वारी जनातली, जनांच्या मनातली

वारी जनातली, जनांच्या मनातली Vitthal Bhakti

26/07/2026

*वारी जनातली, जनांच्या मनातली......सिझन ७*

*“गुंजन गौळणीं”चे अर्थात “संत साहित्यातील गौळण”*

*आषाढ शुद्ध द्वादशी, दिनांक २६ जुलै २०२६.*
*ज्ञानेश्वर माऊली वारी आजची वाटचाल*
*मुक्काम: श्रीक्षेत्र पंढरपूर.*

*विटेवरी विट देव उभा राहिल्यातं |*
*चंद्रभागेचं ठाव, ह्यांनी पाहिल्यातं ||*
*पंढरीला गेले पह्यली पायरी नामाची |*
*विठ्ठलाच्या आधी भेट गरुड खांबाची ||*
*पाह्यली पंढरी, मीत भावासंग केली |*
*विठ्ठलाच्या आदी, भेट कुंडलीकान दिली ||*
*पंढरीला गेले उभी राहिले, बारीला |*
*माझ्या दर्शनाची चिंता पडली, हरीला ||*

पुंडलिकाची आपल्या माता-पित्यावरची भक्ती सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याच्या या भक्तीने प्रभावित होऊन विठोबा त्याला भेटायला आले. तेव्हापासून पंढरपूरच्या देवळात विठोबा असाच कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तांची वाट पाहत विटेवर उभा आहे. आपल्या भक्तांच्या अंतरीचा ठाव माहीत असणारा तो *लोकोत्तर जनदेव* आहे. त्याच्या देवळात *पहिली पायरी नामदेवांची* आहे, भक्त देवाची भेट घेण्या अगोदर *गरुड खांबांची भेट* घेतात. भक्तांचा दृढ विश्वास आहे की एकदा का पंढरीला पोहोचलो की तो *पांडुरंगच त्याच्या दर्शनाची चिंता करणार.*

*माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।*
*पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ।।*
*जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहता रूप आनंदी आनंद साठवे ।।*
*बाप रखुमादेविवर सगुण निर्गुण । रूप विटेवरी दाविली खूण ।।*

टाळ, मृदुंगाच्या तालावर विशेष आवडीने गायला जाणारा हा अभंग वारकऱ्यांच्या विठ्ठल भेटीची उत्कटता नमूद करतो. प्रत्येक वारकऱ्याचा पंढरपूरला वारीबरोबर जाणे हा ध्यास आहे ही त्याच्या मनाची आत्यंतिक आवड आहे. वारीत चालत असताना त्याचे मन पांडुरंगाच्या भक्तिरंगात पार बुडून गेले आहे. गोविंदाचा अवतार मानला गेलेल्या विठ्ठलाच्या गुणांनी त्याच्या मनाला वेधून टाकले आहे. त्याचे *जागृत, अर्धजागृत आणि स्वप्न* या तिन्ही अवस्थांचे भान हरपले असून त्याच्या डोळ्यासमोर सतत येणाऱ्या *विठुरायाच्या सावळ्या रूपाला पाहताच त्याच्या मनात आनंदाच्या लाटा दाटून येतात.* हा विठुराया जसा *निर्गुण, निराकार आहे, तसाच सगुण साकार आहे.* विटेवरचे त्याचे देखणे रूप ही *सगुणपणाची खूण* आहे.

समस्त जगासाठी पसायदान मागताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात,

*आतां विश्वात्मकें देवें | येणें वाग्यज्ञें तोषावें || तोषोनि मज द्यावें | पसायदान हें ||१||*

विश्वातम देवाकडे *माऊलींनी पसायदान* मागितले. याच धर्तीवर संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाकडे अत्यंत जगद्कल्याणासाठी फार सुरेख मागणे मागितले आहे. ते म्हणातात,

*हेचि दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा ||धृ||*
*गुण गाईन आवडी | हेचि माझी सर्व जोडी ||१||*
*न लगे मुक्ति आणि संपदा | संतसंग देई सदा ||२||*
*तुका म्हणे गर्भवासी | सुखें घालावें आम्हांसी ||३||*

संतांनी आपल्या ऐहिक सुखासाठी भगवंतांकडे कधीच काही मागितले नाही. *‘अवघे विश्वची माझे घर’* या विचाराने सतत विश्वाच्या भल्याचा विचार केला. म्हणून ही मंडळी संतमंडळी आज आपल्यात नसली तरी *त्यांचे चिरंतन विचार* आजही आपल्याला प्रेरणा देत असतात.

देवाच्या दारात गेल्यानंतर प्रत्येकजण स्वत:साठी काही ना काही मागत असतो. पण आपल्या या अभंगातून तुकोबाराय पांडुरंगांकडे माऊली ज्ञानेश्वरांच्या (पसायदान) सारखे, स्वत:साठी नव्हे तर अवघ्या जगासाठी *पांडुरंगाचे विस्मरण न होण्याचे दान* मागत आहेत. ईश्वराचे सतत चिंतन *नामस्मरण केल्याने ईश्वरशी द्वैत संपून अद्वैत निर्माण होते.* याचसाठी ईश्वरा सकल जनांना तु तुझ्या विसर न होण्याचे दान दे.

निर्गुण निराकार देवाचे गुण कसे गाणार हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न तुकाराम महाराजांना पडत नाही. भक्ताला ईश्वर निर्गुण निराकार, तसेच सगुण साकार अशा दोन्ही रुपात दिसतो. त्याचे अलौकिक गुण आपल्यात उतरावे अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणून ते *‘गुण गाईन आवडी’* म्हणत असताना ते म्हणतात ‘ *हेचि माझी सर्व जोडी’* असे म्हणतात. तुझे गुण गात असताना हे सगळे गुण माझ्यात उतरावे हा माझा प्रयत्न असेल.

मला मुक्ती नको, धनदौलत किंवा संपत्ती नको, फक्त मला सदैव संतांची संगत दे. संतसंगतीमुळे माणसाला परमेश्वराची ओळख मिळते आणि भक्तीमार्ग दृढ होतो. संतांच्या सानिध्यात राहिल्याने नामाची गोडी कधीच कमी होत नाही.

गर्भवासातून प्रत्येक जीव आला आहे. पण गर्भवासाची यातना कुणाच्याही अनुभवात नाही. दुसऱ्या जीवाला विज्ञानाच्या यंत्राद्वारे आपण पाहू शकलो तरी तो अनुभव कुणीही आठवू शकत नाही. हा अनुभव देह बुद्धीने घेण्यासाठी शरीर पूर्ण नसते. आईच्या उदरात शरीराची वाढ होत असताना आलेले अनुभव आठवण्याची आपल्या बुद्धीची कुवत नाही. केवळ चेतनेतून ही अनुभूती शक्य असते. संतसंगाच्या कारणाने ही चेतन अवस्था आपल्याला प्राप्त होते आणि ही गर्भावस्था आपण जाणू शकतो. म्हणून हे ईश्वरा, संतसंगाने मिळणारी ती चेतन अवस्था आम्हाला पुन्हा प्राप्त होण्यासाठी तु आम्हाला पुन्हा पुन्हा गर्भवासी कर आणि आम्हास ते सुख पुन्हा एकदा अनुभवू दे. आम्हाला त्याचे अजिबात दुःख किंवा भय वाटणार नाही. कारण जिथे देवाचा विसर पडत नाही, तो गर्भवासही सुखाचा ठरतो.

मित्रांनो, कोव्हीडच्या कारणाने चुकवून गेलेली वारी आमच्याही न कळत आम्हाला लिहिते करून गेली. वारीच्या निमित्ताने आम्हाला मिळालेल्या ज्ञानातले चार कण *‘वारी जनातली, जनांच्या मनातली’* या माध्यमातून तुम्हासोबत वाटून घेताना *सात वर्षे* कशी उलटली काही कळलेच नाही. पंढरीच्या वारीचा महिमा अगाध आहे. आषाढाचे दिवस जवळ येताच वारीचे वारू अंगात भिनू लागते. मनात एक गोड हुरहूर निर्माण करते. काहीतरी कारायला पाहिजे ही भावना मनात रुंजी घालू लागते. अन अंत:प्रेरणेने काहीतरी घडून जाते. माऊलींच्या जीवीची जी आवड, तीच आवड आम्हालाही निमूट बसण्यापासून परावृत्त करते अन हातून काहीतरी घडवून घेते.

बघता बघता *गुंजन गौळणीचे* या लेखमालेचे *एकोणीस दिवस पूर्ण झाले.* या एकोणीस दिवसात आपण संतांच्या *गौळणी, विराण्या त्याचबरोबर शाहिरांच्या गौळणींची* माहिती घेतली आणि *संतांच्या गौळणी, विराण्यांचा रसास्वाद घेतला.* आशा आहे आम्ही आपल्यासमोर मांडलेले विचार आपल्याला भावले असतील.

गेल्या सहा वारीप्रमाणे याही वारीत आम्ही माऊलींनी आमच्याकडून लिहून घेतलेले चार शब्द तुमच्यासमोर मांडले. यात जे काही उत्तम आहे ते सगळे माऊलींचे आहे, यातील न्यूनाचे उत्तराधिकारी मात्र आम्ही आहोत. आपणांस *ही लेखमाला आवडली असेल तर आम्हाला संपर्क करुन आपला प्रतिसाद देण्यास बिलकुल विलंब करु नका.* आपल्या प्रतिसादाने आम्हास पुन्हा पुढील वर्षी आपल्या सेवेसाठी येण्याची स्फूर्ती प्राप्त होईल.

ही लेखमाला लिहिताना आमची अवस्था तुकाराम महाराजांच्या अभंगातील भक्तांसारखी झाली आहे. आम्हीही त्यांच्याइतक्याच उत्साहाने बोलतो आहे,

*आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥१॥*
*काय सांगो जालें कांहींचियाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥*
*गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥*
*तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥*

*| श्री पांडुरंग चरणार्पणमस्तु |*

*|| रामकृष्ण हरि ||*

*लेखक, संकलक: डॉ. (नरू) भाऊ कदम. ९८६९०६१८८९*
[email protected]
*सुलेखनकार: डॉ. तेजस वसंत लोखंडे. ७५०६१०५१२५*

#वारी_जनातली_जनांच्या_मनातली
#गुंजन_गौळणींचे
#वारी #वारकरी #गवळण

.lokhande

*ही पोस्ट नावासकट पुढे प्रसारीत करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही.*

24/07/2026

*वारी जनातली, जनांच्या मनातली......सिझन ७*

*“गुंजन गौळणीं”चे अर्थात “संत साहित्यातील गौळण”*

*आषाढ शुद्ध दशमी, दिनांक २४ जुलै २०२६.*
*ज्ञानेश्वर माऊली वारी आजची वाटचाल*
*प्रस्थान: वाखरी; मुक्काम: श्रीक्षेत्र पंढरपूर.*

संत साहित्यातील गौळण तसेच संतांच्या विराण्यातून दिसणारा अप्रतिम प्रेमभाव आपण गेले काही दिवस अनुभवला आहे. प्रेमाच्या भावनेतून ईश्वराच्या समीप जाण्याची कला या संतांनी साध्य केली होती. आपण आत्तापर्यंत पाहिले आहे की *गौळण हा प्रकार* संतसाहित्यातून *फारच उत्कटतेने आला आहे.* *संतसाहित्यातून* कालांतराने हा प्रकार *लोकसाहित्यातही* आला.

तसे पहाता *संतसाहित्यातील गौळण* आणि *लोकसाहित्यातील गौळण* यात *फारसा फरक जाणवून येत नाही.* सुरुवातीच्या काळातील शाहीरी परंपरेतील शाहीर राम जोशी, अनंत फंदी इत्यादी शाहीर हे मूळचे कीर्तनकारच होते. तत्कालीन इतर शाहीर रगेल प्रवृत्तीचेही होते. त्यामुळे शाहीरी गौळणीतून आत्यंतिक प्रेमभावाच्या *बरोबर भक्तीप्रेमातला रतीभावही* दिसून येतो. संतांनी आपल्या गौळणींतून निरनिराळी रुपके आध्यात्मिक अंगाने खुलवून भगवद्भक्तीतील व्यभिचार *भक्तीप्रेमाच्या मार्गाने मांडला* आणि शृंगाराला अत्युच्च पातळीवर नेले. तर शाहीरी गौळणींच्या कवनातून ईश्वराप्रती आत्यंतिक प्रेमभाव काहीशा *रांगडया शृंगारांच्या अंगाने* नेला.

पेशवाईच्या उत्तर काळात महाराष्ट्राची राजकीय व सामाजिक परिस्थिती दृष्ट लागण्यासारखी उत्तम होती. त्यामुळे छंदी फंदी जीवन सुरु झाले होते. ठिकठिकाणी नाच-गाण्यांचे कार्यक्रम सुरु झाले, नट-नर्तकींना चांगले दिवस आले. लावणी, लोकनाट्य या सारख्या कलांना राजाश्रय मिळाला. शाहीरी गौळण मूळ धरू लागली. याही गौळणीतून *कृष्णाच्या लीला प्रामुख्याने कथन केल्या जाऊ लागल्या.* शाहीर अनंत फंदी, होनाजीबाळा, राम जोशी, सगनभाऊ असे एकापेक्षा एक सरस शाहीर लोकनाट्याच्या माध्यमातून शाहीरी गौळणी ऐकवू लागले. परमेश्वर लीला कथनाचा हा नवा आविष्कार समाजाचे मन रिझवू लागला. त्यानंतर साधारण शंभर वर्षांपर्यंत ही शाहीरी परंपरा पठ्ठे बाबुराव, भाऊ फक्कड यांच्यापर्यंत सुरु राहिली.

लोकनाट्य, तमाशा या माध्यमातून जाणारी गौळण, काहीसे रुप बदलून य लोककलांमधून समाजाच्या समोर आली. सर्वप्रथम *गण म्हणजे ईशस्तवन* झाल्यानंतर *गौळण सादर केली जात होती.*

शाहीरी काव्यात प्रामुख्याने पोवाडे, फटके, गौळणी, भेदीक लावणी अशा प्रकारची कवने सादर केली जात होती. यापैकी *भेदीक लावणी* हा एक *संतांच्या गौळणींच्या जवळ जाणारा प्रकार होता.* कूट-प्रश्न असलेली ही लावणी जुगलबंदीच्या स्वरूपात सादर होत होती. *आध्यात्मिक, तत्त्वज्ञानाने भरलेले कूट* प्रश्न समोरच्याला विचारून, दोघांपैकी एक निरुत्तर होईपर्यंत हा खेळ चालत होता. या रचना कोडी, उखाणे किंवा काव्यात्मक रित्या समोर येत होते.

या भेदीक प्रकाराच्या या रचनातून सहसा *सांसारिक, आध्यात्मिक रुपातले कोडे* किंवा *कूट* मांडले जात होते. या सामन्यात कलगी आणि तुरा असे दोन पक्ष, नवनवीन कुटे सांगायला आणि विचारलेल्या कुटाची उत्तरे द्यायला आमनेसामने उभे ठाकत होते. अनेकदा समोरच्याला नामोहरम करण्यासाठी या भेदीक लावण्या, चालू फडात उस्फूर्तपणे रचून सादर केल्या जात होत्या यातून या शाहिरांची प्रतिभा शक्ती किती अफाट होती याचा अंदाज आपल्याला येतो. *आत्मा, परमात्मा, माया, संसार, जीवन-मूल्ये, जीवन-मृत्यू हे तत्त्वज्ञान* या लावण्यातून पुढे येत होते. सहज समजेल असे उदाहरण सांगायचे झाले तर, कवनातून *‘पाच जणींनी मिळून नऊवारी विणली,’* अशा प्रकारचे कूट विचारुन त्याची उत्तरे मागितली जात होती. *पंचमहाभूतांपासून, पंचकर्मेंद्रिय व पंचज्ञानेद्रियांनी* बनलेले हे मानवी शरीर म्हणजे कुटातल्या या *पाच जणी* आणि *नऊ छिद्रांनी बनलेले हे शरीर* म्हणजे *नऊवारी लुगडे.* अशा प्रकारे लावणी सादर केल्या जात होत्या. या लावणी सादरीकरणापूर्वी गौळण सादर होत होती. नमुन्यादाखल पठ्ठे बापूरावांची ही एक गौळण इथे वाचकांसाठी सादर करतो,

*थाट करोनी माठ भरोनी घ्या गे सगळ्या शिरी |*
*जाऊ चला मथुरेच्या बाजारी ||धृ||*
*सोळा हजारांच्या मोहरा त्यामध्यी राधा गौळण खरी ग |*
*चंद्रावळ दुसरी, इंद्राची परी ||१|| जाऊ चला..*
*हंडावर घडा, घड्यावर घडा तांब्याच्या घागरी |*
*दही घ्या, दही घ्या, कोणी दुधाच्या आकरी ||२|| जाऊ चला..*
*कृष्ण देवाने गौळणी अडविल्या माणिक चौकामधी ग |*
*पठ्ठे बापूराव कवी, चाल नवी करी ||३|| जाऊ चला..*

संत एकानाथांचे भाषावैभव अफाट होते. त्यांनी रचलेल्या काही गौळणी ऐकताना या गौळणी आजच्या काळासाठी रचलेल्या गौळणी आहेत असे आपल्याला जाणवते. आज आणि उद्या आपण नाथांच्या आधुनिक वाटणाऱ्या गौळणींचा आस्वाद घेणार आहोत.

*घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन | निघाली पाण्या गवळण ||*
*ठुमकत ठुमकत चालली डोलत | वाऱ्याच्या तोलान ||धृ||*
*हासत खुदु खुदु मोडीत डोळे | मनी आठवी कृष्णाचे चाळे ||*
*लगबगीने प्रभात काळी | आली नंद अंगणी ||१||*
*आडवी वाट उभा शारंगधर | सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर ||*
*एका जनार्दनी जाणे | न कळे या गौळणी ||*
*घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन | निघाली पाण्या गवळण ||२||*

*'घागर घेऊन निघाली पाण्या गौळण'* ही संत एकनाथ महाराजांनी रचलेली अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध गवळण आहे. वरकरणी ही गावाकडची साधी गोष्ट वाटत असली, तरी संत एकनाथांच्या साहित्यातील प्रत्येक रचनेप्रमाणे या गवळणीलाही एक सखोल आध्यात्मिक आणि *अद्वैतवादी अर्थ* आहे.

गोकुळच्या गवळणींना सकाळी यमुनेवर पाणी भरण्याचे काम आहे. अशीच एक गवळण सकाळी पाणी भरण्यासाठी डोईवर घागर घेऊन निघाली आहे. तिच्या या चालीचे वर्णन नाथ महाराज मोठ्या खुबीने करतात. आजही प्रत्येक स्त्रीला सकाळी कामाची घाई असते तशीच घाई या गवळणींनाही आहे. आणि या घाईमुळे तिच्या चालीत वाऱ्याच्या लयीचा डौलदारपणा आला आहे. ती वाऱ्याच्या वेगाने चालली आहे. तिच्या या घाईच्या चालीतला डौलदारपणा तिची चाल फारच मोहक करत आहे.

गोकुळातल्या गवळणींचा मोठा विरंगुळा कृष्ण होता. त्याच्या बाललीलात त्या नेहमीच हरवून जात होत्या. पाण्याला निघालेल्या या गवळणीलाही कृष्णाने आजवर केलेले सगळे चाळे आठवत आहेत. चालताना तिच्या डोळ्यासमोर कृष्णाचीच मूर्ती आहे. त्यामुळे ती स्वत:शी हसत हसत डोळे मोडीत चालली आहे. कृष्णाच्या आठवणीत चाललेली ही गवळण तिच्या आठवणींच्या चक्रात यमुनेला जायचे विसरुन चक्क नंदाच्या घरी पोहोचली आहे.

गवळणीने केलेली चूक कृष्णाच्या लक्षात आली आहे आणि म्हणून त्याने तिची वाट अडवून धरली. या कृष्णाच्या विचारांमुळे झालेली चूक उमगताच गवळण भानावर आली आणि ती लगबगीने अडवलेलली वाट सोडण्यासाठी कृष्णाची विनवणी करु लागली. कृष्णाच्या विचारांनी झालेली या गवळणीची अवस्था म्हणजे भक्त आणि ईश्वराचे अद्वैत आहे.

थोडक्यात या गौळणीचा *आध्यात्मिक अर्थ पहाता,* ही *गवळण (जीवात्मा)* पूर्णपणे *श्रीकृष्णाच्या (परमात्म्याच्या)* भक्तीत तल्लीन झालेला आहे. दिनरात त्याच्या मनात फक्त आणि फक्त भगवंतांची मूर्ती आहे. त्यामुळे त्याला अनेकदा *प्रापंचिक गोष्टींचे विस्मरण होते.* जेव्हा बाळकृष्ण तिचा मार्ग अडवतो, म्हणजेच तो *भक्ताला सांसारिक बंधनातून बाहेर काढत असतो.* कृष्णभक्तीचा आनंद आणि त्याचे प्रेम अनुभवताना संसारातील इतर गोष्टी गौण वाटतात, हाच भाव यात आहे.

*भक्त आणि ईश्वराचे अद्वैत आहे,* हे नाथ महाराज आपल्या शेवटच्या दोन ओळीतून अधिक स्पष्ट करुन सांगतात. संत एकनाथ महाराज म्हणतात की, या गौळणीचे रहस्य किंवा तिची भक्ती केवळ जनार्दनाचे (परमेश्वराचे) नामस्मरण करणाऱ्यालाच समजते. सामान्य सांसारिक बुद्धीला या अलौकिक भक्तीचे मर्म कळणे कठीण आहे.

*| श्री पांडुरंग चरणार्पणमस्तु |*

*|| रामकृष्ण हरि ||*

*लेखक, संकलक: डॉ. (नरू) भाऊ कदम. ९८६९०६१८८९*
*सुलेखनकार: डॉ. तेजस वसंत लोखंडे. ७५०६१०५१२५*

#वारी_जनातली_जनांच्या_मनातली
#गुंजन_गौळणींचे
#वारी #वारकरी #गवळण

.lokhande

*ही पोस्ट नावासकट पुढे प्रसारीत करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही.*

*वारी जनातली, जनांच्या मनातली......सिझन ७*  *“गुंजन गौळणीं”चे अर्थात “संत साहित्यातील गौळण”*    *आषाढ शुद्ध अष्टमी,  दिन...
21/07/2026

*वारी जनातली, जनांच्या मनातली......सिझन ७*

*“गुंजन गौळणीं”चे अर्थात “संत साहित्यातील गौळण”*

*आषाढ शुद्ध अष्टमी, दिनांक २१ जुलै २०२६.*
*ज्ञानेश्वर माऊली वारी आजची वाटचाल*
*प्रस्थान: माळशिरस; मुक्काम: वेळापूर.*

भागवतात *श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन* अशी *नवविधाभक्ती* चे प्रकार सांगितले आहेत. गवळणींची भक्ती ही या सर्वांच्या पेक्षा श्रेष्ठ असणारी *'मधुरा भक्ती'* किंवा *'कांतभाव'* आहे. ही ईश्वरप्राप्तीची सर्वात गोड आणि उत्कट पद्धत आहे. येथे भक्त परमेश्वराला आपला प्रियकर मानतो आणि स्वत:ला त्याची प्रेयसी किंवा भार्या मानतो. या भक्तीत लौकिक जीवनातील वासनेचा लवलेशही नसतो. ती अलौकिक, आध्यात्मिक आणि निस्वार्थ प्रेमावर आधारित असते.

भागवतात व्यासांनी स्पष्ट केले आहे की, गोपींचे कृष्णावरील प्रेम हे 'काम' नव्हते, तर ते शुद्ध 'प्रेम' होते. कामामध्ये स्वतःच्या सुखाची इच्छा असते, तर प्रेमामध्ये समोरच्याला सुख देण्याची भावना असते. गोपींचा भाव हा मानवी वासनांना अध्यात्मिक उर्जेमध्ये बदलण्याचे एक महान तत्त्वज्ञान आहे.

संतांनी आपल्या अभंगातून ही *मधुरा भक्ती* स्पष्ट करताना भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक रुपे वर्णली आहेत. कधी परमेश्वरला त्यांनी आपला *सखा मानला* तर कधी *माता, बंधु, पित्याची* उपमा दिली आहे. यातून भक्त प्रभूशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. मानवी *अनुरागात मिलनाची शेवटची पायरी म्हणजे पतीपत्नीचे प्रेम.* इतर सर्व नात्यात काही उणिवा असतात, त्या साऱ्या उणिवा या नात्यात भरून काढल्या जातात.

पतीपत्नी यांच्या मिलनातील अभेद परमेश्वराच्या भक्ताला लोभनीय वाटला. मिलनातील *प्रणय, शृंगार, प्रियकराचा दुरावा, विरह, तापून गेलेला देह, शिणलेले डोळे, वियोगाचे दु:ख* यातुन *विरह गीतांची निर्मिती* झाली.

महाराष्ट्रातील संत परंपरेने भागवतातील याच तत्त्वज्ञानाला मराठी गौळणींमधून पुढे आणले. संत जनाबाईंनी गौळणींचे वर्णन करताना म्हटले आहे,

*झालीये गोपीचंदने | न्हालीये कृष्णकीर्तने ||१||*
*आता मज कोण काय करी | विठोबा माझा कैवारी ||२||*
*तुळशी माळा घालुनि गळा | टाळी वाजवी वेळोवेळा ||३||*
*दासी जनी म्हणे विठोबा | आता मजसी पावा ||४||*

भागवतातील 'रासपंचाध्यायी' मध्ये एक कथा येते. जेव्हा रासलीला सुरू असताना गोपींच्या मनात *"कृष्ण फक्त माझ्यावरच प्रेम करतो"* असा किंचितसा अहंकार निर्माण झाला, तेव्हा *कृष्ण तत्काळ अंतर्धान पावले.* कृष्ण निघून गेल्यावर गोपी व्याकुळ झाल्या आणि त्यांनी 'गोपीगीत' गात आपला अहंकार पूर्णपणे विरघळवून टाकला. थोडक्यात हा *विरह भक्ताला अधिक शुद्ध करतो.* जोपर्यंत भक्ताच्या मनात *"मी कोणीतरी श्रेष्ठ भक्त आहे" हा सूक्ष्म अहंकार असतो, तोपर्यंत भगवंत दूर राहतात, हेच यातून स्पष्ट होते."*

संतांच्या विरहिणी मनाला व्याकूळ करुन जातात. हे संत साहित्यातील अत्यंत *भावविभोर, आर्त, उच्च आध्यात्मिक अनुभूती देणारे* स्वतंत्र प्रकरण आहे. संत रचनेमध्ये विरहिणी किंवा विराणी हे एक वेगळाच प्रकार आहे. लौकिकार्थाने पहायला गेले तर *प्रियकराच्या दर्शनला पारखी* झालेली किंवा त्याच्या *विराहाने झुरणारी प्रिया* म्हणजे *विरहिणी.* ती ज्याप्रमाणे दिनरात केवळ आपल्या प्रियाच्या नामाचा जप करत असते, तद्वत संत दिनरात केवळ आपल्या देवाच्या नामाचा जप करत असतात. त्या देवाच्या दर्शनासाठी त्यांचे आर्त मन जेव्हा साद घालते त्यातून निर्माण होते ती विराणी. भगवंताच्या विरहाच्या अनुभूतीला जेव्हा भक्तिरसाच्या आर्ततेची भावना मिसळून जाते त्यातून निर्माण होणारी अलौकिकता या विरहिणीतून व्यक्त होते. विराण्या मनाला स्पर्श करुन जातात. मनात एक हळवेपणाची भावना निर्माण करतात. आज आपण माऊली ज्ञानेश्वरांची एक विराणी पाहू या.

*पैल तो गे काऊ कोकताहे । शकूनगे माये सांगतसे ॥१॥*
*उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानें मढीन पाऊ । पाहुणे पंढरीराऊ घरा कैं येती ॥२॥*
*दहिंभाताचीं उंडी लाविन तुझ्या तोंडी ॥ जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगीं ॥३॥*
*दुधें भरुनी वाटी लावीन तुझे वोंठी । सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥*
*आंबयां डाहाळीं फ़ळें चुंबी रसाळीं । आजिचेरे काळीं शकून सांगे ॥५॥*
*ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें । भेटती पंढरीराणे शकून सांगे ॥६॥*

आपल्या लहानपणीच्या गोष्टी सगळ्यांनाच आठवत असतील. दारावर कावळा काव-काव करायला लागला की घरतली मोठी स्त्री, आज घरी कुणी पाहुणा येणार असे सहजच म्हणून जायची. जणू काही येणाऱ्या पाहुण्यांचा निरोप घेऊन हा काऊ आपल्या दारी आलेला आहे असे मानायची. याच कल्पनेचा उपयोग माऊलींनी आपल्या या विराणीत अतिशय सुंदरपणे केला आहे.

माऊलींची शब्द प्रतिभा फारच अफाट आहे. आपल्या अभंगातून त्यांनी ती ठिकठिकाणी दाखवून दिली आहे. कावळा हा शब्द काव्यात उच्चारताना थोडा जडच जाणार म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक ‘काऊ’ हा शब्द वापरला आहे. काऊ शब्द ऐकताना चिऊ काऊची आठवण आल्याशिवाय रहात नाही. कोणीतरी अत्यंत जवळचे आपल्या जवळ आहे अशी भावना मनात येते. या शब्दातून मनात एक जिव्हाळा, आपुलकीचे नाते निर्माण होते.

असाच एक ‘काऊ’ पलिकडे काव-काव करतो आहे. हा कावळा साधा सुधा नाही, हा निरोप आणण्याचे काम करतो. त्याच्या या ओरडण्यातली कर्कशता ही मनाला त्रासदायक नाही तर ती हवीहवीशी वाटणारी आहे म्हणून इथे ‘कोकताहे’ असा शब्दप्रयोग माऊलींनी केला आहे.

कोणतीही चांगली गोष्ट घडण्यापूर्वी काही संकेत मिळत असतात. त्यालाच आपण शकून म्हणतो. या भक्ताला आस आहे ती त्याच्या भगवंताच्या दर्शनाची. तो सतत पंढरी रायांची आराधना करत आहे. आणि भक्तांच्या हाकेला ओ देणारा देव म्हणून पंढरीरायांची ख्याती आहे. कावळ्याचे हे ओरडणे हा फारच चांगला शकून आहे असे त्याच्या मनाला वाटते आहे. काऊ आपल्याला ओरडून पंढरी रायांच्या आगमनाची सुचना तर देत नाही आहे ना? त्यांच्या येण्याचा हा शकून तर नाही ना? अशी दाट शंका त्याच्या मनात निर्माण झाली आहे. माऊलींना भगवंतांखेरीज कोणतीही गोष्ट प्रिय नसल्याने त्यांना साधा कावळा ओरडला तरी तो शकून वाटतो आहे.

ज्याची आतुरतेने वाट पहातो आहे त्या पंढरीरायांच्या येण्याची खबर तु घेऊन आला आहेस तर आता मला सांग की ‘ते कधी येणार आहेत?’ आपल्या भगवंताच्या येण्याची खबर मिळाल्यामुळे भक्त इतका खुश झाला आहे की त्या काऊला कुठे ठेऊ असे त्याला झाले आहे. तो मनाला उत्साह देणारी बातमी घेऊन आला आहे म्हणून त्याचे पाय ती सोन्याने मढवायला तयार आहे.

पूर्वीच्या काळी घरी आलेल्या जिव्हाळ्याच्या माणसाला रस्त्यात कोणा दुष्टाची नजर लागली असेल तर ती घरात यायला नको म्हणून दरवाजातच त्याची दही भाताचा ओवाळून टाकून त्याची दृष्ट काढली जात असे. हा दहीभात कावळ्यांसाठीच असायचा. माझ्या आवडीच्या व्यक्तीची माझ्या मनाला भावेल अशी खबर तु मला सांग मी तुला दहिभाताची उंडी देईन.

मला माहिती आहे तु माझ्या विठूरायांचा निरोप घेऊन आला आहेस, तरी माझ्या मनाचे समाधान व्हावे म्हणून मला परत एकदा सांग ’माझा विठू येणार आहे’ तु आता दही भात खाऊन कंटाळला असशील मी तुझ्या ओठी दुधाची वाटी लावते. लवकर मला प्रिय असलेली विठ्ठलाच्या आगमनाची वार्ता सांग.

झाडावरचे रसाळ आंबे पिकले आहेत, तु हे रसाळ आंबे खाऊन घे. अन आंब्याचा रस पिऊन गोड झालेल्या तुझ्या रसाळ वाणीने आत्ताच तु मला माझ्या पंढरी रायांच्या आगमनाचा शुभ शकून दे. येत्या प्रत्येक दिवशी माणूस अत्यंत शुल्लक गोष्टींसाठी झुरतो आहे, तिथे माऊली किती उत्कटतेने आपल्या भगवंताची आराधना करत आहेत. किती विरोधाभास आहे. त्यांच्या मनात चाललेली खळबळ किती प्रभावीपणे अचूक शब्दांत व्यक्त केली आहे माऊलींनी.

श्रद्धेने तळमळीने ईश्वर आराधना करा. कोणतीही इच्छा मनात न ठेवता त्याचा धावा करा तो तुम्हाला नक्की भेटणार. माऊली ज्ञानेश्वर सांगतात खऱ्या श्रद्धेने भक्ति केली तर नक्कीच तुम्हाला पंढरीचा राणा भेटणार आहे. नामस्मरणात मोठी टाकत आहे. खऱ्या श्रद्धेने तुम्ही नामस्मरण करा. तुम्हाला तुमचा भगवंत खरोखरच भेटेल.

*| श्री पांडुरंग चरणार्पणमस्तु |*

*|| रामकृष्ण हरि ||*

*लेखक, संकलक: डॉ. (नरू) भाऊ कदम. ९८६९०६१८८९*
*सुलेखनकार: डॉ. तेजस वसंत लोखंडे. ७५०६१०५१२५*

#वारी_जनातली_जनांच्या_मनातली
#गुंजन_गौळणींचे
#वारी #वारकरी #गवळण

.lokhande

*ही पोस्ट नावासकट पुढे प्रसारीत करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही.*

20/07/2026

*वारी जनातली, जनांच्या मनातली......सिझन ७*

*“गुंजन गौळणीं”चे अर्थात “संत साहित्यातील गौळण”*

*आषाढ शुद्ध सप्तमी, दिनांक २० *जुलै २०२६.*
*ज्ञानेश्वर माऊली वारी आजची वाटचाल*
*प्रस्थान: नातेपुते; मुक्काम: माळशिरस.*

भागवतातील गौळण दर्शन हे *लौकिक जगाकडून अलौकिक जगाकडे* जाण्याचा मार्ग आहे. गोपींचा मार्ग हा ज्ञानापेक्षा कोरडा नसून *प्रेमाने ओथंबलेला ज्ञानमार्ग* आहे. म्हणूनच, संतांच्या या गौळणी जनतेच्या *हृदयाच्या जवळ पोहोचल्या.* वर्षानुवर्षे तपस्या करून जे ज्ञान मिळत नाही, ते *गोपींनी आपल्या उत्कट भक्तीने सहज साध्य केले.*

श्रीमद्भागवत पुराणातील ‘गौळण दर्शन’ हे केवळ एखादे शृंगारिक किंवा लौकिक कृत्य नसून, ते वेदान्त आणि *भक्ती संप्रदायातील सर्वोच्च, सखोल तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे.* वरवर पाहता गोपी आणि श्रीकृष्ण यांच्यातील नाते हे सामान्य स्त्री-पुरुषासारखे वाटू शकते, परंतु त्यामागे *जीवात्मा आणि परमात्मा यांच्या मीलनाचे अथांग तत्त्वज्ञान दडलेले आहे.* गौळणीत जीवात्मा आणि परमात्मा यांचे *'अद्वैत' साध्य होते आहे.*

गोपिकांची रासलीला हे मिलनाचे प्रतीक आहे. जेव्हा श्रीकृष्ण वेणूनाद करीत असतो, तेव्हा गोपी संसाराची सर्व बंधने झुगारून बासरीच्या सुरावटीला भुलून जात होत्या. माणसाला जेव्हा आत्मज्ञानाची किंवा दैवी नादाची अनुभूती येते, तेव्हा संसाराची सर्व मायावी बंधने गळून पडतात. हेच बासरीच्या या रूपकातून दिसून येते. रासलीला ही अद्वैत स्थितीची प्रतीक आहे. *‘जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव.’* प्रत्येक गोपीची आंतरिक इच्छा होती की कृष्णाने फक्त तिच्याच सोबत नाचावे. कृष्ण कुणालाही नाराज न करता, प्रत्येकी सोबत नाचत त्यांची मनोकामना पूर्ण करतो. याच्या मागील तत्त्वज्ञान असे सांगते की ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. गोपिकांच्या मनाच्या अवस्थेमुळे त्यांना कृष्ण सहवासाचा अनुभव मिळत होता.

भागवतातील एकादश स्कंधातील अध्याय २९ ते ३३ हे शृंगार वर्णनाने नटलेले आहेत, तर अध्याय ३१ ते ३३ या अध्यायात रासक्रीडेचे वर्णन आले आहे. वास्तविक पहाता रासक्रीडेचे वर्णन शृंगारात्मक वळणाने केल्यामुळे त्यातले अध्यात्म लोकांपुढे फारसे आले नाही. रासक्रीडेचे मूळ तत्त्व आणि आध्यात्मिक रुप समजून घेताना कृष्णलीला ग्रंथातील या ओळी महत्त्वपूर्ण माहिती पुरवतात. *“रसो वै स: |”* याचाच अर्थ, *“ईश्वर रसरूप आहे”.* अशा ईश्वरशी तादात्म्य पावणे म्हणजे रास होय, परमात्मा आणि जीवाचे मिलन म्हणजेच रास होय, भक्तांच्या भक्तिरसात्मक कवनातून हे साध्य केले जाते.

भागवताच्या टीकेत रासक्रीडेच्या महतीची, पवित्र्याची एक कथा सांगितली जाते. ब्रह्मादी देवांचा पराभव झाला तेव्हा कामदेवांचा अहंकार जागा झाला. त्याने कृष्णाला युद्धाचा प्रस्ताव मांडला. कामदेव कृष्णाला म्हणाला की रामावतारात तु मर्यादा पुरुषोत्तम होता, एकपत्नीव्रत पालन केले होते त्यामुळे तुझ्यावर माझा प्रभाव पडला नाही. कृष्णावतारात आपण कोणत्याही मर्यादांचे पालन करीत नाही आहात, मला आपला सहज पराभव करता येईल, ‘आपण शरद पौर्णिमेच्या रात्री व्रजनारींबरोबर विहार करा. मी त्यावेळी मदनबाण सोडेन, आपण निर्विकार राहिला तर विजय आपला आणि कामाधीन झाला तर विजय माझा.’

व्रजनारींबरोबर वृंदावनात विहार करत असताना मदनाने सोडलेल्या बाणाचा काहीही असर गोपी-कृष्णावर झाला नाही. रासक्रीडेत गुंग असलेल्या कृष्ण गोपिकांना वास्तव जगाचे भान नव्हते. त्यांच्यातील द्वैत नष्ट होऊन अद्वैत निर्माण झाले होते, कृष्ण गोपिकांबरोबर विहार करत असताना त्याचे मन पूर्णपणे निर्विकारी होते. त्यामुळे विषयाची कोणतीही भावना त्याच्या मनात नव्हती. त्यामुळे मदनाच्या बाणाला त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही. कामदेवाचा पराभव झाला. मुळात असे अद्वैत साधणे हे या शृंगाराचे उद्दिष्ट आहे. पण सर्वसामान्य याकडे केवळ शृंगार या भावानेनेच पहातात.

इथे असाही प्रश्न उपस्थित केला जातो, की कृष्णाने सर्व गोपीना सोडून एकांतात समाधी अवस्थेत बसून संयमांचे पालन केले असते, तरी त्याने कामावर सहज मात केली असती. परंतु कृष्णाने वृंदावनातील गोपक्रीडेमध्ये आणि रासक्रीडेमध्ये अगणित सौंदर्यवतींच्या सानिध्यात राहूनही कामाचा पराभव केला हे एक न सुटणारे कोडे आहे. तुकाराम महाराज या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात,

*तुका म्हणे नटधारी | भोग भोगूनी ब्रह्मचारी ||*
*नवल केवढे केवढे | न कळे कान्होबाचे कोडे ||*

भागवताच्या टीकेत कृष्णाची वेणू दोन प्रकारची होती, असे म्हटले आहे. एक *‘वेणूगीताची* ’ तर दुसरी *‘रासक्रीडेची’.* वेणूगीताची बासरी पशू, पक्षी, नदी या सगळ्यांना ऐकू येत होती तर रासलीलेची बासरी ईश्वराच्या मिलनाला आतुर झालेल्या गोपिकांना ऐकू येत होती. श्रीकृष्णाच्या मनात गोपींना व्यभिचाराचा अल्प संस्कारही लागू नये, म्हणून तो सुस्वर गायनाने आधी त्यांचे मन हरण करुन घेत होता आणि मग रासक्रीडेची सुरुवात होत होती. कृष्णाने अगोदर मन हरण केल्यामुळे त्यांची वृत्ती पालटून जात होती आणि त्या देहातीत होऊन त्या भागवंतांशी एकरूप होत होत्या.

वेणूच्या विषयाला अनुसरून आपण वेणूची गौळण पाहू या. एकनाथ महाराजांना या वेणूचा फार मोह पडला होता. त्यांनी या वेणूवर अनेक गौळणी लिहिल्या त्यातील ही एक अत्यंत रसाळ गौळण आहे.

*भुलविले वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदे ॥१॥*
*पांगुळले यमुनाजळ । पक्षी राहिले निश्र्चळ ॥२॥*
*तॄणचरे लुब्ध झाली । पुच्छ वाहुनिया ठेली ॥३॥*
*नाद न समाये त्रिभुवनी । एका भुलला जनार्दनी ॥४॥*

श्रीकृष्णाच्याने ‘वेणूनादाची’ दिव्य बासरी ओठांना लावून जेव्हा छेडली, तेव्हा त्या बासरीच्या मधुर सुरांनी संपूर्ण चराचर सृष्टीला भुरळ पाडली. हा केवळ संगीताचा नाद नव्हता, तर तो ईश्वरी नाद (नादब्रह्म) होता, ज्याने ऐकणाऱ्या प्रत्येकाला स्वतःचे भान विसरायला लावले.

श्रीकृष्णाच्या वेणूनादाचा प्रभाव सजीव आणि निर्जीव सृष्टी अशा दोन्हीवर सारखाच झाला. सतत वाहणे हा गुणधर्म असणारे यमुना नदीचे पाणी बासरीच्या सूरांनी इतके थक्क झाले की ते आपला वाहण्याचा गुणधर्म विसरून जागच्या जागी स्तब्ध झाले. नभी विहार करणारे खग गोविंदाच्या मुरलीच्या रवाने पंख हलवायचे विसरुन आकाशी एका जागी निश्चल झाले आहेत.

सारेच तृणचर पशू बासरीच्या या आवाजाने मोहित झाले आहेत. शांत बसले असताना रवंथ करण्याची त्यांची क्रिया ही थांबली आहे. इतकेच नव्हे तर सतत हालत असणाऱ्या त्यांच्या शेपटयाही त्यांनी हलवायच्या थांबवल्या आहेत. प्राण्यांची चंचलता पूर्णपणे नष्ट होऊन ते एकाग्र झाले.

या बासरीचा नाद इतका अथांग आणि व्यापक आहे की तो तिन्ही लोकांत (त्रिभुवनात) मावेनासा झाला आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात संत एकनाथ महाराज म्हणतात की, या वेणूनादाने संपूर्ण जगाला तर भुलवलेच आहे, पण मी (एका) सुद्धा माझ्या सद्गुरू 'जनार्दन' स्वामींच्या चरणी आणि या कृष्णाच्या नादात पूर्णपणे हरवून गेलो आहे, मला स्वतःचेही भान राहिलेले नाही.

संत वाङ्मयात श्रीकृष्णाची बासरी हे सद्गुरूंच्या उपदेशाचे किंवा आत्मनादाचे (अनाहत नादाचे) प्रतीक मानले जाते. या बासरीच्या नादाने मन स्थिर होते यमुनेच्या पाण्याचे रुपक वापरुन महाराजांनी ही संकल्पना सांगितली आहे. याचा अर्थ भगवंताच्या भक्तीत मनाची सर्व चंचलता आणि वासना गळून पडतात. ईश्वराच्या चरणी समाधी अवस्था प्राप्त होते. यासाठी योजलेली रुपके म्हणजे प्राण्यांनी शेपूट स्थिर करणे आणि गवत तोंडातच राहणे हे बाह्य प्रपंचाचे विस्मरण होऊन 'समाधी अवस्था' प्राप्त होण्याचे लक्षण आहे.

*| श्री पांडुरंग चरणार्पणमस्तु |*

*|| रामकृष्ण हरि ||*

*लेखक, संकलक: डॉ. (नरू) भाऊ कदम. ९८६९०६१८८९*
*सुलेखनकार: डॉ. तेजस वसंत लोखंडे. ७५०६१०५१२५*

#वारी_जनातली_जनांच्या_मनातली
#गुंजन_गौळणींचे
#वारी #वारकरी #गवळण

.lokhande

*ही पोस्ट नावासकट पुढे प्रसारीत करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही.*

19/07/2026

*वारी जनातली, जनांच्या मनातली......सिझन ७*

*“गुंजन गौळणीं”चे अर्थात “संत साहित्यातील गौळण”*

*आषाढ शुद्ध षष्ठी, दिनांक १९ जुलै २०२६.*
*ज्ञानेश्वर माऊली वारी आजची वाटचाल*
*प्रस्थान: बरड; मुक्काम: नातेपुते.*

पंढरीच्या वाटेवर चालणारे वारकरी दिवसभर आपापल्या फडाने ठरवून दिलेले अभंग गात असतात. गायल्या जाणाऱ्या अभंगाचा ठराविक क्रम सर्वमान्य आहे. प्रत्येक अभंग तन्मयतेने गायला जातो. जेव्हा गौळणींना सुरवात होते तेव्हा वारकऱ्यांचा चेहरा अधिक खुलतो. त्यांच्या पदन्यासात गती येते. अंगात स्फुरण चढते आणि गौळणीच्या तालावर फुगडी, हुतूतू, हमामा यासारखे निरनिराळे खेळ खेळून वारकरी आपला आनंद व्यक्त करतात.

गौळणीतील *रुपकांचा अर्थ (Metaphorical Meaning)* आपण जाणून घेऊ. गौळणीतली ' *मथुरा'* हे *संसाराचे प्रतीक* आहे. *बाजारहाट करण्या निघालेली गवळण* हा *जीवात्मा* आहे. गोपीका मथुरेच्या बाजारत घेऊन जात असलेले *'दही-दूध'* हे *विषय-वासनेचे प्रतीक* आहे. प्रपंच करून परमार्थ साधणे, ही फार कठीण गोष्ट आहे. *जीवातत्म्याच्या* ईश्वर भक्तीच्या कामात भौतिक जीवनातले अनेक अडथळे बाधा निर्माण करतात. गोपिकांच्या वाटेत अडथळा आणणारा, बासरी वाजवणारा *श्रीकृष्ण हा परमात्मा (ईश्वर)* आहे. आणि तोच या अडथळ्यांनी त्यांची परीक्षा घेतो आहे
*'मथुरेचा बाजार'* हा *कर्मकांडाचा व संसाराचा बाजार* आहे.

गौळणीच्या कवनांमधून संसारिक शृंगार आणि विरह दिसून येतो. हा केवळ *लौकिकातला स्त्री-पुरुषांमधील प्रणय नसून,* तो जीवाचा *ईश्वरासाठी होणारा विरह (आर्तता)* आणि *मिलन* यांची आध्यात्मिक अनुभूती आहे.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि प्रामुख्याने संत एकनाथांनी गौळणींना *आध्यात्मिक रूप दिले.* संसारिक रूपकांचा वापर करून सामान्य जनतेला सहज समजेल अशा भाषेत उच्च अध्यात्म व प्रबोधन करुन समाजोन्नती करण्याचा प्रयत्न केला.

नटखट कान्हा गोपिकांची अनेक प्रकारे छेडखानी करतो. गवळणी साऱ्या घटनांची यशोदेकडे लटक्या रागाने तक्रार करतात. याचाच अर्थ असा की, परमेश्वराच्या प्रेमात पडल्यावर संसाराच्या सर्व माया-बंधनांचा विसर पडतो, आणि जीव सर्वस्वाचा त्याग करून देवाला शरण जातो. गवळण ही केवळ गावळणींची कथा नसून ती *मानवी आत्म्याच्या ईश्वराकडे जाणाऱ्या प्रवासाचे व भक्तीचे रूपक (Metaphor) आहे.* या मार्गावरच्या अनेक संत पथिकांनी आपल्या अवीट अभंगातून आत्म्याशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न केला आहे.

गौळणीच्या अंतःरंगात अध्यात्म, भक्ती आणि आत्मसमर्पण यांचा सखोल अर्थ दडलेला आहे. *अर्थाच्या या दुहेरी पदरामुळेच गौळण हे मराठीतील एक प्रभावी रुपक काव्य मानले जाते.* अशाच एका गौळणीचा आज आपण रसास्वाद घेऊ. कृष्णाच्या भेटीसाठी आतुर असलेल्या त्याच्या प्रेमिकेच्या मनाची अवस्था *विष्णूदास नाम्याने* किती तरलतेने या गौळणीत वर्णन केली आहे.

नामसाधर्म्यामूळे अनेकदा व्यक्ती-व्यक्ती मध्ये गल्लत केली जाते. *‘विष्णुदास नामा’* आणि *‘संत नामदेव’* यांना अनेकजण एकच मानतात. *विष्णुदास नामा* ही नामदेवांची *‘नाममुद्रा’* आहे असे म्हटले जाते. म्हणून अनेक ठिकाणी अनेकांनी ‘विष्णुदास नामा’ बदलून ‘नामा म्हणे’ अशी दुरुस्त करुन घेतली आहे.

नामसाधर्म्यामूळे विस्मरणात गेलेल्या संतांची ही *अवीट, अमीट* रचना. आजही या कवनाची सुरावट कानावर आली की आपसूक मान डोलायला लागते. विष्णुदास नामाची *‘रात्र काळी घागर काळी’ ही* एक गौळण अनेक ठिकाणी संत नामदेवांची आहे असे चुकीचे शिक्कामोर्तब झाले आहे. असो, याचे मूळ रचनाकार कोण या वादात आपण न पडता या श्रेष्ठ रचनेचा रसास्वाद घेऊ या,

*रात्र काळी घागर काळी | यमुनाजळें ही काळी वो माय ||१||*
*बुंथ काळी बिलवर काळी | गळां मोतीं एकावळी काळी वो माय ||२||*
*मी काळी कांचोळी काळी | कांस कांसिली ते काळी वो माय ||३||*
*एकली पाणीया नच जाय साजणी | सवे पाठवा मूर्ति सांवळी वो माय ||४||*
*विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी | कृष्णमूर्ति बहु काळी वो माय ||५||*

या गौळणीत *अभिसारिकेच्या* मनाची व्यथा *‘विष्णूदास नाम्याने’* अत्यंत भावपूर्ण शब्दांत मांडली आहे. प्रियकराच्या भेटीची ओढ तिच्या प्रत्येक कृतीतून जाणवून येते आहे. या गुप्त भेटीची कोणालाही चाहूल लागू नये म्हणून ती घेत असलेली दक्षता आणि सर्वात शेवटी प्रियकराच्या भेटीची आस प्रत्येक शब्दातून उत्कटतेने दिसून येते. हे शब्दसौंदर्य अभंगातील प्रत्येक ओळीत दिसून येते.

गौळणी लिहिताना संतांच्या लेखणी फारच खुलतात. एकनाथांचे समकालीन *‘विष्णूदास नामा’* यांनी शब्दातून नाथांइतकेच काव्यसौंदर्य त्यांनी खुलवले आहे. प्रियकराच्या भेटीची उत्कटता आणि आस या दोन्ही गोष्टी तीला साध्य करता येईल. प्रियकराच्या भेटीची वेळही तिने जाणीवपूर्वक काळ्याकाजळ रात्रीची ठरवली. जेणेकरून त्यावेळेस कोणी पहाणार नाही. घरातून बाहेर पडण्याचे निमित्त म्हणून तीने पाण्याचा घडा घेतला आहे. यमुनेकडे जाणारी ही मूर्ती कोणालाही दिसू नये म्हणून घागरही काळीच घेतली आहे.

वर्णन केलेले सगळंच किती विलक्षण आणि नाट्यमय आहे ना? चेहऱ्यावरून ओळख पटू नये म्हणून तिने घेतलेली *बुथींही* (चेहरा झाकण्याचे तलम वस्त्र, आजच्या भाषेतली ओढणी) काळीच आहे. *गळ्यातला एकसर, कानातले बिलवर, अंगातली चोळीही काळी आहे, इतकेच नव्हे तर नेसलेली साडी (कांस कासिली) काळीच आहे.*

*खरी मेख इथेच आहे.* प्रियकराची आपली भेट कोणालाही समजू नये म्हणून, एवढा सगळा कृष्णवर्णी साजशृंगार करुन निघलेली ही नारी तर चक्क गोरी आहे. *तिच्या रंगाचा उजाळपणा अंधारात हो कसा लपणार?* आता हो काय करायचे? पण तिच्याकडे यावरही तोडगा आहे. तिला भेटीची इतकी उत्कट आस आहे की ती गोरीपान असून म्हणते, माझ्या सावळ्याच्या भेटीस निघालेली मी ही काळीच आहे. आणि म्हणून मी या अंधारात सहज लपून जाईन.

तिच्याच उत्तराने तिचे समाधान तर झालं. काळ्या यमुनेला जाताना कोणी पहाण्याचा प्रश्नही सुटला. *मग अवचित हे थांबणं का?* तिला तिच्या देवासोबत (सावळ्याच्या सोबतीने यमुनातीरी जायचे आहे). मनातल्या भीतीचे कारण देऊन ती सावळ्याची वाट पहाते आहे. त्या सावळ्याला पाठवा ना सोबतीला अशी इतर गोपिकांना विनवणी केली आहे. किती सुंदर रीतीने विष्णूदास नाम्याने शब्दरचना केली आहे. *प्रेयसीला प्रियकराच्या सहवासाची वेळ नेहमीच अपुरी वाटत असते.* त्यामुळे यमुनेच्या तिरी जाण्यायेण्याचा जो वेळ आहे तो वेळही तिला दवडायचा नाही. या वेळातही तिचा प्रियकर तिच्या सोबत हवा म्हणजे त्याचा सहवास अधिकाधिक मिळेल.

स्वत:ला चक्क काळी म्हणताना, सावळ्या कृष्णापेक्षा आपण काळ्या आहोत हे ती बिंबवण्याचा प्रयत्न करते आहे. ‘कृष्णा’ला तिने सावळा म्हटलेले विष्णुदास नामांना अजिबात पसंत नाही. सावळ्याची खुशमस्करी न करता ते स्पष्ट सांगतात, माझी स्वामिनी नुसती काळी नाही तर बहु-काळी आहे. काळा वर्ण कृष्णाला वर्जित नाही. तो विठ्ठल-रखुमाई च्या रुपाने पंढरीत फेऱ्या मारतोय, भक्तांची काळजी करतोय.

*शब्दसौंदर्य, नादसौंदर्याने* नटलेले हे गौळण काव्य आहे. यातील रुपकाचा *आध्यात्मिक अर्थही* आपण जाणून घेऊ. अभंगातील *काळी अंधकारमय रात्र* , हे संपूर्ण *विश्वाचे प्रतीक* आहे. कृष्ण मिलनाला आतुर *अभिसारिका* म्हणजे *भगवंतावरती अपार प्रेम करणारा भक्त.* *धारण केलेली वस्त्रं, अलंकार* हे सारे आपल्या *नश्वर शरीराचे प्रतीक* आहे. आपल्या या घागरीत ईश्वरभक्तीचे पाणी हवे तर सोबतीला ती काळी मूर्ती हवी. म्हणजेच ईश्वराचा सहवास हवा.

या सावळ्या मूर्तीचे वेड लागले की माणसाला काही सुचत नाही. तो म्हणू लागतो,
*सावळ्या विठ्ठला तुझे रे मला वेड लागले | वेड लागले, मला वेड लागले ||*
*घरात मन हे रमत नाही | चित्त कशातच जुळत नाही || तुझ्या दर्शनासाठी विठ्ठला पाय हे निघाले ||*

*| श्री पांडुरंग चरणार्पणमस्तु |*

*|| रामकृष्ण हरि ||*

*लेखक, संकलक: डॉ. (नरू) भाऊ कदम. ९८६९०६१८८९*
*सुलेखनकार: डॉ. तेजस वसंत लोखंडे. ७५०६१०५१२५*

#वारी_जनातली_जनांच्या_मनातली
#गुंजन_गौळणींचे
#वारी #वारकरी #गवळण

.lokhande

*ही पोस्ट नावासकट पुढे प्रसारीत करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही.*

Address

Ksh*tij, Plot No D42, Sector 12, Kharghar
Navi Mumbai (New Mumbai)
410210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वारी जनातली, जनांच्या मनातली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category