श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, रोडपाली

  • Home
  • India
  • NAVI MUMBAI
  • श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, रोडपाली

श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, रोडपाली Gurur Brahma Gurur Vishnu
Gurur Devo Mahesh Varah
Guru Shakshat Para Brahma
Tasmai Shri Guruve Namah

अहेर करतांना भाव कसा असावा ?‘अहेर’ म्हणजे हिरावून न घेता येणारी गोष्ट.आजकाल मोठमोठ्या महागड्या वस्तू एकमेकांना भेट म्हणू...
09/04/2026

अहेर करतांना भाव कसा असावा ?

‘अहेर’ म्हणजे हिरावून न घेता येणारी गोष्ट.

आजकाल मोठमोठ्या महागड्या वस्तू एकमेकांना भेट म्हणून देणे, यालाच अहेर समजतात; पण खरे पहाता अशा वस्तू देणे, हे भावनेपोटी केलेले कर्म आहे. अहेर हा दुसर्‍या जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीस पोषक असणारा, असा असावा. देवतांप्रती भक्तीभाव वाढवणारी देवतांची सात्त्विक चित्रे आणि नामजप पट्ट्या, ईश्वरप्राप्तीसाठी साधना शिकवणारे ग्रंथ, ही अशा प्रकारच्या अहेराची काही उदाहरणे होत.

अहेर करतांना भाव कसा असावा ?

अहेर करतांना बडेजावपणा दाखवला जातो. हे अयोग्य आहे. अहेर अहंरहित आणि निरपेक्ष भावनेने द्यायचा असतो. तसे न दिल्यास देवाण-घेवाण निर्माण होतो.

अहेर स्वीकारणार्‍या जिवानेही ‘अहेर म्हणजे ईश्वराकडून मिळालेला वस्तूरूपी प्रसाद आहे’, असा भाव ठेवायचा असतो.

अहेर करतांना द्यावयाच्या वस्तूला हळद-कुंकू लावा

अहेर म्हणून द्यावयाच्या वस्तूला हळद-कुंकू लावल्यामुळे हळद-कुंकवाकडे ईश्वरी चैतन्याच्या लहरी आकृष्ट होतात. यामुळे भेटवस्तूबरोबरच जिवाला या चैतन्याचा लाभ होते.

‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप का आणि किती करावा ? / अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप का करा...
18/02/2026

‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप का आणि किती करावा ? / अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप का करावा ?

हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी कुटुंबातील मृत व्यक्तीचे श्राद्ध-पक्ष करत नाही, तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे किंवा त्रास होत आहे, हे उन्नतच सांगू शकतात. तसे सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढे दिल्याप्रमाणे काही तर्‍हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात असे समजावे – विवाह न होणे, विवाह झाल्यास पतीपत्नीचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, गर्भपात न झाल्यास मूल वेळेआधी जन्मणे, मतीमंद किंवा विकलांग अपत्य होणे, अपत्ये बालपणातच मृत्युमुखी पडणे वगैरे. दारिद्र्य, शारीरिक आजार अशीही लक्षणे असू शकतात.

१. श्री दत्त ही पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे. त्यामुळे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप नियमित केल्यास पूर्वजांच्या त्रासांपासून आपली मुक्तता होऊ शकते.

२. कोणत्याही तर्‍हेचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, तसेच जरासा त्रास असल्यास कमीतकमी १ ते २ तास किंवा तीन तास `श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप नेहमीच करावा.

३. मध्यम तर्‍हेचा त्रास `श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप कमीतकमी २ ते ४ घंटे तरी करावा. तसेच गुरुवारी दत्ताच्या देवळात जाऊन सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि बसून एक-दोन माळा जप वर्षभर तरी करावा. त्यानंतर तीन माळा जप चालू ठेवावा.

४. तीव्र त्रास असल्यास कमीतकमी ४ ते ६ घंटे जप करावा. एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन नारायणबली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्पशांती अशासारखे विधी करावे.

५. पितृपक्षात दत्ताचा नामजप केल्याने पितरांना लवकर गती मिळते; म्हणून त्या काळात प्रतिदिन दत्ताचा न्यूनतम ६ घंटे (७२ माळा) नामजप करावा.

दत्ताच्या नामजपाने रक्षण कसे होते ?

१. दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्‍या शक्‍तीने नामजप करणार्‍याच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होते.

२. बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत गुरफटलेले असतात. त्यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात (मृत्युलोकात) अडकतात. दत्ताच्या नामजपामुळे मृत्युलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळते. ( भूलोक आणि भुवर्लोक यांच्या मध्ये मृत्युलोक आहे.) त्यामुळे पुढे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या पुढच्या लोकात गेल्याने साहजिकच त्यांच्यापासून व्यक्‍तीला होणार्‍या त्रासाचे प्रमाण कमी होते.

महाशिवरात्रमहाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत आहे. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. त्या प्रहराला, म्हणजे ...
14/02/2026

महाशिवरात्र

महाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत आहे. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतात. महाशिवरात्र हे व्रत माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला करतात.

शिवाच्या विश्रांतीच्या वेळी शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेमध्ये जातात. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्यामुळे विश्वातील किंवा ब्रह्मांडातील तमोगुण किंवा हालाहल त्यावेळी शिव-तत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये हालाहलाचे प्रमाण प्रचंड वाढते किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून जास्तीतजास्त शिव-तत्त्व आकृष्ट करणारी बिल्वपत्रे, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा इत्यादी शिवपिंडीवर अर्पण करून वातावरणातील शिव-तत्त्व आकृष्ट केले जाते. त्यामुळे वाईट शक्तींच्या वाढलेल्या दाबाचा परिणाम म्हणावा तितका जाणवत नाही.

महाशिवरात्र या दिवशी शिव-तत्त्व नेहमीपेक्षा १००० पटींनी कार्यरत असते. भगवान शिवाची भावपूर्णरित्या पूजा करण्यासह ‘ॐ नमः शिवाय ’ हा नामजप जास्तीतजास्त केल्याने त्याची कृपा प्राप्त होते. आपल्याला शिव-तत्त्व अधिकाधिक ग्रहण करता येते.

शिवाने स्वत: भक्तांना आशीर्वचन दिले आहे, जे महाशिवरात्रीला माझे व्रत करतील, त्यांच्यावर माझी पुढीलप्रमाणे कृपादृष्टी होईल –

१. पुरुषांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

२. कुमारिकांना मनासारखा वर मिळेल.

३. विवाहित स्त्रियांचे सौभाग्य टिकेल.

महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे ?

महाशिवरात्री व्रताचे दोन प्रकार आहेत – काम्य आणि नैमित्तिक. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत. माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त रहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा. सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे. भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे. प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे. शिवाचे ध्यान करावे. मग षोडशोपचार पूजा करावी. भवभवानीप्रीत्यर्थ तर्पण करावे. शिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वाहावीत. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजासमर्पण, स्तोत्रपाठ आणि मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमायाचना करावी.

महाशिवरात्रीच्या रात्री करावयाची यामपूजा !

शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात, असे विधान आहे. त्यांना ‘यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे, अनुलेपन करावे, तसेच धोत्रा, आंबा आणि बेल यांची पत्री वाहावी. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. नृत्य, गीत, कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे. पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. आशीर्वाद घेऊन व्रतसमाप्ती करावी. बारा, चौदा किंवा चोवीस वर्षे हे व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करावे.

महाशिवरात्रीच्या दिवशी हे अवश्य करा !

दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करा.
भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या.
शिवपिंडीला दुधाचा अभिषेक करा.
शिवपिंडीला हळद-कुंकू ऐवजी भस्म लावा.
शिवपिंडीला पांढर्‍या अक्षता वहा.
शिवपिंडीला शाळुंकेला निशिगंधा, जाई, जुई, मोगरा यांसारखी पांढरी फुले १० किंवा १० च्या पटीत त्यांचे देठ शिवपिंडीकडे करून वहा.
शिवपिंडीवर बेलाचे पान उपडे वहा.
शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा घाला.

घरी आरती करा, देवाची कृपा संपादन करा !सकाळी आणि सायंकाळी, दोन वेळा भक्ती भावाने आरती करावी.पूजकाने सकाळी स्नान करून देवप...
01/02/2026

घरी आरती करा, देवाची कृपा संपादन करा !

सकाळी आणि सायंकाळी, दोन वेळा भक्ती भावाने आरती करावी.

पूजकाने सकाळी स्नान करून देवपूजा करावी. देवपूजा झाल्यावर आरती करावी. सूर्योदयाच्या वेळी रात्रीच्या रज-तमात्मक वातावरणाचा लय होऊन ब्रह्मांडात देवतांच्या लहरींचे आगमन होते. त्यांचे स्वागत म्हणून सकाळच्या वेळी देवपूजा करून आरती करावी.

सूर्योदयाच्या वेळी देवतांच्या लहरींचे आगमन होत असतांना प्रक्षेपित होणार्‍या तारक चैतन्याचे स्वागत जिवाने आरतीच्या माध्यमातून करायचे असते, तर सूर्यास्ताच्या वेळी रज-तमात्मक लहरींचे उच्चाटन करण्यासाठी देवतांच्या मारक चैतन्याची आवाहनात्मक आराधना जिवाने आरतीच्या माध्यमातून करावयाची असते. यासाठी सकाळच्या वेळी आणि सायंकाळच्या वेळी, अशी दोन वेळा आरती करावी.

सायंकाळची आरतीही पूजकाने स्नान आणि देवपूजा झाल्यावरच करावी. ज्यांना सायंकाळी स्नान करून पूजा करणे शक्य नाही, त्यांनी हात-पाय धुऊन देवापुढे दिवा आणि उदबत्ती लावावी. नंतर आरतीऐवजी श्लोक, तसेच स्तोत्रे म्हणावीत. बहुतांश श्लोक आणि स्तोत्रे ऋषिमुनींनी किंवा संतांनी रचलेली असल्यामुळे ती भावपूर्ण म्हटल्यास त्यांचाही आरती केल्याप्रमाणे लाभ होण्यास साहाय्य होते.

घरातील सर्व सदस्यांनी एकत्रित आरती केल्याने लहान मुलांमध्ये पण चांगले संस्कार, भक्ती निर्माण होईल.

28/01/2026

मंदिरात देवाला प्रदक्षिणा घालतांना हे करा !

१. प्रदक्षिणा घालण्यापूर्वी गर्भगृहाच्या (गाभार्‍याच्या) बाहेरच्या भागात डाव्या कडेस उभे राहून मग प्रदक्षिणेला आरंभ करा. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर उजव्या अंगाला उभे राहून देवतेचे दर्शन घ्या.

२. प्रदक्षिणा घालण्यापूर्वी देवतेला प्रार्थना करायला विसरू नका. एक छोटीशी प्रार्थना अशी पण असू शकते – ‘हे ….. (देवतेचे नाव उच्चारावे), तुझ्या कृपेने प्रदक्षिणा घालतांना पडणार्‍या माझ्या प्रत्येक पावलागणिक माझी पूर्वजन्मीची पापे जळून जाऊ देत आणि तुझ्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे.’

३. हात जोडून नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात.

४. प्रदक्षिणा घालत असतांना गाभार्‍याला बाहेरच्या अंगाने (बाजूने) स्पर्श करू नये.

५. प्रदक्षिणा घालतांना देवतेच्या पाठीमागे थांबून नमस्कार करावा.

६. सर्वसाधारणतः देवांना सम संख्येने (उदा. २, ४, ६, ८) आणि देवींना विषम संख्येने (उदा. १, ३, ५, ७) प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा जास्त घालायच्या असल्यास त्या किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत घालाव्यात.

७. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवतेला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी.

८. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर देवतेला शरणागतभावाने नमस्कार करावा आणि नंतर मानस प्रार्थना करावी.

पुढच्यावेळी मंदिरात गेल्यावर या सूचनांचे पालन करून बघाल ना?

27/01/2026

देवळात गेल्यावर दर्शन कसे घ्यावे ?

१. देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय धुवावेत.

२. देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा.

३. देवळाच्या पायर्‍या चढतांना उजवा हात लावून पायरीला नमस्कार करावा.

४. ‘देवतेला जागृत करत आहोत’, या भावाने घंटा अतिशय हळू वाजवावी.

५. देवतेचे दर्शन घेण्यासाठी देवतेची मूर्ती आणि तिच्या समोर असलेली कासवाची प्रतिकृती यांच्यामध्ये, तसेच शिवालयात पिंडी अन् तिच्या समोर असलेली नंदीची प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता कासव किंवा नंदी यांची प्रतिकृती आणि देवतेची मूर्ती किंवा पिंडी यांना जोडणार्‍या रेषेच्या अंगाला उभे रहावे.

शिवालयात पिंडीचे दर्शन घेण्यापूर्वी नंदीच्या दोन्ही शिंगांना हात लावून नंदीचे दर्शन घ्यावे. याला ‘शृंगदर्शन’ असे म्हणतात.

६. देवतेच्या चरणांशी दृष्टी ठेवून लीन व्हावे. देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे. शेवटी देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप डोळ्यांत साठवावे.

७. देवतेला अर्पण करावयाची वस्तू (उदा. फुले) देवतेच्या अंगावर न फेकता तिच्या चरणांवर अर्पण करावी.

८. मूर्ती दूर असेल, तर ती वस्तू देवतेसमोरील ताटात ठेवावी.

९. ‘देवतेच्या चरणी लीन होत आहोत’, या भावाने नमस्कार करावा.

१०. दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. सर्वसाधारणत: देवांना सम संख्येने आणि देवींना विषम संख्येने प्रदक्षिणा घालाव्यात.

११. देवळात बसून थोडा वेळ नामजप करावा. प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा.

१२. निघण्यापूर्वी देवतेला नमस्कार करून ‘तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे’, अशी प्रार्थना करावी.

१३. देवळातून बाहेर पडत असतांना देवतेकडे आपली पाठ एकदम होणार नाही, याची काळजी घ्यावी.

१४. देवळातून बाहेर पडल्यावर आवारातून परत एकदा कळसाला नमस्कार करावा आणि मग प्रस्थान करावे.

कुलदेवतेचा नामजप केल्याने होणारे लाभ / कुलदेवतेचा नामजप का करावा ?जलद ईश्वराप्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे आव...
26/01/2026

कुलदेवतेचा नामजप केल्याने होणारे लाभ / कुलदेवतेचा नामजप का करावा ?

जलद ईश्वराप्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे आवश्यक असते, त्याच देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. म्हणून आपल्या कुलदेवतेचा नामजप प्रतिदिन किमान १ ते २ तास आणि जास्तीतजास्त म्हणजे सतत करावा.

उदा. कुलदेवी ‘ श्री महालक्ष्मीदेवी’ असेल, तर ‘श्री महालक्ष्मीदेव्यै नम: ।’ असा नामजप करावा.

ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की, साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपति यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही.

१. कुलदेवता माहित नसल्यास ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप करावा. असा जप केल्याने कालांतराने कुलदेवता समजल्याची अनेक उदाहरणे आहेत.

२. ज्यांना केवळ कुलदेव आहे, त्यांनी त्याचा जप करावा, उदा. ‘श्री व्यंकटेश कुलदेव’ असेल, तर ‘श्री व्यंकटेशाय नमः ।’ असा जप करावा.

३. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा. लहानपणी आई-वडील असतांना आपण आईकडेच अधिक हट्ट करतो; कारण ती हट्ट लवकर पुरवते. तसेच कुलदेवापेक्षा कुलदेवी लवकर प्रसन्न होते.

४. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा.

कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी राज्य स्थापन करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवी होती. तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हे साध्य केले.

पुरुषांनी तिलक धारण का करावे ?त्यांनी भ्रूमध्याच्या ठिकाणी असणार्‍या आज्ञाचक्राची जागृती होण्यासाठी कपाळाला भ्रूमध्यावर ...
23/01/2026

पुरुषांनी तिलक धारण का करावे ?

त्यांनी भ्रूमध्याच्या ठिकाणी असणार्‍या आज्ञाचक्राची जागृती होण्यासाठी कपाळाला भ्रूमध्यावर शक्तीवर्धक कुंकू लावावे. पुरुषांनी शिवज्योतीचे प्रतीक असणारा ज्योतीप्रमाणे दिसणारा कुंकवाचा उभा टिळा कपाळावर लावणे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य आहे. यामुळे पुरुषांमध्ये शिवज्योतीस्वरूप शक्ती आणि चैतन्य अधिक प्रमाणात कार्यरत होऊन त्यांना धर्माचरण अन् साधना करण्यासाठी शिवाची निर्गुण शक्ती आणि चैतन्य अधिक प्रमाणात मिळते.

कुंकवामध्ये पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा आहे. त्यामुळे अशा व्यक्तींनी स्वत:च्या कपाळावर कुंकवाचा उभा टिळा लावावा. कुंकवाच्या उभ्या टिळ्याची उंची कपाळाच्या उंचीच्या अर्धी ठेवणे योग्य आहे. असे केल्याने कुंकवाच्या टिळ्यामध्ये क्रियाशक्ती कार्यरत होते आणि कुंकवाचा टिळा लावणारी व्यक्ती आध्यात्मिक स्तरावर अधिक प्रमाणात सक्रीय होते.

तिलक धारण करतांना मध्यमेचा उपयोग करावा, असे शास्त्र आहे. मध्यमेचा संबंध हृदयाशी असल्यामुळे या बोटातून प्रवाहित होणारी स्पंदने हृदयापर्यंत जाऊन भिडतात. भृकुटीमध्यात निवास करणार्‍या परमेश्‍वरास तिलक लावतांना तृतीय नेत्रातून स्फुरणारी स्पंदने मध्यमेद्वारा हृदयात जाऊन भिडल्यामुळे दिवसभर मनात भक्‍तीभाव आणि शांती नांदते.

टिळा लावण्याचे प्रकार

१. ऊर्ध्वपुंड्र : कपाळावर काढलेल्या एक अथवा अधिक उभ्या रेघांना ‘ऊर्ध्वपुंड्र’ म्हणतात. श्रीविष्णूमुळे पवित्र झालेल्या क्षेत्रातील माती; गंगा, सिंधू यांसारख्या पवित्र नद्यांच्या काठची माती / गोपीचंदन ऊर्ध्वपुंड्र काढण्याकरिता घ्यावे.

२. त्रिपुंड्र : कपाळावर काढलेल्या तीन आडव्या रेषांना ‘त्रिपुंड्र’ म्हणतात. त्रिपुंड्रमुद्रा भस्माच्या असतात.

३. तिलकमुद्रा (टिळा) चंदनाची करतात.

03/12/2025

दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत

१. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात.

२. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा दत्ताचा नामजप आणि प्रार्थना अधिकाधिक करावी.

३. दत्त तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणाऱ्या रांगोळ्या काढाव्या.

४. दत्ताची भावपूर्ण पूजा आणि आरती करावी.

५. सायंकाळी दत्त स्तोत्राचे पठण करावे.

दत्ताला करावयाच्या काही प्रार्थना

१. हे दत्तात्रेया, तू जसे चोवीस गुणगुरु केलेस, तसे सर्वांमधील चांगले गुण घेण्याची वृत्ती माझ्यातही निर्माण होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना.

२. हे दत्तात्रेया, भुवलोकात अडकलेल्या माझ्या अतृप्त पूर्वजांना पुढची गती दे.

३. हे दत्तात्रेया, अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून तू माझे रक्षण कर. तुझे संरक्षक-कवच माझ्याभोवती सदोदित असू दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना.


03/12/2025

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.

दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा आणि नामजप केल्यास दत्त-तत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते. श्री दत्त ही पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे.

दत्त जन्माचा इतिहास

अत्रीऋषींची पत्नी अनसूया ही पतीव्रता होती. पातिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांकडे जाऊन म्हणाले, ‘‘तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल; म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर आम्ही तिची सेवा करू.’’ हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, ‘‘एवढी काय मोठी पतीव्रता, सती आहे, ते आपण पाहू.’’

एकदा अत्रीऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. त्यावर अनसूयेने सांगितले, ‘‘ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.’’ तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, ‘‘ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. `आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता’, असे आम्ही ऐकले आहे; म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत.’’ मग अनसूयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते जेवायला बसले. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, ‘‘तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.’’ त्यावर ‘अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय बिशाद आहे ? माझ्या पतीचे तपफळ मला तारील’, असा विचार करून ती अतिथींना म्हणाली, ‘‘मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन. तुम्ही आनंदाने भोजन करा.’’ मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की, ‘अतिथी माझी मुले आहेत’ आणि विवस्त्र होऊन वाढायला आली. पहाते तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहानबाळे ! त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले. इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. ती म्हणाली, ‘‘स्वामिन् देवेन दत्तं ।’’ याचा अर्थ असा आहे – ‘हे स्वामी, देवाने दिलेली (मुले).’ यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण ‘दत्त’ असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश त्यांच्यासमोर उभे राहिले आणि प्रसन्न होऊन ‘वर मागा’, असे म्हणाले. अत्री आणि अनसूयेने ‘बालके आमच्या घरी रहावी’, असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला.

02/12/2025




Address

SHREE DATTA MANDIR, AT-ROADPALI VILLAGE, SEC-16E, D-MART Road, NEAR HANUMAN TEMPLE, Tal-Panvel, Navi Mumbai
Navi Mumbai
410218

Opening Hours

Monday 7am - 10pm
Tuesday 7am - 10pm
Wednesday 7am - 10am
Thursday 7am - 10pm
Friday 7am - 10pm
Saturday 7am - 10pm
Sunday 7am - 10pm

Telephone

+919987888018

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, रोडपाली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, रोडपाली:

Share