श्री बाबांचा अल्प परिचय -
आपले सारे धर्मग्रंथ, वेद, शास्त्र, पुराणे केवळ एकाच शक्तीचे, चैतन्याचे अस्तित्त्व स्वीकार करतात व त्या शिवाय जे दृश्य जगत् आहे त्यांस भ्रांती, माया किंवा अज्ञान मानतात. तेच चैतन्य म्हणजे परमात्मा किंवा परब्रह्म, जे विश्वाचे संचालन करते, ते समयानुसार मनुष्यमात्रांच्या कल्याणासाठी भूतलावर अवतीर्ण होत असते. त्या मानवदेही परमात्म्यास आपण ‘संत’ म्हणून पुजितो.
आपल्या सर्वांच
े महत् भाग्य आहे की असेच एक महान संत, ‘बालयोगी श्री सदानंद महाराज’ आज तुंगारेश्वर पर्वतावर विराजमान आहेत. ज्यास जन्मतःच आत्मज्ञान प्राप्त आहे व जो निरंतर निर्विकल्प समाधीत लीन असतो त्यास ‘बालयोगी’ ही संज्ञा प्राप्त होते. धार्मिक आणि आध्यात्मिक संपत्तीने समृध्द अशा कुळात त्यांचा जन्म झाला. वयाच्या केवळ बाराव्या वर्षी (कोमल वयातच) घर-संसारास तिलांजली देऊन, आपल्या पूज्य माता-पित्याना सोबत घेऊन (आपल्या पुत्रासोबतच राहण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे) बाल सदानंद तुंगारेश्वर पर्वताच्या शिखरावर पोहोचला. ही भूमी भगवान परशुरामांच्या तपस्येने पुनित झालेली आहे. अशा तपोभूमीची सदानंदाने आपले निवासस्थान, आपली कर्मभूमी म्हणून निवड केली. अवतारांच्या प्रवृत्ती विषयी तर वेदांचेही मौनच आहे. तेव्हा या ईश्वरीय बालकाने २१०० फूट उंच पर्वतावर, घणघोर अरण्यात, तसेच हिंस्त्र श्वापदांच्या मुक्त संचार असलेल्या अशा या भूमीचीच निवड निवासासाठी का केली याचे आकलन साधारण मनुष्यास होऊ शकत नाही. श्री बाबा मानवजातीच्या उध्दारासाठी अहोरात्र अथक् परिश्रम करीत असतात. प. पू. बाबांचा तसेच त्यांच्या पूज्य माता-पित्यांचा परित्याग, निःस्पृहता अतुलनीय आहे. बाबांची राहणी अतिशय साधी आहे, ते पैशाला स्पर्श देखील करीत नाहीत.
श्री बाबांचा चेहरा सदैव स्मित हास्याने प्रफुल्लित असतो. त्यांच्या केवळ दर्शनमात्रानेच स्फूर्ति-प्रेरणा प्राप्त होऊन असंख्य भक्तांनी सन्मार्गाचा, नीति पंथाचा अवलंब केला. कित्येक भक्त तीव्र मुमुक्षु बनले. त्यांच्या वनौषधी उपचाराने अनेक रोगग्रस्त निरामय झाले. अनेकांची असाध्य, दुर्धर व्याधी दूर झाली. अनेकांना जीवनदान मिळाले. पूज्य बाबा श्री ज्ञानेश्वरीचा अर्थात भागवत धर्माचा प्रचार, प्रसार अव्याहत करीत असतात. श्री बाबांची ग्रंथराज ज्ञानेश्वरीची भव्य पारायणे संपूर्ण भारतभर होत असतात. परदेशात मॉरिशस, श्रीलंका आणि कॅनडामध्ये श्री बाबांनी पारायणे केली. गोरगरीब भक्तांना तीर्थ स्थानांचे दर्शन घडावे या हेतूने पूज्य बाबा अत्यल्प दरात यात्रांचे आयोजन करतात. लहान मुलांना चांगले संस्कार व्हावे, आपली संस्कृती कळावी, विद्या आणि कलेची जोपासना व्हावी म्हणून आश्रमात बालसंस्कार शिबिर भरवले जाते. श्री बाबा एक कठोर कर्मयोगी आहेत. साहजिकच ते असंख्य भक्तांचे, वारकरी बंधूंचे श्रध्दास्थान आहेत. त्यांचे जीवन गंगेप्रमाणे पवित्र, अखंड प्रवाहीत (कार्यरत) आहे. ते केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर सबंध भारताचे भूषण आहेत.
राम..!!