28/07/2026
*"गुरुपौर्णिमा आपण दरवर्षी साजरी करतो... तुम्हाला माहिती आहे का? सृष्टीचा कालचक्र हा गुरुपौर्णिमेला सुरू होतो ते? आणि कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? गुरु नेमके कोण आहेत? त्यांची सुरुवात कुठून झाली?*
*देव उठनी एकादशी आणि देवशयनी एकादशी ( योगनिद्रेत ) हे का महत्त्वाचे आहे. आणि ह्या अवस्था घडण्या पाठीमागे काय कारण आहे? ते*
*माझ्या साधना, चिंतन आणि अनुभूतीतून मला जाणवलेला एक सूक्ष्म आध्यात्मिक दृष्टिकोन आहे."*
*भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण हा केवळ उत्सव नसून, संपूर्ण सृष्टी, मन आणि जीवनाच्या निर्मितीचा एक टप्पा आहे. माझ्या चिंतनानुसार या संपूर्ण प्रवासाची सुरुवात निर्गुणातून होते. निर्गुण म्हणजे परब्रह्म. जिथे कोणताही आकार नाही, कोणतंही नाव नाही, पण सर्व काही अस्तित्वात येण्याची अनंत शक्यता आहे.*
*या निर्गुणातून सर्वप्रथम जे प्रकट होतं, ते म्हणजे गुप्त रूप. आणि माझ्या अनुभूतीनुसार हेच गुप्त रूप म्हणजे गुरुतत्त्व. गुरु म्हणजे केवळ एखादी व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण सृष्टीला दिशा देणारं पहिलं तत्त्व (परब्रह्म) . म्हणूनच गुरुपौर्णिमा ही केवळ गुरुंच्या पूजनाची तिथी नाही, तर निर्गुणातून प्रकट झालेल्या गुरुतत्त्वाच्या स्मरणाची आणि कृतज्ञतेची पर्वणी आहे.*
*आता हे एका साध्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा, आपल्या हातात एक फुगा आहे. फुगा स्वतःहून फुगत नाही. कोणीतरी त्यामध्ये श्वास भरतो. पण फुग्याकडे पाहणाऱ्याला तो श्वास दिसत नाही. त्याला फक्त फुगा दिसतो. प्रत्यक्षात मात्र फुग्याला आकार देणारं कार्य अदृश्यपणे आतून चालू असतं.*
*माझ्या अनुभूतीनुसार गुरुतत्त्वाचं कार्यही असंच असतं. ते गुप्त रूपाने प्रत्येक जीवामध्ये प्रेरणा निर्माण करत राहतं. आपण अनेकदा स्वतः विचार करतोय असं वाटतं; पण प्रत्यक्षात आपण इतरांना पाहूनच प्रेरित होत असतो. एखाद्याने नवीन गाडी घेतली, तर आपल्या मनात ही तशीच इच्छा निर्माण होते. एखाद्याने घर बांधलं, तर आपण ही तसंच स्वप्न पाहू लागतो. एखादा साधक साधनेत पुढे गेला, तर आपल्या ही मनात साधना करण्याची प्रेरणा निर्माण होते. हा प्रेरणेचा अदृश्य प्रवाह म्हणजेच माझ्या चिंतनानुसार गुरुतत्त्वाचं गुप्त कार्य आहे.*
*या गुप्त प्रेरणेनंतर गणेशतत्त्व प्रकट होतं, ते साक्षीभाव स्वरूपात. कारण कोणत्याही निर्मितीपूर्वी बुद्धी आणि विवेक आवश्यक असतो. त्यानंतर विष्णुतत्त्व जीवधारणेचा प्रवाह सांभाळतं. ब्रह्मतत्त्व निर्मिती घडवतं. महेशतत्त्व आवश्यक परिवर्तन आणि विसर्जन घडवतं. शक्ती तत्त्व (आधी माया नवरात्र उत्सव ) या संपूर्ण प्रवाहाला कार्यरूप देते. पुढे सप्तऋषी, विशेषतः महर्षी अत्री आणि माता अनसूया, या ज्ञान आणि पावित्र्याच्या संगमातून या प्रवासाला पूर्णत्वाकडे नेतात.*
*त्यानंतर पुन्हा काळ पुढे सरकतो. देवउठणी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागृत होतात ( राम जन्म दिवाळी ) . माझ्या चिंतनानुसार, जे सूक्ष्म स्वरूपात घडत होतं, ते आता नव्या प्रकट कार्यासाठी सज्ज होतं. जसा गर्भातील जीव योग्य काळानंतर प्रकट होतो, तसाच हा विश्वप्रवाह ही सतत सूक्ष्म आणि प्रकट अशा दोन अवस्थांमध्ये फिरत राहतो.*
*या सूक्ष्म प्रवासात सर्वप्रथम गुरुतत्त्व दिशा देतं. त्यानंतर क्रमाने विविध दैवी तत्त्वं कार्यरत होतात. हा प्रवास महिना न महिना पुढे सरकत राहतो. माझ्या चिंतनानुसार, हा प्रवास मार्गशीर्ष महिन्यात श्रीदत्तात्रेयांच्या जन्माने पूर्णत्वाला पोहोचतो. कारण ते संपूर्ण दैवी कार्य प्रवाहाचं प्रकट स्वरूप आहेत.*
*पण याच मार्गशीर्ष महिन्यात श्री मल्हारी मार्तंडांचं कार्यही मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. माझ्या अनुभूतीनुसार, श्रीदत्तात्रेय हे चैतन्याला दिशा देतात म्हणजे शरीर, तर मल्हारी मार्तंड मनाला धारण ( मन धारण ) करण्याची, संयमित करण्याची आणि धर्मासाठी उभं करण्याची शिवशक्ती जागृत करतात. म्हणून माझ्या चिंतनात दत्ततत्त्व आणि मल्हारी तत्त्व हे या कालचक्राचे परिपूर्ण टप्पे आहेत.*
*याच कारणामुळे भारतीय सणांचं कालचक्र मला अत्यंत अर्थपूर्ण वाटतं. माझ्या चिंतनानुसार, देवशयनी एकादशीला भगवान विष्णूंची योगनिद्रा ही निष्क्रियतेची नसून, पुन्हा नव्याने विश्वात एक सूक्ष्म प्रक्रिया सुरू होते. जीवधारणेच्या अदृश्य प्रक्रियेचं प्रतीक आहे. जे कार्य डोळ्यांना दिसत नाही, ते सूक्ष्म पातळीवर घडत असतं. म्हणूनच या काळात बाह्य विस्तारापेक्षा अंतर्मुख होण्याला अधिक महत्त्व दिलं गेलं आहे.*
*आणि हे संपूर्ण कालचक्र घडण्यामागे निसर्गही तितकाच महत्त्वाचा आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, ऋतू बदलतात, वातावरण बदलतं, आणि त्यानुसार साधनेचे, उत्सवांचे आणि अंतर्मुखतेचे काळही बदलतात. म्हणून भारतीय सण हे केवळ दिनदर्शिकेतील दिवस नाहीत; ते निसर्ग, सृष्टी आणि चेतनेच्या अखंड प्रवाहाशी जोडलेले आहेत.*
*म्हणून माझ्या अनुभूतीनुसार भारतीय सण वेगवेगळे नसून, ते मननिर्मिती, सृष्टीनिर्मिती आणि दत्तनिर्मिती या अखंड प्रवासाचे टप्पे आहेत.*
*या संपूर्ण प्रवासाची सुरुवात निर्गुणातून प्रकट झालेल्या गुरुतत्त्वापासून होते, आणि त्याचं प्रकट पूर्णत्व श्रीदत्तात्रेयांमध्ये अनुभवायला मिळतं. हेच माझ्या साधना, चिंतन आणि अनुभूतीतून मला जाणवलेलं सनातन कालचक्र आहे. 🙏🏻🚩*
*|| अवधूत चिंतन गुरुदेव श्री दत्त ||*
*॥ श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये ॥ 🙏🏻*