱ्यात सापडते. समर्थांना जितके त्यांच्या विरोधकांनी अडचणीत आणले नाही, त्यापेक्षा अधिक त्यांच्या अतिउत्साही समर्थकांनी अशा तुलनात्मक विधानांद्वारे आणले आहे, असे वाटते.
ज्ञानेश्वरी हा ‘श्रेष्ठ ग्रंथ’ असल्याचे संत नामदेव महाराजांनी साडेसातेशे वर्षांपुर्वीच सांगितले आहे. त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांच्या गाथेला संत बहिणाबाई ‘तुकारामवेद’ म्हणतात. अशा ग्रंथांचे स्वतंत्र ग्रंथत्व नाकारणे ही संतपरंपरेच्या आत्म्याशी विसंगत भूमिका ठरते. याहून पुढे जाऊन पाहिले, तर किमान अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी हे स्वतंत्र ग्रंथ नाहीत का ?
या विषयी स्पष्ट, शास्त्रीय आणि संतपरंपरेशी सुसंगत उत्तर परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरी महाराजांनी द्यावे, अशी अपेक्षा आहे. कारण हा प्रश्न केवळ ग्रंथांच्या व्याख्येचा नसून, महाराष्ट्राच्या संतपरंपरेच्या बौद्धिक स्वायत्ततेचा आहे.
Swami Govindadev Giri