Gokuldham Sarvajanik Navratra Utsav Mandal

Gokuldham Sarvajanik Navratra Utsav Mandal Gokuldham Sarvajanik Navratri Utsav Mandal
Ganesh maidan, Gokuldham, Goregaon (east), Mumbai 400063

आज अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजे नवरात्रातील ६ वा दिवस.आपल्या या "प्रणम्या मातृदेवता" लेखमालेतील चतुर्थ शब्दसुमनांची माळ.ह...
27/09/2025

आज अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजे नवरात्रातील ६ वा दिवस.आपल्या या "प्रणम्या मातृदेवता" लेखमालेतील चतुर्थ शब्दसुमनांची माळ.ही माळ आपण प्रेमस्वरूपा शक्तीस्वरुपीनी भगवती श्रीआनंदमयी मॉं यांच्या सुकोमल चरणी अर्पण करतो आहोत.हिंदूस्थान ही संतांची भूमी ,देवभूमी आहे.आसेतू हिमालय आजवर लाखो संत या परम पवित्र भूमीवर अवतार धारण करुन आले,जगाला दिशा देण्याचे अफाट कार्य त्यांनी केले,अनेक मुमुक्षू ,आर्त जिज्ञासू,शरणागतांचे इह पारलौकिक कल्याण केले व आपल्या निर्गुण रुपात आजही आपल्या लिला स्थानी ,समाधी स्थानी विराजमान झालेले आहेत.अशाच जगविख्यात संतांपैकी एक असलेल्या महान विभूती म्हणजे "श्री आनंदमयी माॅं " या एक आहेत. मॉं म्हणजे प्रत्यक्ष भगवती होत्या याची प्रचिती त्यांच्या चरित्र वाचनानंतर आपल्याला येतेच.मॉं चा अधिकार इतका विलक्षण होता की त्यांच्या भेटीस्तव ,दर्शनाला अनेक साधू ,संत,संन्यासी, योगी ,सिद्ध ,साधक यायचे.मॉं च्या नुसत्या दर्शनाने ही कित्येक भक्त आनंदाची अनुभूती घेत असत.अशा या दिव्य विभुतीचे आज आपण संक्षिप्त चरित्र लेखातून स्मरण करणार आहोत.
आनंदमयी मॉं यांचा जन्म वैशाख कृष्ण तृतीया, दिनांक ३० एप्रिल १८९६ रोजी त्रिपुरा जिल्ह्यातील खेओडा या गावात झाला. आज हे गाव बांगलादेशात आहे. त्यांचे वडील श्री. विपिनबिहारी भट्टाचार्य हे विष्णूभक्त होते आणि माता मोक्षदा या अत्यंत सात्विक, धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांना कन्यारत्न झाल्यावर त्यांनी त्या बालिकेचे नाव ठेवले “निर्मला” – अगदी त्यांच्या गुणधर्माला साजेसे नाव. बाल्यावस्थेपासूनच निर्मला या असामान्य आहेत, हे सर्वांच्या लक्षात आले. कुठेही कीर्तन चालू असले की त्या बालिका तिथे सहज भावसमाधीत जात. स्वतः मॉं सांगत असत की बालपणापासूनच त्यांना भावावस्था लागत असे. त्यांना एका वर्षापासून घडलेल्या घटना, भेटलेल्या व्यक्ती सगळे काही स्पष्टपणे आठवत असे. बाल्यावस्थेतच त्यांना आकाशात देवी-देवतांचे दर्शन होत असे. घरची परिस्थिती विशेष चांगली नसली तरी त्यांच्या मनातील दैवी भावनेला कधी खंड पडला नाही. दोन वर्षांपासून त्यांचे शालेय शिक्षण सुरु झाले, परंतु त्या शाळेत फार काळ राहिल्या नाहीत. तरीसुद्धा त्यांची बुद्धिमत्ता विलक्षण होती. शिक्षक म्हणत की त्या एकपाठी आहेत, म्हणजे जे शिकवले ते लगेच लक्षात ठेवण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा विवाह ढाका विक्रमपूर येथील श्री. रमणीमोहन चक्रवर्ती (भोलानाथ) यांच्याशी झाला. विवाहानंतरही त्या पाच वर्षे आपल्या चुलतभावाकडे राहिल्या. त्या काळात त्या अजून गाढ ध्यान, भजन, देवपूजेत रमल्या. वैदिक पद्धतीचे शिक्षण घेतले नव्हते, तरी त्या अगदी अचूकपणे देवपूजा करीत. यामुळेच शेजारीपाजारी त्यांना “मॉं” म्हणून संबोधू लागले. १९१८ साली मॉं आपल्या पतिसोबत ओष्ठ या गावात राहायला गेल्या. संसार जरी सुरु झाला तरी तो सामान्य नव्हता. जेव्हा जेव्हा भोलानाथ त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत, तेव्हा मॉं चे शरीर मृतवत होत असे. हे पाहून पतीसुद्धा थक्क होत. संसाराच्या व्यवहाराबाबत सांगण्याचा प्रयत्न केला तरी मॉं संयम, परमार्थ, सत्संग यांचीच महती सांगत. हळूहळू पतीच्या मनात तीव्र वैराग्य निर्माण झाले. मॉं संसारात कमळाप्रमाणे अलिप्त होत्या. त्या पतीची सेवा, स्वादिष्ट भोजन, गृहकृत्ये सर्व करत पण त्याचवेळी ध्यान, भजन, समाधी यांत गढून जात. स्वयंपाक करताना भांडे स्टोवर ठेवून त्या छतावर जाऊन चंद्राकडे त्राटक करीत व तिथून समाधीत जात. परिणामी भांडे जळून खाक होत असे, घरचे रागावत पण त्या हसत चूक मान्य करत. त्यांच्या आयुष्यात अनेक दैवी घटना घडल्या. श्रावणी पौर्णिमेला तर त्यांनी आपल्या ठायी महाकालीचे प्राकट्य केले. मध्यरात्री त्या अचानक उठल्या, पतिला जागे केले आणि महाकालीची पूजा करण्यास सांगितले. त्या क्षणी भोलानाथांना प्रत्यक्ष महाकालीचे दर्शन झाले. या प्रसंगानंतर मॉं नी त्यांना दीक्षा दिली. त्यांच्या पतीचे जीवनच बदलून गेले, ते साधक झाले. यापूर्वीच त्यांचे मामेभाऊ निशिकांत यांच्या उपस्थितीत एक विलक्षण प्रसंग घडला. समाधीस्थितीत मॉं म्हणाल्या, “पूर्णब्रह्म नारायण”. त्यांच्या दिव्य आवाजाने सर्व स्तब्ध झाले. पुढे त्या म्हणाल्या, “महादेवी, महादेव.” अशा या दिव्य उद्घोषांनी लोकांना खात्री पटली की या स्त्रीरूपामध्ये अद्वितीय ब्रह्मशक्ती प्रगट झाली आहे. १९२२ मध्ये त्या २६ वर्षांच्या असताना त्यांनी गहन ध्यानात जाऊन आत्मतत्त्वाशी एकरूपता अनुभवली. जणू त्यांच्या अवतारकार्याला त्यावेळी प्रकट आरंभ झाला. त्या सहज भावसमाधीत राहू लागल्या. त्यांच्या तेजामुळे शेजारी त्यांना “मॉं” म्हणू लागले आणि तेच पुढे त्यांचे जगप्रसिद्ध नाव झाले – आनंदमयी मॉं. १९२९ साली रमणीजवळील कालीमंदिरात त्यांनी पहिला आश्रम स्थापन केला. त्याकाळी त्या बराच काळ मौनात व एकांतवासात राहिल्या. त्यांच्या पतिलाच प्रथम शिष्य होण्याचा मान लाभला. त्यानंतर असंख्य शिष्य त्यांच्या चरणी आले. त्यांच्या दर्शनासाठी हिमालयातील महान योगीसुद्धा येत असत. हरीबाबा, उडिया बाबा, परमहंस योगानंद, अखंडानंद सरस्वती, स्वामी शिवानंद यांसारख्या महापुरुषांनी मॉं च्या दिव्यत्वाची साक्ष दिली. योगानंद म्हणत, "त्या आत्मप्रकाशाने सुसज्ज आणि पूर्णत्व प्राप्त आत्मपुष्प आहेत." पण मॉं मात्र सर्व संतांना प्रेमाने "पिताजी" म्हणत. मोठमोठे राजकारणी, इंदिरा गांधींसारखे नेते, तसेच सामान्य गृहस्थही त्यांच्या चरणी नतमस्तक होत. मात्र मॉं च्या नजरेत सर्व समान. त्या सर्वांवर एकसारखी करुणा माया धरत असत. त्यांचे चरित्र हे पाच खंडांमध्ये, सुमारे तीन-चार हजार पानांमध्ये नोंदवले गेले आहे. असंख्य लिला, उपदेश आणि अलौकिक प्रसंगांचा तो खजिना आहे. पण त्यांच्या कार्याचे संपूर्ण वर्णन शब्दात कधीच मावू शकत नाही. १९८२ मध्ये हरिद्वारजवळील कनखल येथे त्यांनी देहत्याग केला. आज त्यांची समाधी तिथे लाखो भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे. देश-विदेशात त्यांच्या असंख्य आश्रमांतून आजही त्यांचे स्मरण, उपदेश व कृपा प्रवाहित होत आहे. आनंदमयी मॉं म्हणजेच पूर्णब्रह्माचे साकार स्वरूप, करुणामयी माता, भक्तांसाठी आश्रयदाता. त्यांच्या चरणी शरण गेलेला साधक आजही त्यांच्या अनंत कृपेने धन्य होतो.

आज शारदीय नवरात्राचा पाचवा दिवस,पाचवी माळ.हा दिवस ललिता पंचमी या नावाने ओळखला जातो.आज आपल्या "प्रणम्या मातृदेवता" या लेख...
26/09/2025

आज शारदीय नवरात्राचा पाचवा दिवस,पाचवी माळ.हा दिवस ललिता पंचमी या नावाने ओळखला जातो.आज आपल्या "प्रणम्या मातृदेवता" या लेखमालेतील ही पाचवी माळ.ही माळ आपण परम पूज्य सद्गुरु माउली श्री कलावती आईंच्या श्री चरणी अर्पण करणार आहोत. परमपूज्य आई या आपल्या भारतात होऊन गेलेल्या अतिशय दिव्य संतमांदीयाळीतील एक अलौकिक संतरत्न आहेत.आईंनी शेकडो आर्त ,जिज्ञासू,मुमुक्षू लोकांना आपल्या कृपा छत्राखाली घेऊन त्यांना कृतार्थ केले आहे.आईंचा शिष्य परिवार व त्यांच्या वर प्रेम करणारा भक्त परिवार संपूर्ण जगभरात पसरला आहे.आईच्या कृपा सामर्थ्याची प्रचिती आजही अनेक भक्त घेत आहेच आणि आजही "हरी मंदिर" या शक्ती केंद्रातून प.पू.आईंनी घालून दिलेली उपासना पद्धती,साधना मार्ग अविरत ,अखंड सुरु आहे.आजही शेकडो लोक हरी मंदिरात जाऊन आईंच्या कृपा सामर्थ्याची प्रचिती घेत आहेत.आईंचे श्रीमती विशालाक्षी यांनी लिहिलेले "परमपूज्य आई" हे चरित्र अतिशय दिव्य आणि प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे आहे.त्याच चरित्रातील काही निवडक संक्षिप्त माहितीच्या आधारे आपण परम पूज्य आईंच्या दिव्य लिला चरित्राचे स्मरण करणार आहोत.
परमपूज्य श्री कलावती आई ज्या घराण्यात अवतार घेतला, ते अत्यंत सुसंस्कृत, सात्विक आणि भक्तिमय होते.या घराण्यात श्रीमद् परमहंस शिवराम स्वामी हे थोर संन्यासी होऊन गेले.त्यांच्या घरात बालपण हेच भक्तिप्रवृत्ती आणि सात्विक संस्कार अनुभवण्याचे साधन ठरले.आईंच्या पोटात जन्म घेणारी बालक, रुक्माबाई, बालपणापासूनच अलौकिक गुणांनी परिपूर्ण होती.बाबुराव व त्यांच्या पत्नी सिताबाई हे श्रद्धावान व सत्शिल होते.आठ वर्षांपर्यंत संतती न झाल्यामुळे त्यांनी सहस्त्रलिंगार्चन केले, ज्याचा फळकारी अनुभव अष्टमीच्या रात्री दिसून आला.भगवतीने त्यांना दृष्टांत दिला की ती त्यांचा वंश पाळण्यासाठी जन्म घेणार आहे.त्या दिवशीच रुक्माबाई जन्मली.बाळ जशी जशी मोठी झाली, तसे तिच्यातील अलौकिक गुण समोर येऊ लागले.बालपणीच रुक्माबाई अंतर्मुख होती.तीला खेळण्यात भांडी-कुंडी नव्हती, तर देवांच्या मुर्तींची विशेष आवड होती.कृष्णाची गोपालकृष्णाची मूर्ती तिच्यासाठी सर्वस्व बनली.तिनं पाच वर्षांपासून भजन म्हणायला सुरुवात केली आणि तीन भाषांमध्ये भक्तिगीत म्हणणे सुरु केले.तिच्या मधुर आवाजाने आणि भक्तीच्या पद्धतीने मोठ्यांनाही कौतुक वाटे.वयाच्या सातव्या वर्षी ती शाळेत गेली, परंतु तिचा भक्तिप्रवृत्तीचा मार्ग अधिक दृढ झाला.पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या भेटीमुळे तिचा अलौकिक अधिकार उलगडला.त्यांच्याकडून तिला गोपालकृष्णाची मूर्ती मिळाली आणि त्या मूर्तीभोवती तिचा मनोभाव अधिक केंद्रित झाला.बालपणीच तिने अनेक चमत्कार घडवले, जसे की विनायक भटजींच्या पत्नीवर पाणी ओतण्याच्या प्रसंगात तिच्या हातून त्रास कमी होणे.आईंचा किशोरवय सात्विकता, भक्ती, ध्यान आणि अंतर्मुखतेने भरलेला होता.हरीदासांच्या किर्तनात ध्यान करण्याची प्रावृत्ती तिने बालपणीच अंगिकारली.हे सर्व संस्कार तिच्या स्वभावाशी सुसंगत होते.वयाच्या १५ व्या वर्षी तिचा विवाह दक्षिण कर्नाटकातील पोलिस इन्स्पेक्टर एम.राजगोपाल यांच्याशी ठरला.सासर जाण्यापूर्वी बाबुरावांच्या मार्गदर्शनानुसार ती सिद्धारुढ स्वामी महाराजांकडे दर्शनासाठी गेली, जिथे तिच्यावर महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला.सासरी जाऊन आईंनी अत्यंत सुंदर, शिस्तबद्ध आणि भक्तिमय संसार सुरू केला.वयाच्या १७ व्या वर्षी बाळकृष्ण जन्माला आला.परंतु वयाच्या १९ व्या वर्षी पतींचे अचानक निधन झाले.या दु:खाने आईंना आत्महत्येचा विचार आला, परंतु एका जटाधारी साधूच्या आगमनाने तिचा मार्ग बदलला.साधूंच्या वाक्यांनी तिला जीवन ध्येयाचे अर्थ समजले आणि ती स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली राहिली.आईंनी हुबळीला येऊन मठात राहून तपश्चर्या सुरू केली.दिवस-रात्र नामस्मरण, ध्यान, उपासना आणि कठोर साधना यात व्यतीत झाली.त्यांनी आपल्या जीवनात अन्न, झोप आणि वस्त्र यांमध्ये अत्यंत संयम ठेवला.या काळात त्यांच्या अंतर्मुखतेत वैराग्य आणि भक्तीचे सर्वोच्च रूप प्रकट झाले.१९२८ साली दसर्याच्या शुभ दिनी स्वामी महाराजांनी त्यांच्यावर पूर्ण कृपा केली आणि त्यांना "कलावतीदेवी" असे नाम दिले.गुरु आज्ञेने त्यांनी नामस्मरण साधनेत निरुपण केले.पुढे मठात नियमित किर्तन करण्याचे कार्य त्यांनी सुरू केले.त्यांच्या या कृपेने आत्मज्ञान जागृत झाले आणि त्यांनी आठ तास प्रगाढ समाधी अनुभवली.आईंनी मठात किर्तन, भजन आणि सेवा करताना समाजकल्याणासाठी अनवरत प्रयत्न केले.त्यांनी “हरी मंदीर” हे प्रधान साधना केंद्र स्थापन केले.बारा वर्षांच्या प्रवासात संग्रहित अभंग त्यांनी 'परमार्थ प्रदीपक' या नावाने प्रकाशित केले.अनेक ग्रंथ, जसे की परमार्थ दर्शन, सिद्धारुढ वैभव, बोधामृत, बालोपासना, कथासुमनहार आणि श्रीकृष्ण प्रताप, त्यांनी रचले.आईंनी स्त्रियांना भजनाचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांना शिकवले.भजनाच्या माध्यमातून संसारातील त्रिविध ताप दूर होतात, याची जाणीव त्यांनी लोकांना करून दिली.त्यांचा भजन, नामस्मरण आणि लोकसेवा मार्ग लोकांमध्ये प्रखर झाला.अनेक चमत्कार आणि अनुभवांनी लोकांना भजनकडे वळवले.बेळगावात १९५७ साली फ्ल्यूच्या साथीच्या काळात आईंनी अनेक भक्तांना उपचार केले.पांडुरंग गजेश्वर आणि कुलकर्णी बाई यांसारख्या रुग्णांचे दु:ख त्यांनी दूर केले.भक्तांच्या दु:खावर केलेले त्यांचे आशिर्वादाचे चमत्कार अनेक लोकांनी अनुभवले.आईंनी जात, धर्म, पंथ पाहून कुणालाही दु:खासाठी परतवले नाही.बोहरी, आदिवासी आणि इतर जातींच्या लोकांना शुद्धतेचे, आंघोळे, भजन व नामस्मरणाचे महत्त्व समजावले.त्यांच्या भक्तवत्सलतेने लोक स्वतः धर्ममार्गावर वळले.सन १९३० पासून १९४२ पर्यंत आईंनी अखंड साधना, भजन, नामस्मरण आणि सेवा करताना आपल्या शरीराचे चंदनासारखे अविरत झिजवले.स्वतः साधन, नामस्मरण आणि शुद्ध आचरण करून इतरांना शिकवले.दुर्गुणी वृत्ती असलेल्या लोकांनाही परमार्थाकडे वळविले.आईंच्या भक्तिसेवा आणि लोककल्याणाने अनेकांचा जीवनधोरण बदलले.त्यांनी संसार आणि परमार्थ यांचा आदर्श दाखवला.भक्तांना दु:खमुक्त करून भजन, नामस्मरण आणि धर्ममार्गावर चालविले.त्यांच्या कृपेने अनेक लोकांच्या आयुष्याला दिशा मिळाली.८ फेब्रुवारी १९७८ रोजी परमपूज्य आईंनी महासमाधी घेतली.बेळगाव येथील श्रीहरी मंदीरात त्यांची समाधी आहे.त्यांचा हरीभजन, नामस्मरण आणि लोककल्याणाचा मार्ग आजही लोकांवर उजळत आहे.त्यांच्या चरित्रातून प्रत्येकाला भक्ती, सेवा, सात्विकता आणि परमार्थ यांचा संदेश मिळतो.परमपूज्य श्री कलावती आईंचे चरित्र हे जगातील प्रत्येक भक्त आणि साधकासाठी प्रेरणास्थान आहे.बालपणातील लीलांपासून, संसारातील सात्विक जीवनापर्यंत, तपश्चर्या, सेवा आणि लोककल्याणाच्या कार्यापर्यंत प्रत्येक प्रसंग भक्तिरसपूर्ण आणि मार्गदर्शक आहे.

आज अश्विन नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजेच तिसरी माळ.या परम पावन दिनी आपल्या या “प्रणम्या मातृदेवता” लेखमालेत आपण गुजरात मध...
24/09/2025

आज अश्विन नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजेच तिसरी माळ.या परम पावन दिनी आपल्या या “प्रणम्या मातृदेवता” लेखमालेत आपण गुजरात मधील पण महाराष्ट्र जन्माला आलेल्या मराठी असलेल्या अतिशय अलौकीक संत सद्गुरु श्री जानकी मातोश्री यांच्या दिव्य चरित्राचे चिंतन,स्मरण करणार आहोत.सद्गुरु जानकी मातोश्रींना त्यांचे भक्त "बायजी" या नावाने संबोधतात. जानकी मातोश्री या अलिकडच्या काळात होऊन गेलेल्या अतिशय दैवी अशा आदिशक्ती अवतारच होत्या.ज्यांच्या चरणधुळीने गुजरातमधील गणदेवी हे छोटेसे गावही परम पवित्र तिर्थक्षेत्र बनले.
प.पू. श्री जानकी मातोश्रींचा जन्म रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या पुण्यभूमीत झाला. आईच्या कृपेने जन्मलेल्या या बाळाचे नामकरण दुर्गा असे झाले. लहान वयातच मातृछत्र हरपले तरी आजी-आजोबांच्या प्रेमळ संगोपनात या बाळाने वाढ घेतली. परंतु हे बालक साधेसुधे नव्हते, तिच्या लहानशा डोळ्यांतच भविष्यातील दिव्यता झळकत होती.
बालपणापासूनच दुर्गेची वृत्ती अंतर्मुख, भक्तीमग्न होती. इतर मुलींप्रमाणे खेळण्याऐवजी ती तासन्तास देवपूजेत रमायची. मालुस्त्याची ग्रामदेवता मालजाई आई हिच्या पूजेसाठी ती नित्य जाणे. तिच्या हातून केलेली पूजा, वाहिलेला भाव आणि अनुभवलेली निष्ठा पाहून लोकांना तिच्यात भगवतीची छाया जाणवू लागली.
लहानपणीच तिच्या आयुष्यातील दिव्यत्व अनेकांना दिसून आले. शिवपिंडीवर अर्पण केलेले दुध भुजंग येऊन पीत असे, आणि लहान दुर्गा त्याला नम्रतेने नमस्कार करी. नवरात्रीच्या वेळी देवीसोबत खेळण्यासाठी ती काही दिवस गावातून अदृश्य झाली, आणि परत आली तेव्हा तिच्या मुखातून उमटलेले शब्द – “आई जगदंबा सदैव माझ्या सोबत राहणार आहे” – हे ऐकून सारे ग्रामस्थ थक्क झाले. त्या दिवसापासून तिच्या असामान्यत्वाची प्रचिती सर्वांना यायला लागली.
तारुण्यात पदार्पण झाल्यावर तिचा विवाह नाडसुरचे शांताराम सुळे यांच्याशी झाला. विवाहानंतर तिचे नाव जानकी ठेवण्यात आले. संसारात प्रचंड दारिद्र्य, पतीचा शीघ्रकोपी स्वभाव, अनेक संकटे – तरीही त्यांच्या चेहऱ्यावर कधीही चिंता दिसली नाही. त्यांच्या संतवृत्तीने संत सखु, बहिणाबाई, मुक्ताई, जनाबाई यांची आठवण व्हायची.
गुजरातमधील गणदेवी येथे गेल्यावर त्यांच्या दिव्यत्वाची अधिक प्रचिती आली. दरुवाड्यातील भुतांची वस्ती त्यांनी एका कटाक्षाने शांत केली. पुरात आलेल्या सर्पांना मुक्ती देऊन गावकऱ्यांचे रक्षण केले. गावात प्लेगची भीषण साथ आली, तेव्हा मातोश्रींनी स्वतः हातात पिठ घेऊन गावाच्या सीमेला टाकले आणि गाव रोगराईपासून वाचले. भक्तांना त्यांच्या कृपेचा प्रत्यय वारंवार आला.
त्यांनी कधीही सिद्धींचा उपयोग स्वार्थासाठी केला नाही. त्यांची सर्व शक्ती, सर्व दिव्य सामर्थ्य हे फक्त लोककल्याणासाठी होते. भक्तांना ओटी नारळाने भरून देणे, ओटीतील नारळ पुन्हा पुन्हा प्रकट करणे, तिर्थस्थळांहून प्रसाद आणणे, जन्मांध बालकाला डोळ्यांचे वरदान देणे – या त्यांच्या लीलांनी लोकांना त्यांच्या अधिष्ठानाची प्रचीती दिली.
त्या अशिक्षित होत्या, पण त्यांच्या मुखातून सहजपणे ओव्या उमटत. झोपाळ्यावर बसून त्या जेव्हा ओव्या गात, तेव्हा लोकांना त्यांच्या ठायी भगवती आदिशक्तीचे प्रत्यक्ष दर्शन होत असे. भक्तांचे दु:ख दूर करण्याची त्यांची करुणामयी वृत्ती अमर्याद होती.
त्यांच्या जीवनात असंख्य भक्तांनी आश्रय मिळवला. स्त्रियांच्या ओटी नारळाने भरून त्यांना आनंदित केले. गावोगाव त्यांची कीर्ती पसरली, आणि त्या “आई जानकी” म्हणून सर्वांच्या हृदयात वसल्या.
सन १९४६ मध्ये चैत्र वद्य नवमी, म्हणजेच श्रीरामनवमीच्या दिवशी त्यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. विशेष म्हणजे ही तिथी, दिवस व वेळ त्यांनी एक वर्ष आधीच पंचांगात लिहून ठेवली होती. त्या भर दुपारी समाधिस्थ झाल्या आणि आपल्या मुळ अधिष्ठानाला परतल्या. परंतु मातोश्रींचे कार्य थांबले नाही. त्यांच्या समाधीनंतरही भक्तांना त्यांच्या कृपेची अनुभूती सतत मिळत राहिली आहे. संकटाच्या काळी, अडचणीच्या क्षणी त्यांना स्मरण करणाऱ्याच्या हाकेला त्या आजही धाव घेतात.
प.पू. श्री जानकी मातोश्री या भगवती आदिशक्तीचा साक्षात अवतार होत्या. त्यांच्या जीवनातली प्रत्येक लिला, प्रत्येक चमत्कार, प्रत्येक कृती ही भक्तांसाठी मार्गदर्शक दीप आहे. अशा या दिव्य मातेस माझा कोटी कोटी प्रणाम! 🙏

आज अश्विन शुद्ध द्वितीया आपल्या "प्रणम्या मातृदेवता" या लेखमालेची द्वितीय शब्द सुमनांची माळ.ही शब्द सुमनांची माळ आपण भक्...
23/09/2025

आज अश्विन शुद्ध द्वितीया आपल्या "प्रणम्या मातृदेवता" या लेखमालेची द्वितीय शब्द सुमनांची माळ.ही शब्द सुमनांची माळ आपण भक्तीचे सगुण मुर्तिमंत रुप , गोपीका अवतार असलेल्या संतश्रेष्ठ श्री मीराबाई यांच्या लिला चरित्राने गुंफणार आहोत.

संत मीराबाई या भक्तिरसातील एक अद्वितीय रत्न आहेत. राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यातील मेडता या ठिकाणी वैशाख शुक्ल तृतीया, सन १५५५ रोजी राणा रतनसिंह व कुसुमकुंवरी यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. राजघराण्यात जन्म असूनही लहानपणापासूनच त्यांना राजवैभवापेक्षा अध्यात्म आणि कृष्णभक्तीची गोडी जास्त वाटली.
बालपणीच एका संताने दिलेली गोपालकृष्णाची लहान मूर्ती त्यांच्या आयुष्याचा प्राण ठरली. (त्यांची ही कृष्ण मुर्ती आजही उदयपूर मधील पीताम्बरराय मंदीरात विराजमान झालेली बघायला मिळते.)
त्या मूर्तीशी त्यांनी मैत्रीभावाने संवाद साधत आयुष्य जगले. या सख्यभावातूनच त्यांची अखंड भक्ती सुरू झाली. खेळ, आडंबर, वैभव याकडे त्यांचे लक्ष गेले नाही; त्यांचे बालमन केवळ कृष्णाच्या प्रेमात रमले होते.
युवावस्थेत त्यांचा विवाह चित्तोडच्या युवराज भोजराज यांच्याशी झाला. भोजराज हे भाविक व ज्ञानी होते. त्यांनी मीराबाईंच्या भक्तीला अडथळा आणला नाही, उलट त्यांना प्रोत्साहनच दिले. राजघराण्यातील जबाबदाऱ्या पार पाडताना देखील मीराबाईंचे हृदय मात्र केवळ कृष्णस्मरणात मग्न असायचे. लग्न झाल्यावर त्या जेव्हा सासरी आल्या तेव्हा पतीच्या दिर्घायुष्यासाठी सासुने त्यांना देवी पुजा करण्यास सांगितले.पण आपण तर आधीच आपले मस्तक कृष्ण चरणी वाहिले असल्याने तसे करण्यास त्यांनी नकार दिला.याचा महाराणीला खुप राग आला व त्यांनी ही हकिकत राणा सांगा यांना सांगितली.मीराबाईंच्या या वागण्याचा राजालाही खुप राग आला.त्यामुळे या दोघांनीही मीराबाईला धडा शिकविण्याचे ठरविले.त्यांनी मीराबाईंच्या भक्तीचे कारण सांगून त्यांना एक सुमसान ,उजाड व भुतं प्रेतांचा वास असलेला राजवाडा राहण्यास दिला.तेथे अनेक प्रेत, पिशाच्च वस्तीस होते.
राजवाडा साफ झाल्यावर मीराबाई आपल्या श्रीकृष्ण प्रभुंना घेऊन राजवाड्यात गेल्या.तेथे त्यांनी देवांची पुजा केली व त्यांच्या स्नानाचे जल हे शंखातून सर्व जागी शिंपडले.ते शिंपडल्यावर तेथील सर्व पिशाच्च व प्रेतांना तात्काळ मुक्ती मिळाली व ते सर्व मीराबाईंचा जयजयकार करत मुक्त झाले. भोजरांजांचा पुढे एका लढाईत मृत्यू झाला.त्यांना मृत्यू समयी भगवान कृष्णांनी दर्शन दिले व "तू मीराची नाही तर माझीच सेवा केली आहे " असे म्हणून हृदयाशी लावले. भोजराजांच्या मृत्यूनंतर मीराबाईंच्या जीवनात मोठा बदल झाला. सासरकडून त्यांच्या अखंड भक्तीवर आक्षेप घेतला जाऊ लागला. घराण्याच्या मानमरातबाला धक्का पोहोचतो, अशी सबब काढून त्यांना सतत त्रास दिला गेला. विषपात्र देणे, भुतांच्या वाड्यात ठेवणे, अशा अनेक कटकारस्थानांतून त्यांना जावे लागले.
परंतु प्रत्येक वेळी त्यांचे रक्षण कृष्णभक्तीच्या शक्तीने झाले. विष पिताही ते अमृतासारखे वाटले, भीतीदायक प्रसंग भासमान ठरले. या सर्वातून त्यांची श्रद्धा अधिक दृढ झाली. त्यांच्या मनात एकच ठाम विचार होता – “माझा एकमेव आधार श्रीकृष्णच आहेत.”
समाजाच्या बंधनांना न जुमानता त्या साधू-संतांच्या सहवासात गेल्या. दरबारातील, समाजातील विरोध पत्करूनही त्या भजन-कीर्तनात तल्लीन झाल्या. त्यांच्या गोड आवाजाने आणि प्रेममय पदांनी हजारो भक्तांना मोहिनी घातली. इतकेच नव्हे तर अकबर बादशाह आणि तानसेन यांनी वेषांतर करून त्यांचे भजन ऐकले, हे त्यांचे अपूर्व प्रभाव दाखवते.
अखेर छळाला कंटाळून त्यांनी तुलसीदासांकडे मार्गदर्शन मागितले. तुलसीदासांनी त्यांना रामनामाचा आधार घ्यायला सांगितला आणि चित्तोड सोडण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मीराबाई वृंदावनला गेल्या. वृंदावन ही कृष्णभूमी त्यांच्या साधनेसाठी अत्यंत अनुकूल ठरली.
पुढे त्यांनी द्वारका गाठली. द्वारकेत त्या अखंड भजन, साधना व कीर्तनात रमत राहिल्या. त्यांची सर्व पदे माधुर्यभावाने ओथंबलेली आहेत. प्रियकरासारखा कृष्णाशी संवाद साधत त्या जगाशी नातं तोडून बसल्या होत्या. भक्तांच्या ओठावर आजही गाजणारे असंख्य पद त्या काळात रचले गेले.
अखेरच्या काळात त्या संपूर्णपणे कृष्णभक्तीत विलीन झाल्या होत्या. द्वारकाधीशाच्या मंदिरातच त्यांनी अखेरचा समाधीप्रवास साधला. जनसमोरच त्यांचा देह कृष्णमूर्तीमध्ये सामावला, अशी श्रद्धा आहे. त्या दिवशी भक्तिरसाने मानवतेला एक अमर उदाहरण दिले.
मीराबाईंचा जीवनप्रवास हा केवळ भक्तीपुरता मर्यादित नाही. तो स्त्रीशक्ती, आत्मविश्वास, त्याग आणि निष्ठेचे प्रतीक ठरतो. हजारो पदांमधून त्यांनी कृष्णप्रेमाला स्वर दिला. त्यांची गाथा आजही भक्तांना प्रेरणा देते, संकटांत धैर्य देते आणि स्त्रीला तिच्या अध्यात्मिक सामर्थ्याची जाणीव करून देते. त्यामुळेच मीराबाई हे नाव भक्तीच्या इतिहासात चिरंतन तेजाने झळकत राहते.

दिवस सातवा...रंग निळा.....*आजचे तीचे रुप किल्ले सिंधदुर्ग वरील देवी भगवती*छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून स्वर...
09/10/2024

दिवस सातवा...
रंग निळा.....
*आजचे तीचे रुप किल्ले सिंधदुर्ग वरील देवी भगवती*
छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून स्वराज्याचे आरमार उभारले. भारतीय नौसेनेचे जनक म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज. परकीय आक्रमणापासून स्वराज्याचे संरक्षण व्हावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले बांधले . त्यातीलच एक किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग.
देवीच्या उजव्या बाजूला पायाशी एक - सिंह बसलेला असून, हाती त्रिशूळ, चक्र, तलवार आणि शंख घेऊन उभी असलेली हि चतुर्भुजा देवी अत्यंत प्रगल्भ अशी आहे. निशाण बुरुजाच्या डावीकडे चालत गेल्यास लाल पिवळ्या रंगाने रंगवलेल्या मंदिरात देवीची मूर्ती बसवलेली आहे.

दिवस सहावा ..रंग लाल....*आजचे तिचे रुप भूषणगडावरील हरणाई देवी*हर हरिणाक्षी देवी संस्थिता दुर्गभूषने | एतासां दर्शनाद्देव...
08/10/2024

दिवस सहावा ..
रंग लाल....
*आजचे तिचे रुप भूषणगडावरील हरणाई देवी*
हर हरिणाक्षी देवी संस्थिता दुर्गभूषने | एतासां दर्शनाद्देव सर्व पापे प्रमुच्यते | अशक्तो दर्शने नित्यं स्मरेत प्रातः समाहितः | तथांप्यु पासकः सर्वे परा धैर्विमुच्यते ||" अर्थात भूषणगड निवासिनी हरणाईदेवीच्या दर्शनाने सर्व पापे धुतली जातात, आणि देवीच्या नित्य दर्शनाने, प्रातः स्मरणाने तसेच उपासनेने सर्व संकटांचे निर्मुलन होते. भूषणगडाच्या सर्वोच्च माथ्यावर या देवीचे मंदिर असून देवीला पितळेचा मुखवटा आहे, समोर एक जुना दीपस्तंभ आहे आणि दिपस्तंभासमोरील वृंदावनावर कोरीव काम केले आहे.

*गोकुळधामची अंबामाता २०२४*दिवस तिसरा ...रंग राखाडी......स्वराज्य ज्या पद्धतीने वाढत होते त्या पद्धतीने त्या मध्ये अनेक न...
05/10/2024

*गोकुळधामची अंबामाता २०२४*
दिवस तिसरा ...
रंग राखाडी......
स्वराज्य ज्या पद्धतीने वाढत होते त्या पद्धतीने त्या मध्ये अनेक निष्ठावंत मावळे जोडत राहिले, आणि त्यांच्या घेऱ्यातील किल्ले देखील स्वराज्यात यायला सुरुवात झाली. किल्ले तोरणा स्वराज्यात घेतला तेंव्हा राजगड ही स्वराज्यात घेतला आणि तिथं गड बांधकाम सुरु केले. गडावरील सर्वात प्रशस्त माची असलेली पद्मावती माची वरच देवीच देऊळ आहे. छत्रपती शिवरायांनी तांदळा देवी सारखी याची घडवणूक केली आहे. शिवरायांनी ही मूर्ती ब्रह्मदेवाची धर्मपत्नी असेच तिला समजून तिला घडवले होते. ही मूर्तीची छत्रपती शिवरायांनी स्वतःदेवी ची स्थापना केली होती. गडावर काळाई देवी म्हणून देखील या देवीचा उल्लेख सापडतो. गडावर अपमृत्यू टाळण्याचे सामर्थ ह्या देवीत आहे. किल्ला मुगलांच्या हाती जायच्या वेळी आपल्या सरदारांनी मूर्ती तलावात टाकली नंतर च्या काळात तलावातून ही मूर्ती आणून भोर संस्थाकडून पुन्हा मूर्ती बसवण्यात आली. सध्या गडावर दोन मूर्ती आहेत. दोन्हीची आज पूजा करण्यात येते. शिवकाळात हा किल्ला राजधानी असल्याने देवीच्या ही देवळात सारखी वर्दळ असायची. राजमाता जिजाऊ आऊसाहेब, महाराणी सईबाई यांचे वास्तव्य ह्या मंदिरा भोवती होते. अशी स्वराज्याच्या नवगडदुर्गाची तिसरी माळ जिथून स्वराज्य वाढल त्या पद्मावती देवीला.

दिवस दुसरा ...रंग हिरवा.....शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला "शिवनेरी किल्ला"...जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावरील ...
04/10/2024

दिवस दुसरा ...
रंग हिरवा.....
शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला "शिवनेरी किल्ला"...

जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावरील "गडदुर्गा श्री शिवाई देवी"....

शिवनेरी किल्ला म्हणजे हा डोंगर नैसर्गिक दृष्टीनेच किती दुर्गम संरक्षीत आहे गडाचे कडा नैसर्गिकच चखोट आहेत किल्ले बांधणी करताना डोंगर फक्त उंच असून चालत नाही तर त्याची भौगोलिक नैसर्गिक दुर्गमता ही तितकिच महत्वाची हे आपल्याला दिसून येते एखादा किल्ला बांधण्यापुर्वी केलेली तिथल्या ठिकाणची पाहणी आणि गड बांधण्यास भौगोलिक दृष्ट्या तिथली योग्य असणारी वास्तुस्थापत्य...

शिवबा म्हणलं की आठवतो बेलाग शिवनेरी तो दारुणी महाल... शिवाई देवीच्या पुढे गोडं तेलाने ढणा ढणा पाजळणारे पोत... कपाळी माखलेली आणि देव्हाऱ्यासमोर मांडलेली भंडारा-परडी... गवाक्षातून सह्याद्रीच्या कुशीतून उमलणारा भगवा स्वातंत्र्यसुर्य...

"तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई...."

*गोकुळधामची अंबामाता २०२४*दरवर्षी आपण नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून ते दसऱ्यापर्यंत देवीच्या वेगवेगळ्या रूपांची माहिती ...
03/10/2024

*गोकुळधामची अंबामाता २०२४*
दरवर्षी आपण नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून ते दसऱ्यापर्यंत देवीच्या वेगवेगळ्या रूपांची माहिती किंवा कथा जाणून घेतो.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण देवीच्या काही रूपांची माहिती जाणून घेणार आहोत.
पण ही स्थाने कोणतेही तीर्थक्षेत्र नाही पण एखाद्या तीर्थक्षेत्रापेक्षा कमी सुद्धा नाही.
ही देवीची रूपे आहेत आपल्या स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या गड किल्ल्यांवरील देवीची रूपे आणि त्यांची माहिती...
काळानुसार गड किल्ल्यांचे संवर्धन हे फार गरजेचे आहे गडांवर होणारा कचरा तसेच मद्यपान व मद्यपानाच्या बाटल्या, प्लास्टिकचा जास्त होणारा कचरा... गडावर होणारा धिंगाणा, इंस्टाग्राम रिल मुळे वाढलेली नको ती गर्दी... हे सर्व पाहून फार वाईट वाटते कारण गड किल्ले हे पिकनिक स्पॉट किंवा फक्त रमणीय स्थळे नाहीत....
ती एक प्रकारची पवित्र तीर्थक्षेत्रेच आहेत... आणि त्याचे पावित्र्य राखणे ही आपली जबाबदारी आहे.
आणि अशा सर्व गडांवरती देवीच्या वेगवेगळ्या रूपांचा वास आहे....
*आज पासून जाणून घेऊयात अशाच दहा गडांवरील देवीची रूपे......*
दिवस पहिला
रंग पिवळा
आजचे तिचे रूप
*किल्ले श्रीमान रायगडाची गडदेवता श्री शिर्काई देवी*

स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील श्री शिर्काई देवीचा संदर्भ शिवकाळापूर्वीपासूनचा आढळून येत असला तरी किल्ले रायगडची गडदेवता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती नावारूपास आली. रायगडावरील कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रारंभापूर्वी श्री शिर्काई देवीची विधिवत पूजा आणि गोंधळ घालण्याची प्रथा आजही अबाधित आहे. शिर्काई म्हणजे महिषासुरमर्दिनीची अत्यंत रेखीव दगडी मूर्ती मंदिरामध्ये आहे. किल्ले रायगडावरील गंगासागर तलावाकडून नगारखान्याकडे जाण्याच्या मार्गावर शिर्काई देवीचे मंदिर आहे. देवीच्या मंदिरासमोरच होळीचा माळ असून डाव्या बाजूस असलेला चौथरा शिर्काई देवीचा घरटा म्हणून ओळखला जातो. घरट्याच्या मागे उंबराच्या झाडांच्या दाटींमध्ये शिर्काई देवीचे मंदिर आहे. शिर्के घराण्याची कुलदेवता म्हणून या देवीचे नाव शिर्काई पडले असावे, असा संदर्भ इतिहासात आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला विधानसभा संघटक (जोगेश्वरी विधानसभा) आणि वर्षानुवर्ष मंडळाला वेळोवेळी मदत करणाऱ्या ...
25/10/2023

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला विधानसभा संघटक (जोगेश्वरी विधानसभा) आणि वर्षानुवर्ष मंडळाला वेळोवेळी मदत करणाऱ्या मंडळा सोबत एक घरचं नातं असणाऱ्या "श्रीमती शालिनीताई सावंत"
यांनी अंबामातेच दर्शन घेतलं . आई अंबामाता त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करो व त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच अंबामातेकडे प्रार्थना....

Address

Ganesh Maidan, Gokuldham, Goregaon (east)
Mumbai
400063

Telephone

+917045279835

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gokuldham Sarvajanik Navratra Utsav Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share