22/11/2025
पालखीसह पदयात्रेचा तिसरा दिवस. श्री कडव व श्री कांबळेपरीवारांकडील दुपारचा महाप्रसाद व विश्रांती घेऊन ३.०० वाजता पदयात्रेला सुरुवात झाली ती श्री स्वामी समर्थ महाराज मठ, संत श्री शितोळेबाबा दरबार असल्फा ते श्री क्षेत्र अक्कलकोट ह्या ५५० किमी अंतरातील *महत्वाचा टप्पा खंडाळा घाट* पार करण्यासाठी. घाट चढायला सुरुवात करते वेळी श्रीफळ वाढवून गजर करुन सर्व पदयात्री व दरबारातून आलेल्या भक्तांनी आणि खास करून घाटाचा अवघड टप्पा पार करून देण्यासाठी पिंपरी पेढार-आळेफाटा येथून आलेले श्री बाळासाहेब कुटे ह्यांच्यासह घाट चढायला सुरुवात केली. अंगावर येणारी चढण आणि नागमोडी वळणे प्रत्येकालाच आव्हान देत होती. परंतु श्री स्वामी समर्थ, संत श्री शितोळेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, बजरंग बली व हरहर महादेव हे गजर सर्वांची हिंमत वाढवत होते. वातावरण थंड असूनही सर्व घामाने भिजून गेले होते. शिंग्रोबाचा टप्पा जोशात, जोमात पार करणे हाच उद्देश. आणि तो उद्देश सफल झाला तो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने संत श्री शितोळेबाबांच्या आशिर्वादाने..... आणि सर्वांनी एकच गजर केला *शिंग्रोबाच्या नावानं चांगभलं*.
शब्दात व्यक्त न होण्यासारखा हा अनुभव.
खास कौतुक छोटा ऋषी, बर्थडे गर्ल सानवी व स्वराचं. ऋषी आणि स्वराने दुपारचा पुर्ण टप्पा पायी पार केला हेही तितकेच महत्त्वाचे. *"अशक्य ही शक्य करतील स्वामी "* पण कधी तर आपली स्वतःची इच्छा पण तेवढी अढळ असेल तेंव्हा. आपल्या मनातून भिती गेली की *" घाबरु नकोस, सर्व काही ठीक होईल"* ह्या श्री बाबांच्या वचनांची सुद्धा अनुभुती येते. प्रसंग कितीही बाका असू द्या, *" कर्ता करविता सर्व तुम्हीच आहात "* असं एकदा म्हटलं की आपण त्यातून सहिसलामत बाहेर पडतो हे निश्चित.
*"अखंड नामस्मरण "* ही कालच्या दुपारच्या टप्प्याची जमेची बाजू. आणि ह्यासाठी तरुण भक्त मंडळींचे खास कौतुक. नामस्मरणात किती ताकत असते हे श्रावण महिन्यात *"त्या अकरा जणांनी "* अगदी जवळून अनुभवलंय, आणि आपण फक्त ऐकूनच अचंबित झालो होतो.
कुटेदादा व साई ह्यांची पायात चप्पल न चालता पुर्ण टप्पा जास्तीत जास्त वेळ पालखी वाहून नेण्याची तळमळ मनाला भावून गेली. आपण पुर्णपणे समर्पित झालो की त्याचे फळही तितकेच गोड, मधूर असते. हेच समर्पण, समर्पित भाव पदयात्रींना पालखी वाहून नेण्यास बळ देतो.
काल जो तो धावत होता, पण कुणाच्याही मनात *" जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही "* हेच होतं. तरी पण जो तो धावत होता. आपली आत्मिक शक्ती प्रबळ असेल तर वैश्विक शक्ती अगदी भरभरून साथ देते.
*श्री स्वामी समर्थ जय शितोळेबाबा*
🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏