12/08/2026
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*बारभाई गिरीश गुरुजी खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो ९८५०६४०३७४ ९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्रावण हा व्रत-वैकल्यांचा महिना असून, श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अगदी वेगवेगळे आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पती पूजनानंतर श्रावणी शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन केले जाते. जिवतीची पूजा, शुक्रवारची कहाणी आणि जिवतीची आरती यांबाबत जाणून घेऊया...
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
*जिवतीची पुजा शुक्रवार श्रावण पहिला शुक्रवार दि. 14/8/२6 रोजी करावी
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️
श्रावण सगळ्या सृष्टीचे सौंदर्य ओंजळीत घेऊन येतो. श्रावण अधिकच जवळचा वाटतो तो माहेरवाशिणीला. व्रतवैकल्य, मंगलमय वातावरण यांचा मेळ साधणाऱ्या श्रावणात शिवपूजनाला अत्यंत महत्त्व आहे. स्त्रिया उपवास, व्रते, उपासना, नामस्मरण करतात. धार्मिक पथ्ये पाळतात. अशा श्रावणातल्या निसर्गाने ओंजळीत न मावेल इतके दिल्यावर ते उत्साहाने इतरांशी वाटून घ्यावे, हा संदेश देण्यासाठीच श्रावणातील सण आणि व्रतवैकल्ये साजरी केली जातात. श्रावण महिना सुरू झाला की देवघराजवळ जीवतीचा अथवा जिवंतिकेचा कागद चिकटवला जातो
✨जिवतीची पूजा✨
जरे जीवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनी। रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोस्तुते।।, असा श्लोक जिवतीची पूजा करताना म्हटला जातो. श्रावणातल्या चारही शुक्रवारी जिवतीची पूजा करतात. ही पूजा संततीरक्षणार्थ मानली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी, असे सांगितले जाते. या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. या तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. यासह २१ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र घालावे. गंध, अक्षता वाहाव्यात. धूप, दीप अर्पण करावे. साखरेचा, चणे-फुटाण्यांचा आणि पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर आरती करावी. जिवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे. मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल. त्या दिवशी देवीची ओटी भरावी.
देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा.सवाष्णीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी.जेवावयास बसण्यापुर्वी पानापुढे विडा दक्षीणा ठेवून नमस्कार करावा. जेवण झाल्यावर सवाष्णीची खणा-नारळाने ओटी भरावी.
जिवंतिका पूजनामुळे घरात, आरोग्य, धन, सुख लाभते
✨श्रावण महिन्यातील कहाणी जिवतीची✨
एक आटपाट नगर होते. तिथल्या राजाला मूल नव्हते. सर्व सुखे हात जोडून उभी असली तरी त्याचा जीव रमत नव्हता. राणी कष्टी होती. ती सारखी आसवे ढाळी. माझी कूस उजव म्हणून देवाला विनवी. पण तिची व्यथा संपली नाही. मग तिने एका सुइणीला बोलावले. म्हणाली , ' मला कोणाचे तरी नाळ-वारीचे मूल आणून दे. तुला सोने-नाणे देईन. ' सुइण कबूल झाली. राणीने गरोदरपणाचे सोंग केेले. नऊ मास पूर्ण होत आले असता गावातील एक ब्राह्माणी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. सुइणीने तो नाळ-वारेसहीत राणीच्या कुशीत नेऊन ठेवला आणि ब्राह्माणीला म्हणाली की बये , तुला वरवंटा निपजला. इथे राजवाड्यात आनंदोत्सव साजरा झाला. राजाला जगण्यात अर्थ गवसला. राणीच्या कुशीत बाळाचा ट्यॅहा फुटला.
ब्राह्माणी मुलाच्या आशेने झुरू लागली. श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जिवतीची पूजा करू लागली. ' जिथे माझा बाळ असेल तिथे तो खुशाल असो ' म्हणत सर्व दिशांना तांदूळ उडवू लागली. ते तांदूळ राजवाड्यात राजपुत्राच्या अंगावर पडू लागले. ब्राह्माणीने हिरवे लुगडे , हिरव्या बांगड्या र्वज्य केेल्या. ती कारलीच्या मांडवाखालून जाईना. तांदुळाचे धुवण ओलांडीना. मुलगा मोठा झाला. राज्याचा राजा झाला. एक दिवस ब्राह्माणी त्याच्या नजरेस पडली. तिचे देखणे रूप पाहून त्याच्या मनात पाप उत्पन्न झाले. तिच्या दारातील वासराच्या शेपटीवर त्याचा पाय पडला. गाय वासराला म्हणाली , ' जो आपल्या आईची अभिलाषा धरायला कचरत नाही , तो तुझ्या शेपटीवर सहज पाय देईल. ' राजाला पश्चाताप झाला.
पुढे तीर्थयात्रा करून त्याने सर्व प्रजेला जेवायला बोलावले. ब्राह्माणीही तेथे आली. राजा पंक्तीत तूप वाढू लागला. तिच्या पानापाशी तो येताच तिला पान्हा फुटला आणि त्याची धार राजाच्या तोंडात उडाली. राजाला राग आला. पण त्याची राणीआई त्याला म्हणाली , ' बाळ , हीच तुझी खरी आई. ' राजा आईच्या पाया पडला. आई-वडिलांना वाडा बांधून दिला. जिवती त्या सर्वांवर प्रसन्न झाली.
अशी ही जिवतीची कहाणी.
आजही श्रावण आला की पहिल्या शुक्रवारी भिंतीवर केशराने अथवा गंधाने जिवतीचे चित्र काढतात. घराघरात भिंतीवर मुलालेकरांच्या गराड्यात रमलेल्या जिवतीचा कागद लावतात. पूजा करतात. तेरड्याआघाड्याची पानेफुले आणि दुर्वांची माळ करून देवीला घालतात. कणकेचे पाच दिवे करून देवीला ओवाळतात. ' माझे बाळ जिथे आहे त्या दिशेला मी अक्षता टाकतेय , हे जिवतीआई , तू त्याचे रक्षण कर. ' अशी मनोमन प्रार्थना करतात. पुरणावरणाच्या जेवणाने पुजेची सांगता करतात.
काळ बदललाय. जगणे बदलले. रोजचे संदर्भ बदलले. तरी आईची माया तशीच राहिली. ही माया आटत नाही तोवर जिवती प्रसन्नच राहणार. ती तशीच राहो ही तुम्हाआम्हा सर्वांची प्रार्थना. ती सुफळ संपूर्ण होवो.
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केल्या जातात व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?
✨✨✨✨✨✨✨✨
जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध - बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारण मिमांसा...
✨प्रथम भगवान नरसिंहचं का?✨✨✨✨✨✨✨✨
भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. हि कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात. म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी
त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो. म्हणजेच कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्हीदेव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान.
✨नंतर येतात त्या जरा व जिवंतिका ✨✨✨✨✨
जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्राकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी हि जरा देवी. जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात.
प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात ✨बुध व बृहस्पती ✨✨✨
बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते.
बुधाचं वाहन हत्ती - हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते.
बृहस्पतीचं वाहन वाघ - हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते.
म्हणूनच बुध - बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं.
प्रथम रक्षक देवता.नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता.
आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम.
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जिवती पुजन
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️
✨जिवतीची आरती✨
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।
श्रावण येतांचि आणूं प्रतिमा । गृहांत स्थापूनि करू पूजना ।
आघाडा दुर्वा माळा वाहूंया । अक्षता घेऊन कहाणी सांगू या ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। १ ।।
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️
पुरणपोळीचा नैवेद्य दावूं । सुवासिनींना भोजन देऊं ।
चणे हळदीकुंकू दूधहि देऊं । जमूनि आनंदे आरती गाऊं ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। २ ।।
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️
सटवीची बाधा होई बाळांना । सोडवी तींतून तूचि तयांना ।
माता यां तुजला करिती प्रार्थना । पूर्ण ही करी मनोकामना ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। ३ ।।
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️
तुझिया कृपेने सौख्य नांदू दे । वंशाचा वेल नीट वाढूं दे ।
सेवा हे व्रत नित्य घडूं दे । मनींचे हेतू पूर्ण होऊंदे ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। ४ ।।
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️
✨जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी।
रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते ।।✨✨✨✨✨
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️
*बारभाई गिरीश गुरुजी खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो ९८५०६४०३७४ ९४२१९००५०५*
🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩