05/07/2017
वारी नावाचं गेटटुगेदर.....!!!!!
- प्रियंका रमेश पाटील ....................................
दरवर्षी वारी आली कि चांगली कि वाईट यावर टिव्ही चॕनेल्स आणि फेसबुकवर चर्चा होतात. वारीचा राजकीय इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी तर वारीला मोठ्या प्रमाणावर जातीय रंग देण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. मग ते विठ्ठलाचं जानवं असो वा वारीत शिरलेले धारकरी असोत. मुळात वारी हि संकल्पना कुठुन सुरु झाली आणि तिचा उद्देश काय होता हा पायाच कुणी विचारात घेत नाहीत. वारीतल्या नियोजनाच्या अभावामुळे आणि होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळं अनेकांना वारी हा इव्हेंट waste of time and energy वाटतो.
पहिलं म्हणजे वारी ही राजकीय जातीय कधीच नव्हती. आणि या लोकांच्या हस्तक्षेपामुळं वारकऱ्यांवर फारसा परिणाम होईल असंही नाही. कारण वारीत येणारा समाज 90% हा फक्त श्रद्धाळु शेतकरी,कष्टकरी असतो. ते एक फार मोठ्ठ असं गेटटुगेदर असतं. आपल्याकडे हल्ली college reunion, school reunion, get together याचं प्रचंड प्रमाणावरती फैड निघालं आहे. तेव्हा वारीकडेही गेटटुगेदर या नजरेनं पाहिलं तर अनेक प्रश्न संपतील. हल्ली हल्ली आलेल्या fast and furious technology मुळं ही बाकिची गेट टुगेदर्स शक्य झालीत.त्याताही बऱ्याचदा miscommunication होऊन गैरसमज होतात. रुसवे फुगवे होतात. पण वारी जेव्हा सुरु झाली तेव्हापासून ते आजपर्यंत तिथं कुठल्याही प्रकारचं communication होत नाही. तिथं येणारे लोक हे कुणी जाहिरात करुन किंवा कुठल्याही आमिषाला भुलुन येत नाही. तिथं येण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष त्यांना पैसा पुरवत नाही. किंवा कुठल्याही प्रकारचा तो मोर्चा नसतो. वारी हा एकमेव प्रकार असा असावा ज्यावर कुठलाही राजकीय,जातीय,धार्मिक आणि प्रांतीय प्रभाव नाही. जे काही आहे ती फक्त श्रद्धा आहे. विठ्ठलही काही बाजारु देव अजुनतरी झाला नाही. त्याला तीन किलोची सोन्याची ताटं लागत नाहीत ना त्याचा प्रसाद विस रुपयला दोन लाडु असा मंदिर प्रशासना कडुन विकला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही कर्मकांड,नवस इथं होत नाहीत. विठ्ठलावर लिहिलेल्या अभंगामधून संतानी समाज प्रबोधनच केलंय.कुणी श्रमप्रतिष्ठा सांगितली तर कुणी आधी घर आणि मग देव सांगितलं. विठ्ठलाला कुठल्याही नवसात,कर्मकाडांत कुणी अडकवलं नाही. तो देव नसून राजा होता असंच कित्येकांनी सांगितलं. त्याला मित्र म्हणून संबोधलं. अनेक संत त्यांच्या अभंगातुन सामाजिक राग बाहेर काढताना विठ्ठलाला शिव्या देतानाही दिसतात. बाकिच्या सतत शापाच्या भितीत जगवणारा आणि काहीतरी देतो दर्शनाला या म्हणणारा विठ्ठल कुणीच चितारला नाही. काम करून, नाम करा म्हणणारा विठ्ठल सगळीकडे दिसतो आणि वारीतही हे तंतोतंत पाळलं जातं.शेतातली कामं सोडून कुठलाच वारकरी वारीला जात नाही हे न पटणारं सत्य आहे.योग्य ती व्यवस्था लावूनच वारकरी इथं येतात.
वारी हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणारं गेट टुगेदर आहे.कामं संपली कि नोकरवर्ग ट्रिप्स काढतो, गेटटुगेदर करतो. माणसाला कामं झाल्यावर विश्रांती हवी असते,मित्रांची भेट हवी असते अथवा एखादी ट्रीप तरी...वर्षभर कामं करून शेतकरी थकलेला असतो.त्याला एका चेंजची गरज असते.मनाला उभारी देणारं काहीतरी हवं असतं.कुणीतरी अनोळखी listener हवा असतो जिथं तो खुलून बोलेल. आणि कुठतरी विश्वासानं डोकं टेकावं किंवा कुशीत शिरावं असं ठिकाण हवं असतं.. आणि हे सगळं वारीत होतं.
कदाचित हे खुप भावनिक झालं असेल पण हे सगळं असतं वारीमागं...मोठमोठया बाजारपेठा तसंच अगदीच सामान्य बांगडीवाला याचं पोटं ही वारी सांभाळते. अखंड महाराष्ट्र आणि कर्नाटकातले लोक एकत्र येऊन भाषा कळो न कळो पण एकमेकांच्या पाया पडुन गळाभेट घेतात..यामागं फार मोठी भावना आहे.तिथं त्यांना आधार मिळतो.... पाया पडताना समोरचा महार मांग मराठा कुणबी चांभार असत नाही. माऊली असतो. एक वारकरी हीच त्याची ओळख असते. वारीच्या दरम्यान अनेक ओळखी होतात. गप्पा होतात. त्यांच्या त्यांच्या लेव्हलवर वैचारिक देवाण घेवाण होते. कोणत्याही कागदपत्रांशिवाय समोरचा फक्त वारकरी आहे एवढ्या शब्दाखातर व्यवहार होतात. आणि ते फसवणूकीशिवाय यशस्वी होतात. एक मोठी आर्थिक,सामाजिक आणि वैचारिक उलाढाल या वारीत होते.
गेटटुगेदरमध्ये फक्त भेटीची ओढ असणारेच येत नाहीत.कुणी स्वतःच्या आयुष्यात कसे मोठे झालो,श्रीमंत झालो याचा दिखावा करणारेही येतात तसंच वारीतही या हौश्या गवस्यांचं प्रमाण वाढतंय. वारीला अनेकांना फोटोग्राफी इव्हेंट केलाय आणि त्याचे जोक्सही फिरतायत. असो...वारी अनेकांच पैशन पुरं करते असं positively बघुत आपण. आपल्या बडेजावपणाचा दिखावा करण्यासाठी अनेक पुढारीही वारीच्या ग्लैमरचा उपयोग करून घेताना दिसतात. हे साईड इफेक्ट्स तर होणारच. वारी हा राजकीय इव्हेंट नव्हता,याला रुप दिलं जातंय पण याचं वारकऱ्याला घेणंदेणं नाही.त्याला त्यांच्या जाती धर्म प्रांत या भेदांव्यतिरिक्त सामावून घैऊन दोन दिवस तरी मनाला भारावून टाकणाऱ्या आणि बाकि टेन्शन्स विसरायला लावणाऱ्या गर्दीत रस आहे...वारकऱ्याला वारीनंतर कुठलाही पक्ष जॉईन करायचा नसतो. तो शेताकडे वळतो. त्यामुळं वारी पुर्णतः राजकीय अधिपत्याखाली यायला लागली तर मात्र वारकऱ्यांची संख्या कमी होऊन हौश्या गवस्यांची संख्या वाढेल यात शंका नाही.
मी काही देवाधर्मात रमणारी नाही पण घर वारकरी आहे.आजुबाजुचे लोक वारकरी आहेत आणि त्यांना वारीचं क्रेझ का आहे एवढं विचारल्यावर त्यांच्या अंगात उत्साह सळसळतो.भरभरून बोलतात ते वारीवर...कदाचित त्यासाठीच वारी असावी....,
बाकि चर्चा वगैरेंना शेतकरी काम बुडवून येणार नाहीतच.तिथं जाऊन काय डोक्याला खुराक लावावं म्हणतील.बघा ना,भारतात तशा चर्चा होत नाहीत का?? होतातच पण त्यांना शेतकरी हजेरी लावत नाही.कारण त्याला तिथं मान मिळत नाही ना समानता.तिथं चार अधिकारी,पुढारी, आणि तथाकथित प्रगतशील बागायतदार ज्याला कुदळ कि फावडं यातला फरक नीटसा कळत नाही असे लोक असतात...मातीतला शेतकरी नसतोच... शेतकऱ्यांचं एकमेव मनोरंजन, विश्रांती आणि रुटीन चेंज म्हणजे वारी असते...!!!!
हां आता नियोजनाचा अभाव आहे पण अनेक स्वंयसेवी संस्था सरकार काही तरी करेल याची वाट न बघता यात भाग घेतो. येणारा बहुसंख्य समाज अडाणी आहे तरी शिस्त बरीच पाळली जाते. कारण जे होतंय ते त्यांच्याच सोयीचं आहे एवाढी समज नक्कीच आहे. शिकलेल्या सिग्नलतोड बहाद्दरांपेक्षा खचितच जरा जास्त समज या अडाणी वारकऱ्यांकडे आहे. आणि ती शिस्त ते पाळताना दिसत आहेत.
तर वारी हे राज्यीय,आंतरराज्यीय गेट टुगेदर आहे.कुठल्याही तेढ निर्माण करणाऱ्या वादांच्या पलिकडचं. इथं खेळ होतात,गप्पा होतात,गाणी होतात, ट्रेकिंग होतं, camp fire होतं, टेंट मध्ये राहणं होतं, camp ला गेल्याचा फील येतो...... एकंदरीतच काय तर हा एक महामेळावा, mega get together आहे....!!!!!
.........
- Prie Patil.