वर्षानुवर्षे ऋतुचक्र निर्मित ऊन, थंडी,वारा,पाऊस यानां समर्थपणे तोंड देत असतानाच आपल्या शीतल छायॆखाली पांथस्थांना सावली देणार्या महान वटवृक्षाप्रमाणे श्री दत्तगुरू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली भरपूर र्वर्षे अव्याहतपणे आपल्या धार्मिक सामाजिक , शैक्षणिक , आणि सांस्कृतिक कार्याद्वारे वाशी सारख्या विभागात कार्यरत आहे.सार्वजनिक उत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांना उत्सवातून अभिप्रेत असलेले समाजप्रबोध
न आणि लोकशिक्षणाचे कार्य हेच या उत्सव मंडळाच्या कार्याचे मूळसूत्र आहे.
सेवाभावी संस्थेचे काम पक्षातीत असले पाहिजे हा या मंडळाचा प्रारंभापासूनच कटाक्ष होता,गेल्या कित्येक वर्षात विविध पक्षांचे कार्यकर्ते आपली राजकीय पादत्राणे बाहेर ठेवून उत्सव मंडळाच्या कार्याचा हा रथ पुढे नेत आहेत हे आवर्जून नमूद करावयास हवे.हे मंडळ म्हणजे कार्यकर्ते निर्माण करण्याची कार्यशाळा आहे असे म्हटले जाते. मंडळाच्या माध्यमातून कामास सुरवात करुन आज विविध स्तरांवर हे कार्यकर्ते नावारुपास आलेले आहेत याचा ,मंडळास रास्त अभिमान आहे.वैचारीक अधिष्ठान व सेवा हाच स्थायीभाव असलेल्या या उत्सव मंडळासारख्या संस्था सामाजिक जीवन संपन्न व सुसंस्कृत करतात. समाजाची सर्व दु:खे जरी दूर करता आली नाहीत तरी ती सुसह्य करण्यासाठी झटतात व समाजात जागल्याचे काम करतात.म्हणूनच समाज ,सरकार,राजकीय पक्ष,प्रसिध्दी माध्यमे ,दानशूर संस्था यांनी आपले सक्रीय पाठबळ अशा संस्थेच्या मागे उभे केले पाहिजे.सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे आव्हानांना मंडळाने कधीच पाठ दाखविलेली नाही किबंहूना प्रश्नांना हात घालीतच मंडळाची वाटचाल झालेली आहे.आजची विभागातील तरुण पिढी सुशिक्षित ,सुसंस्कृत आहे. मंडळ गेली कित्येक वर्षे जमविलेल्या निधीचा फार मोठा हिस्सा शैक्षणिक कार्यावर खर्च अशा वेळी सामाजिक बांधिलकी म्हणून किमान २ वर्षे या तरुण पिढीने मंडळाच्या कार्यात सहभागी व्हावे अशी अपेक्षा मंडळाने केली तर वावगे ठरणार नाही.मंडळाच्या कार्याची राज्य पातळीवर विविध संस्था, प्रसिध्दी माध्यमे यांनी योग्य ती दखल घेतलेली आहे
आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये उत्सव मंडळाने फार मोठे काम केलेले आहे असं आमच कधीच म्हणणं नव्हत आणि असणार ही नाही.’अपूर्णावस्थेतच पूर्णत्वाचे बीज असते ’ जेव्हा पूर्ण विकास झाल्यावर भास होतो तेथे विकास खुंटतो या विचार सरणीवर आज आम्हा सर्व कार्यरत कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.या कामामध्ये आमच्याही काही चुका झाल्या असतील परंतु TO ERR IS A HUMAN NATURE या वाक्याने या चुका आपण सर्वांनी समजून घेतल्या .सर्व जनता जनार्दन वर्गणीदार ,देणगीदार ,जाहिरातदार ,हितचिंतक तनमनधनाने या मंडळाची एकरुप झालेत.गेल्या कित्येक वर्षाच्या कालावधीत असंख्य व्यक्ती ,संस्थानी या उत्सव मंडळाच्या जडणघडणीत जे योगदान दिले त्याबद्दल मंडळ त्यांना सदैव मानाचा मुजरा करीत आहे. फुटीरता व जातियता यांनी ग्रासलेली आपली भारत मातृभूमी पुन्हा एकदा अखंड बलशाली व सुवर्णभूमी व्हावी.आपणा सर्वांना वैभव व सौख्य लाभावे हीच श्री गणराय व आईभवानीकडे प्रार्थना.
धन्यवाद !
जयहिंद,जय महाराष्ट्र
"मान टिळकांचा
ठसा सामाजिक बांधिलकीचा !