21/04/2026
*नामस्मरण दौरा - कोकण*
शुक्रवार दि.१७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता भक्तांना घेऊन बस दोन दिवसांच्या नामस्मरणाच्या दौ-यावर निघाली. कोकणात पहिल्यांदाच सामुदायिक नामस्मरण कोकणस्थ भक्त मंडळाच्या आग्रहाखातर श्री स्वामी समर्थ महाराज मठ, व संत श्री शितोळेबाबा चॅरिटेबल (दरबार) ट्रस्टच्या माध्यमातून व श्री धैर्यशिलदादा शितोळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
शनिवार दिनांक १८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता दौ-यातील पहिल्या नामस्मरणाची सुरुवात श्री आशिष राजकुमार चव्हाण, लांजा, येथून झाली. संपूर्ण रात्रभर प्रवास करूनही नामस्मरण अगदी उत्साहात संपन्न झाले.
नियोजित कोंबेवाडीला पोहचण्याआधीच राजापूर येथे २०१९ सालीच्या पदयात्री अर्चनाताई जाधव यांच्या घरी अचानकपणे पादुका व मुखवटे घेऊन जाणे झाले. त्यांच्या घरी जप आणि आरती करून पुढच्या प्रवासाला निघालो.
श्री हरिश्चंद्र पुजारी यांच्या घरी पादुका पुजन, नामस्मरण आरती केली व महाप्रसाद घेऊन श्री बाळकृष्ण दस्तुरी यांच्या घरी पादुका व आरती केली. विशेष गोष्ट म्हणजे श्री पुजारी व श्री बाळकृष्ण दस्तुरी त्यांच्या वाडीतील स्वामी भक्त मोठ्या संख्येने सकाळपासून पादूकांची आतुरतेने वाट पाहत होते. हे आपण श्री पुजारींच्या प्रतिक्रियेमध्ये वाचलेले आहे.
पुढचा प्रवास कसार्डे कनकवलीकडे सुरू झाला. आता आपण रितेशच्या घरी जाणार, असं गृहीत धरून प्रवास सुरू होता. पण ही पादुका, नामस्मरण दिंडी पोहचली रितेशच्या आजोळी. जसं जसं घर जवळ येत होतं तसा आम्हाला ढोल ताशांचा आवाज ऐकू आला. वाटलं वेगळा काही कार्यक्रम असेल. पण ही तयारी पादुकांच्या स्वागतासाठी होती. गाडीसमोरच येऊन सर्व गावकऱ्यांनी आम्हाला आनंदाचा धक्काच दिला. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक रितेशच्या आजोळी पोहचली. तिथे जप, आरती केली. विशेष म्हणजे इथे पण गावकऱ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. 'रितेशला वादनाचं बाळकडू कुठून मिळालं' याचं कोडं त्याच्या मामांकडून सुटले. कारण ढोल ताशा पथक घेऊन रितेशचे मामा स्वतः वाजवत श्री स्वामी समर्थ महाराज व संत श्री शितोळेबाबांच्या पादुकांचे स्वागत करत होते. इथेच आम्हाला रात्रीचे अकरा वाजून गेले होते. आणि आजच्या दिवसातलं शेवटचं नियोजित नामस्मरण बाकी होतं. कोमलताई माजगावकर दादांना सतत फोन करून सांगत होत्या की कितीही उशीर झाला तरी चालेल, पण तुम्ही पादुका घेऊन सर्वांनी या. हे अंतर जवळचं होतं म्हणून आम्ही लवकरच त्यांच्या घरी पोहोचलो. तिथेही पादुका पुजन, जप व आरती केली. दर्शनासाठी आलेली भक्तमंडळी एवढ्या उशिरापर्यंत वाट पाहत होती. हे पाहून रात्रीचा प्रवास, दिवसभरात पादुका पुजन, नामस्मरण आरती व प्रवासाची आम्हालाही हुरूप आला. कोमलताईंकडे त्या दिवसातील शेवटचा सोहळा संपन्न करून आमची दिंडी सावंतवाडी येथे मुक्कामासाठी श्री संदेश मुळीक यांच्या घरी रात्री दिड वाजता पोहोचली. हे कुटुंब एवढ्या रात्री पादुकांचे स्वागत करण्यासाठी वाट पहात होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सर्वच तयार झाले. महिलामंडळींनी लवकर उठून सुवर्णाताईंना नामस्मरणाच्या पुर्वतयारीसाठी मदत केली. पादुका पुजन नामस्मरण बरोबर १०.५५ वाजता सुरू झाले. पुढे सामुदायिक नामस्मरण, जप, आरती, भजन केले. महाप्रसाद घेऊन मुंबईला परतीच्या प्रवासाला निघतांना श्री मुळीक यांच्या काकांच्या घरी पादुका पुजन जप व आरती केली.
*श्री स्वामी समर्थ माऊली व सिद्धेश्वर संत शितोळेबाबांनी ह्या दौऱ्याचा शेवट गोड कसा होईल याची स्क्रिप्ट बहुधा आधीच लिहून ठेवली होती. सकाळपासून सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करणा-या ताईंनी हे सर्व पाहून दादांना आग्रह केला की तुम्ही पादुका घेऊन माझ्या घरी या. त्यांच्या शब्दात "तुम्हाला माझ्या घरी पादुका घेऊन यावचं लागेल अशा प्रेमळ आग्रहापेक्षा दृढभावच जास्त होता. दादांनीही त्यांच्या आग्रहास मान दिला व आपली नामस्मरण दिंडी व पादुका त्या ताईंच्या घरी स्थानापन्न झाल्या. सर्वांच्या भोजनाची तयारी करत असतानाच त्यांनी पुजेसाठीची तयारी सुद्धा केली होती. त्यांच्या हातून शबरी ताईंनी पादुका पुजन करून घेतले. जप होऊन आरतीला सुरुवात झाली. एकट्याच असताना त्यांनी सर्वांसाठी चहा बनवला. तो चहा सर्वांना आवडला. प्रस्थान करते वेळी त्यांच्या हातात श्री स्वामी समर्थ महाराजांचा मुखवटा दिला, आणि ताईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांना झालेला आनंद त्या मनात साठवू न शकल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून तो आनंद ओसंडून वहात होता. आपल्या आराध्य दैवताविषयीची ही ओढ, ही भक्ती पाहणं हे अचंबित करणारे क्षण होते. हे पाहून "अशक्य ही शक्य करतील स्वामी " ह्या स्वामी माऊलींच्या वचनाची अनुभूती आम्हा सर्वांना आली. तर सकाळपासून भोजनाची व्यवस्था, साफसफाई हे सर्व करुनही त्या ताईंचा चेहरा एकदम प्रसन्न होता. श्री बाबांच्या " मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धचे कारण" ह्या वचनाचा प्रत्ययही पहावयास मिळाला. प्रसन्न मनाने हाक तर मारून तर बघ, मी तुझ्या सोबतच आहे, असाच संदेश ही द्वयी आपल्या भक्तगणांना देत आहे.*
_ह्या सर्व यजमानांच्या व जमलेल्या भक्तांच्या मनात एकच भाव होता की, आज प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज व संत श्री शितोळेबाबा आमच्या घरी आले आहेत._
कोकण दौऱ्याची सांगता *" शेवट गोड करी, स्वामीराया शेवट गोड करी "* ह्या भैरवी प्रमाणे तंतोतंत झाली.
*निरोप देताना त्या ताईंनी दादांना शब्द दिला की, पुढच्या वेळी कधीही कोकणात आलात तर मला कळवा, तुमच्या जेवणाची व्यवस्था मी करीन. अशा ह्या कांबळेताई आमच्या सर्वांच्या मनात घर करून राहिल्या आहेत.*
_मुंबईकडे परत येत असताना आशिषच्या घरी आदल्या दिवशी भजन न झाल्याची मनातील खंत दुसऱ्या दिवशी पुर्ण झाली. सर्वांच्या जेवणाची व्यवस्था घरी करायला सांगून त्याने भजनाचा आनंद पुर्ण करून घेतला._
एक विशेष गोष्ट निश्चित सांगावी अशीच आहे. ह्या दोन दिवसांच्या दौऱ्यात आमच्या सर्वांच्या मोबाईलची रेंज गायब होती. आणि हीच रेंज दोन दिवसांच्या नामस्मरणात लागली होती.
नामस्मरण दौऱ्यावर गेलेल्या सर्व भक्तमंडळी तर्फे दादांचे मनापासून आभार.
_*कोकणी पाहूणचाराने मन भारावून गेले आहे. बस एवढेच लिहीतो आणि थांबतो.*_
*श्री स्वामी समर्थ महाराज की जय*
*सिद्धेश्वर संत श्री शितोळेबाबा की जय*
🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏