Sadbhakti Mandir

Sadbhakti Mandir Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sadbhakti Mandir, Hindu temple, Sadbhakti Mandir Saraswati Baug Road, Saraswati Baug, Natwar Nagar, Jogeshwari East, Mumbai.

16/01/2026

श्री वामन पंडितांच्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ
"श्री सदगुरुभ्योनमः "
तारीख : ५.५.१९२७

भाग २ रा : -

जो यज्ञ तपाचा भोक्ता आहे , तोच सर्व प्राण्यांचा ईश, स्वामी, देवाधिदेव असून अनादी सखा आहे असे जाणून जो त्याची भक्ति करितो, तोच निर्वाण शांतीप्रत जातो. आपण आपल्यावर जेवढी प्रीति करतो, तेवढीच आपल्या ईश्वरावर प्रीति असणे हे खरे प्रीतीचे लक्षण आहे. कदाचित जगातल्या अनेक पदार्थांच्या ठिकाणी आपली अनावडी होण्याचा संभव आहे, पण आपली स्वतःची अनावडी कधीच होऊ शकणार नाही. ज्या आत्म्याची ओळख नसताना त्याच्या विषयी आपले एवढे प्रेम आहे, त्या आत्म्याची ओळख करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. तो इतका अत्यंत जिवलग सखा असून त्याची आपणाला का ओळख पटत नाही? “मी पणामुळे”, “अहंकारामुळे” ती पटत नाही, म्हणून त्या अहंकाराचा जर नायनाट केला, तर सहजच कार्य होईल.
“परम आवडी आपुली आपणा I वळख तू तुज टाकुनि मीपणा II”
आत्मस्वरूपाचा विसर पडल्यामुळे आत्म्याशी निकट असलेला अहंपणावर प्रेम जडले. देहच ‘मी’ अशी भावना झाल्यामुळे देहावर प्रेम जडले, व पुढे देहाचे जे संबंधी ते आपले संबंधी वाटू लागले. अशा रीतीने गोंधळ वाढतच चालला, आणि आत्म्याबद्दल कोणी चौकशीच करीनासे झाले. देह प्रिय का वाटतो याचा कोणी सारासार विचार करीत नाही. त्याच देहाच्या एका भागाला इजा झाली, व त्यामुळे सर्व देहाला अपाय होण्याचा संभव असला, तर तो भाग कापून टाकण्यास तो तयार होतो. हे असे का? केव्हा केव्हा तर तो देहावरच उदार होतो. म्हणजे आत्महत्या करण्यास तयार होतो याचा बारकाईने शोध केला तर असे कळून येईल की एका आत्म्याच्या अत्यंत प्रीतीमुळे त्याला सुख व्हावे म्हणून तो जीवावर देखील उदार होतो. सेवक आपल्या सुखाकरिता राजाची सेवा करतो. भार्येला पती आपल्याच कार्याकरिता प्रिय होतो. पतीच्या कार्याकरिता नव्हे. देवाच्या कार्याकरिता देव भक्ताला प्रिय होत नसतो, तर आपल्याच कर्माकरिता देव प्रिय होतो. भुक्ती, मुक्ती आपणाला मिळावी एतदर्थ भेदवादी जे आहेत ते देवाची उपासना करतात. म्हणून त्यांचे भजन पूजन निर्निमित्त होत नाही. त्यांच्या इच्छेप्रमाणे जर भजन पूजनाचे फळ मिळाले नाही, तर ते देवाला शिव्या देण्याला कमी करत नाही. परंतु जे माझे भक्त आहेत, ज्यांना मीच हवासा असतो त्याचस भजन निर्निमित्त असते. त्यांना मुक्तीची देखील पर्वा नसते :-
“फिकी मुक्ती भक्ति पुढे ज्ञान याला I
स्वये मुक्ती देती पहाती तयाला II
मुमुक्षुसही कामना मोक्ष कामी I
न भक्तास जे देखती मुक्ती नामी II”
भगवान म्हणतात :- अर्जुना, तू माझा भक्त आहेस, या करिता ती त्रिदोष रहित जी अति पवित्र भक्ति आहे ती कर. त्या भक्तीलाच मुक्तीवरची भक्ति, विमल भक्ति, पराभक्ती असे म्हणतात. या भक्तीचे अवलंबन करणारेच खरे योगीराज. त्यांची योग्यता मी काय सांगू?
“यथेच्छ लोकीं वर्तणार I कोण धरी त्यांचा कर II
श्रुतीचेही शिरावर I वर्ते योगी II
त्या स्थितीला अनुलक्षून तुकाराम महाराज म्हणतात :-
“प्रारब्ध क्रियामाण I भक्तांसंचित नाही जाण II
अवघा देवचि जाला पाही II भरोनिया अंतर्बाही II
सत्त्व रज तम बाधा I नव्हे हरि भक्तांसी कदा II
खाये बोली करी I अवघा त्यांच्या अंगे हरि II
देवभक्त पण II तुका म्हणे नाही भिन्न II”
ज्ञानी भक्त जे जे काही करितो, ते ते त्या भगवंताचेच म्हणून समजतो. असो. या प्रमाणे जो आपला आत्मा तोच मुकुंद असे समजतो, त्यालाच शांती प्राप्त होते. ज्याच्या ठिकाणी अशी भावना नाही, त्याला शांती कोठून मिळणार? शांती प्राप्त होण्याला आधी ज्ञान पाहिजे, व ते मिळण्याला अंत:करण शुद्धी झाली पाहिजे. आरशामध्ये स्वच्छ प्रतिबिंब दिसावे म्हणून आरसा स्वच्छ असला पाहिजे, नाहीतर प्रतिबिंब बरोबर दिसणार नाही.
“एवं मुक्ती तेव्हा जेव्हा ज्ञान I ज्ञान ते की ज्याने नासे अज्ञान II
अज्ञान ते की आपणास आपण जन I न जाणती II”
सारांश, सर्व भूतांचा सहृदय आत्मा तोच मुक्तीदाता गोविंद असे समजल्याने मुक्ती मिळेल. तो अनुभव येण्याला अन्वय, व्यतिरेख ज्ञानाची जोड पाहिजे. कारण ‘ज्ञानादेव तू कैवल्यम II’ ज्ञान म्हणजे आपणास आपण जाणणे, त्याच्या व्यतिरिक्त तेवढे अज्ञान. मी देह मानणे हा अज्ञान रुपी भ्रम पहिल्याने गेला पाहिजे, कारण तो आहे तो पर्यंत ज्ञान कधीच प्राप्त होणार नाही. हटयोगादि साधनांनी ज्ञान कधीच प्राप्त होणार नाही आणि जोपर्यंत अनुभवजन्य ज्ञानाचा अभाव आहे, तोपर्यंत शांतीचा मागमूस लागणार नाही. जर गाठी द्रव्य असेल, तर बाजारांत गेले असता पदार्थ मिळू शकतील. तद्वत ज्ञान असेल तरच शांती सुख होईल. एरव्ही कोटी साधने जरी केली तरी सुख प्राप्ती होणार नाही हा सिद्धांतच समजावा. शिवाय हेही ध्यानांत ठेवावे की ज्ञान असून भक्तीबळ असेल, तरच शांती सुखाचा लाभ घडेल. नाहीतर “तो वरि तळमळरे, तळमळरे, जो नाही भक्ति बळ रे II
परंतु ज्ञान प्राप्त होणे, अक्षय शांतीचे सुख भोगणे हे केवळ भगवंताच्याच कृपेवर आहे :- “जरि हा हो कृपा करील नारायण I तरि हेंचि ज्ञान ब्रह्म होयII मुमुक्षु आपल्या सामर्थ्यावर ज्ञान मिळविन म्हणून म्हणेल तर ते मुळीच संभवनीय नाही, हाही सिद्धांत लक्षात ठेवावा. भगवंताची कृपा होण्यास, व त्या योगाने हा अलक्ष्य लाभ होण्यास एकच उपाय आहे.
“वर्णाश्रय विहित कर्म, करणे हा प्रथम धर्म, निरहंकृति कंजनयन ध्यात जा रे II सदा श्री हरिचे नाम मुखी गात जा रे II” वर्णाश्रमाला उचित अशी कार्ये करून ती सर्व यज्ञ तयांचा भोक्ता आणि सर्व भूत सुहृदय असा जो महेश्वर त्याला अर्पण केल्याने अंत:करण शुद्धी होईल. कारण भगवान अर्जुनाला म्हणतात :- मला भक्तीने अर्पण केलेल्या पदार्थांची फार आवड आहे, म्हणून हे कौंतेया,
“यत्तपस्यसि कौंतय तत्कुरुण्व मदर्पणम II”
कोणी मला प्रीतिने काही दिले ते मी मोठ्या प्रेमाने व आनंदाने भक्षण करतो. कारण जे काही भक्तीने माझा भक्त मला देतो, ते मला आवडते :-
”पत्र पुष्प फलं तोयं यो मे भक्तया प्रयच्छति I
तदहं भक्त्युप हृदमश्रामि प्रयतात्मन: II”
त्या मी आपल्या आनंदाच्याच परवडी म्हणून समजतो, व त्याचा मोबदला म्हणून त्याची मी अंत:करण शुद्धी करतो, आणि ज्ञान देऊन भक्ति देतो. मुक्ती माझ्या शिवाय दुसऱ्या कोणाच्याच हातात नाही. ज्याने वेद निर्माण केले, आणि ज्याने सृष्टीच्या आदिकाली ब्रह्मदेवाला ज्ञानोपदेश केला त्याच देवाला शरण जा. सर्व आपआपल्या परीने ईश्वरच आहेत. परंतु ज्ञान देण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य नाही. मी सर्व ईश्वराचा आत्मा आहे असे जाणून जो मला शरण येतो, त्यालाच ज्ञान प्राप्त होऊन अक्षय शांती मिळेल. म्हणून –
“एवं ज्ञाना वांचूनि न घडे मुक्ति I
ते तेव्हा की जेव्हा ईश्वर प्रसादा भिव्यक्ति II
तो प्रसाद होय करिता भक्ति I सर्वेश्वराची II
“पूर्ण करिता भगवद्भक्ति II” ज्ञान प्राप्त होईल. मग ते ज्ञान बाणल्यावर चित्तचैतन्य होईल. चित्तचैतन्य झाल्यावर देखील जो भक्ति करितो, त्या भक्तीला पराभक्ती, विमलभक्ति म्हणतात. त्या भक्तीच्या योगे ज्ञानी भक्त कृतकृत्य होतो. म्हणजे अखंड शांती सुख भोगतो. सारांश भगवानच एक मुक्तीदाता. इतर देवता कितीही सामर्थ्यवान असल्या तरी मोक्ष देऊ शकणार नाहीत, म्हणून वामन पंडित मोठ्या कळकळीने सांगतात :- त्या कृष्ण भगवंताच्याच चरणांचा आश्रय करा, म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त होऊन अक्षय शांती मिळेल. “अक्षय शांतीचा सुखदाता I केशव कवी म्हणे आता I तो मज आढळतो गुरु राजा I प्राण विसावा माझा II”
- नारायण -

ओम श्री गुरुदेव दत्त !
( दि. १६ जानेवारी २०२६ )

08/01/2026

श्री वामन पंडितांच्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ
"श्री सदगुरुभ्योनमः "
तारीख : ५.५.१९२७
अध्याय – ५
“अध्याय हा पंचमस्वात्म योगी I जो कर्म संन्यास करी सुयोगी II
तो श्रेष्ठ संन्यास म्हणे हरि तो I जो पार्थ मोहास ही संहरीतो II”
दुसऱ्या अध्यायांत स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना भगवंतांनी ओघाने असे सांगितले की जो पक्का ज्ञानी आहे त्याला कर्म करण्याची जरुरी नाही, आणि चौथ्या अध्यायाच्या शेवटी म्हणून गेले की, बाबा रे, तो कुशल कर्मयोगी आहे, त्यास कर्म करून देखील कर्मफलाची बाधा होत नाही. तर तू आता उठ, अन लढाई करण्यास सुरुवात कर असे ऐकताच अर्जुन बुचकळ्यात पडला की आता मी ह्या दोहींपैकी कोणती क्रिया करू. कारण दोन्ही क्रिया तर एकदम होणार नाहीत, असा दोहींकडून त्याला पेच पडला. कर्म करावे तर आताच लढाई करावी लागेल. तेव्हा त्यातून पार पडण्याचा इलाज भगवंतालाच विचारावा हे बरे, म्हणून अर्जुनाने प्रश्न केला की, हे भगवंता :-
“संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगंच शंससि I
यच्छ्रेय एत योरे कं तन्मे ब्रूहि सूनिश्चीतम II”
तू एकदा म्हणतोस की कर्म टाकून देणे याला संन्यास म्हणतात आणि तो कर्म भोगापेक्षा श्रेष्ठ म्हणून तुझे मत मी ऐकले. परंतु आता तूच मला सांगतोस की कर्म कर. तर कर्मयोग आणि संन्यास या दोहीत फरक काय आणि त्यापैकी श्रेष्ठ कोणते हे मला सांग. हा जो अर्जुनाने प्रश्न विचारला तो फार महत्त्वाचा आहे. कारण या दोही वाचून मोक्ष प्राप्त होणार नाही. मुमुक्षाला या दोन्हीची आवश्यकता आहे. म्हणून भगवान म्हणतात :-
“संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही श्रेयस्कर होत. परंतु त्या दोहोंमध्ये कर्माच्या संन्यासाहून कर्माचा योग हा श्रेष्ठ आहे.”
अर्जुना मोक्ष प्राप्तीला संन्यास अवश्य पाहिजे आणि कर्मयोग केल्याशिवाय संन्यास होत नाही असे हे परावलंबी आहेत. म्हणून आपले खरे कल्याण म्हणजे मोक्ष प्राप्ती करिता ह्या दोघांची अत्यंत जरुरी आहे. पण हे लक्षात ठेव की कर्म संन्यासापेक्षा कर्मयोगच श्रेष्ठ ठरेल. येथे पुन्हा अर्जुन घुटमळला. त्याला असे वाटते की कर्मापेक्षा संन्यास श्रेष्ठच असे असता भगवान संन्यासापेक्षा कर्मयोग थोर कसे म्हणतो? अशी शंका उद्भवल्याबरोबर अंतर साक्षी भगवंताने जाणले की त्याच्या समजुतीमध्ये घोटाळा उडाला आहे, म्हणून कर्मयोग म्हणजे काय ते त्याला पहिल्याने समजावून सांगितले. कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मे करून ती ईश्वरार्पण करणे. तसे केले असता चित्तशुद्धीद्वारा ज्ञान प्राप्त होऊन साधक मोक्षा प्रत जातो. जर नुसतीच निष्काम कर्मे केले आणि ती ईश्वरार्पण केली नाही, तर “कर्मणा पितृलोक: II तो पितृ लोकाप्रत जाईल आणि मोक्षाला अंतरेल.
आता संन्यास म्हणजे “काम्यानां कर्मणां न्यासं”, सकाम कर्मांचा समूळ त्याग करणे. हा अर्थ तुला न समजल्यामुळे तू लढाईला प्रवृत्त होत नाहीस. या करिता तू निष्काम कर्मे ईश्वरार्पण कर म्हणजे तेणे करून चित्तशुद्धीद्वारा तुला ज्ञान प्राप्त होईल. मग तुला असा प्रत्यक्ष अनुभव येईल.
“मैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित I
पश्चशृन्वन्स्पृश चिघ्रन्नश्रन्गच्छन्स्वपश्वसन II
प्रलपन्वीसृजन्गृहन्नन्मिषन्नीमिषन्नपि I
इंद्रियाणी द्रियार्धेषु वर्तत इति धारयन II”
अर्जुना! ज्याला आत्म स्वरूपाचे ज्ञान झाले आहे, तो कर्म करीत असतां देखील आपण काही करीत नाही ही भावना ठेवितो व सर्व क्रिया आपोआप प्रकृतीद्वारे घडत असतात हे तो पाहतो. हाच खरा कर्मयोगी आणि त्यालाच कर्म करून व केल्याचे श्रेय येते. “पद्मपत्र मिवात्रसा” म्हणजे “जसे कमलपत्र पाण्यापासून अलिप्त असते, तसा हा योगी कर्मे करून ही कर्मबंधनापासून अलिप्त असतो.
आता जन्मतारी कर्मठ लोकांच्या संगतीत असल्यामुळे ज्यांना कर्म करण्याचीच आवड असते, अशांना जर ज्ञान झाले तर ते कर्मेच करून सिद्ध पुरुष होतात, म्हणजे ते साहित्य, साधन आणि साध्य सर्वच ब्रह्मरूप पाहतात :-
“ब्रह्मार्पण ब्रह्म हनि ब्रह्मा ग्न्नौ ब्रह्मणाहुतम I
ब्रह्मै तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना II”
कित्येक ज्ञान प्राप्त झाल्यावर सांख्य योगाने अभ्यास करून पूर्णत्वास पावतात :-
“प्रकृत्यैवच कर्माणि क्रियमाणानि सर्वश: I
य: तश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति II”
सर्व कर्मे प्रकृतिच करते, आणि आत्मा अकर्ता आहे असे हा योगी दोन्ही निराळे पाहतो, म्हणून त्यालाच अकर्तेपणाचा ठसा उमटतो,
“योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय: I
सर्व भूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपिन लिप्यते II”
सिद्ध पुरुष कर्मे करीत असताना देखील आपण अकर्ते आहोत इकडेही लक्ष देत नाही. तरी सुद्धा तो कर्मांमध्ये लिप्त होत नाही. म्हणजे त्याची सर्व कर्मे ब्रह्मातच होत असतात, आणि तेच त्याचे अर्पण. साधक “नैव किंचित्क रोमीति” ह्यात वर्णन केल्याप्रमाणे अनुभव घेतो, व त्याचे कर्म ब्रह्मार्पण होते.
“कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वानुसृत स्वभावात II
करोनि यद्यत सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत II”
पूर्व संस्कारानुरूप सर्व क्रिया आपोआप आपल्याकडून प्रकृति करविते, आणि आपण त्या कर्माचे साक्षी आहोत अशी मुमुक्षु दृढ श्रद्धा ठेवितो. त्या श्रद्धेच्या योगे करून त्याची सर्व कर्मे ईश्वरास अर्पण होत असतात.
पहिल्याने तुला स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगण्याचा हेतू हा होता की तू निष्काम कर्मे करून चित्तशुद्धी द्वारा ज्ञान प्राप्त करून घे, आणि मग त्या सुखाचा लाभ घे. जसे फणसाचे गरे खावे म्हणून सांगितले असता, त्या फणसाच्या साली, काटे काढून टाकणे वगैरे ज्या क्रिया आहेत त्या अध्याद्द्त आहेत म्हणून समजाव्या. तसे स्थितप्रज्ञाची स्थिती प्राप्त होण्याच्या पूर्वी ज्या क्रिया कराव्या लागतात, त्याचा तू विचार करत नाहीस, आणि उगाच म्हणतोस की मला कर्म नको, मी लढाई करणार नाही हे बरोबर नाही. कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ खरे, पण ते प्राप्त होण्यास ‘परमपुरुष जो भगवान नारायण, त्याला सर्व कायिक, वाचिक आणि मानसिक कर्मे निष्काम बुद्धीने करून अर्पण केली पाहिजेत. तो ईश्वर कसा आहे, त्याची पहिल्याने ओळख पटवून घे, आणि मग त्याला वर सांगितल्याप्रमाणे भजले असता तुला अक्षय शांती मिळेल.
“भोक्तार यज्ञ तपसां सर्व लोक महेश्वरम I
सुहृदं सर्व भूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति II”

क्रमश: /=

ओम श्री गुरुदेव दत्त !
( दि. ८ जानेवारी २०२६ )

11/12/2025

श्री वामन पंडितांच्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ
"श्री सदगुरुभ्योनमः "
तारीख : ५.५.१९२७
भाग ५ वा : -
म्हणजे अशा पुरुषाचे ज्ञान झाल्यावर सर्व संशय जातात, आणि त्या नंतरची भक्ति म्हणजे ज्ञानयुक्त भक्ति किंवा पराभक्ती. ज्ञान हे मीठ आहे, आणि भक्ति हे अन्न आहे. मिठाशिवाय अन्नाला रुची येणार नाही. बरे नुसते ज्ञान आहे आणि भक्ति नाही, म्हणजे नुसते लवण चर्वण करण्यासारखे आहे.
“अंती या शेवटील्या श्लोकी I उत्तम श्लोक बोलिला की I
ज्ञान खड्डे, संशय छेदूनी टाकी I आणि ऊठ अनुष्टी भोगते II”
“उठ आळस करू नकोस. सगुण ईश्वराचे भजन कर, नाम गात जा, श्रवण कीर्तन कर आणि ज्या काही गोष्टी तुझ्या हातून घडतात, त्या सर्व “स्वभावस्तु प्रवर्तते”, पूर्व कर्मानुसार प्रकृती तुझ्याकडून करविते, तू केवळ त्यांचा साक्षी आहेस, असा पूर्ण विश्वास ठेव. अष्टांग योगाच्या भानगडीत तू मुळीच तू पडू नकोस.
“एवं झालीया ही ज्ञान I ज्ञानि भक्त भगवद्भजन I
करिती हे जगज्जीवन I सप्तमी, नवमी, द्वादशी सर्वच बोलेल II”
ज्ञान प्राप्त झाले तरी भगवद्भजन केलेच पाहिजे.
“मना तुजला गूज प्राप्त झाले I परि अंतरी पाहिजे यत्न केले II
सदा श्रवणे पाविजे निश्चयासी I धरी संगती सज्जनी धन्य होसी II”
सत्संगतीत नुसते ऐकावयाचे, दुसरे काही करावयास नको.
“पडोनिया राही I उगाचि संताचिये पायीं II
नलगे पुसावे सांगावे I चित्तशुद्ध करी भावें II”
नुसता पूर्णभाव ठेव की संताचा सर्व ठेवा तुला आपोआप अवगत होईल. पूर्वी शंकराचार्यांच्या गादीवर नेमणूक करावयाची असली म्हणजे जे १०-१२ उमेदवार असतील, त्या इसमांना काही दिवस एका खोलीत कोंडून ठेवीत असत. प्रत्येक दिवशी त्यापैकी एक एक इसम बाहेर जात असे. असे करिता करिता शेवटी जो राही, तो साक्षात पूर्ण शंकराचार्यच होऊन येत असे. तद्वत संताच्या चरणांचा ज्यांनी शेवटपर्यत आश्रय केला असेल ते प्रतिसंतच होत असतात. नुसते शास्त्र शिकून शिकून किती शिकणार?
“शास्त्रे फार अपार जीवित तुझे अत्यल्प की मानवा II
याकरिता जी पूर्णता येत असते, ती केवळ संतांच्या कृपेनेच येते.
“सर्वात्म भाव मनी I कृष्ण कृपेने दिन यामिनी I
दृढ असोनिही वामनी I आवडी सगुण भक्तीची II”
“परि नि निष्टीतोपि नैर्गुण्य उत्तम श्लोक लीलया I
गृहीत चेता राजर्ष आख्यान यदधीतवान II”
“ऐसे निर्गुण निष्ठ जीवन्मुक्त I तेही सगुण ब्रह्म भक्त I
पूर्ण सिद्ध होऊन अनुरक्त I सगुण चरणी II”
शुकाचार्य म्हणतात :- “जरी मला निर्गुणाचे करतलामलकवत-परिपक्व ज्ञान होते. तरी उत्तम पुरुष जो कृष्ण भगवान, त्याच्या लीला गायिल्याने आणि ऐकल्याने जसे माझे चित्त वेधले, तसे दुसऱ्या कोणत्याही साधनाने वेधले नाही. ज्या अर्थी शुकाचार्यासारखे, ज्ञानेश्वरासारखे ब्रह्मचारी सांगतात की कृष्णाच्या लीला अलौकिक आहेत आणि ते ब्रह्मचारी असूनही त्या लीलांचे महत्त्व गातात, त्या अर्थी त्यात विशेष काहीतरी असलेच पाहिजे हे उघड आहे. त्या लीला गायिल्याने, ऐकल्याने वैराग्य आपोआप उत्पन्न होईल व अंत:करण शुद्ध होईल:-
“गायींचे शिशुते पशु, परि सुधा ते तो श्रवे त्या मिसे II
कर्में आचरती समस्तही ऋषी वेदोदिते त्या रसे II
लोकोद्धार निमित्त गोपललना संगे मुकुंदे असे II
केले, त्या चरित्रामृता शुक मुखे राजर्षि प्याले तसे II”
“ऐसा गीतार्थ बिंबला मनी I तेचि शंका जाली वामनी I
जे पाहती दिन यामिनी I कृष्ण कृपा पात्र ते होती II”
“क्लेश स्वल्प महत्फळ I ज्ञाने सेविता कृष्णपद कमल II”
निर्मळ अंत:करणाने भगवंताचे नाम आणि लीला गा आणि देह पडल्यावर तुम्ही सरळ वैकुंठात जाल. हा श्री वामन पंडितांनी आशीर्वाद दिला आहे.
“कृष्णा विष्णु हरि गोविंद गोपाळ I मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा II”
“सकळ ही श्रीकृष्ण करणी I तोचि आला स्फुरे अंत:करणी I
तथापि हे टीका त्याच्या चरणी I भक्ति रसे समर्पी वामन II”

- नारायण -

ओम श्री गुरुदेव दत्त !
( दि. ११ डिसेंबर २०२५ )

04/12/2025

श्री वामन पंडितांच्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ
"श्री सदगुरुभ्योनमः "
तारीख : ५.५.१९२७
भाग ४ था : -
“यावन्नानात्मधी: पुंसो न निवर्तेत युक्तिभि: I
जागर्त्यपि स्वप्नज्ञ: स्वप्ने जागरण यथा II
“ज्याप्रमाणे निजलेला मनुष्य स्वप्नात नानातऱ्हेचे आकार आणि देखावे पाहतो, व व्यवहार करतो, तरी त्याला जागा म्हणता येणार नाही. त्याप्रमाणे जोपर्यंत नानत्वाची भावना गेली नाही व सर्वात्मता बाणली नाही, तोपर्यंत तो मनुष्य अज्ञानीच आहे असे समजले पाहिजे.” म्हणून ज्ञानयोग केला पाहिजे. सर्व जग भगवद्रूप दिसे पर्यंत या योगाच्या अभ्यासाची अत्यंत जरुरी आहे. “ते बाणायास साधन I ईश्वराचे आराधन I स्वकृत कर्मापण भजन I थोर येथे II
” ये तु सर्पाणी कर्माणि I मयि संन्यस्थ”
म्हणोनि I द्वादशी श्रीकृष्ण बोलेल की ज्ञानी I भक्त भज सर्व कर्मे अर्पिती I
“कर्म योग तो की नि:संग I ईश्वरी समर्पी II”
संपूर्ण कर्मे अर्पण करणे हे उगीच आहे, कारण कर्म करणे हे आपल्या हातातच नाही, आणि अर्पण हे “ओम तत्सदब्रह्मार्पणमस्तु” म्हणून होत नसते. मी एक आणि ते कर्म ईश्वराला अर्पण करतो ह्या कल्पनेने कर्म कधीच अर्पण होत नाही. मी कर्ता ही भावनाच उठता कामा नये. “मी मजला पावुनी I स्थिर तेथे राहुनि, कल्पनाही जाय जंव आप आपेलया II ऐसी करी हो दया, परतोनि मन न घरी ह्या देहाची माया II सोहिरा म्हणे निरामया, झालीच ना हेचि काया I मिठी पडली चिन्मयासी I मिनली तन्मया ऐसी करी II” जसे “विटेवरी उभा कटेवरी हात II” आणि “काया ही पंढरी I आत्मा हा विठ्ठल II” वगैरे ह्या वाद्यसंज्ञा होत, तसे “ओम तत्सत” हे अर्पणाचे वाद्य चिन्ह आहे.
“यज्ञानार्थात्कर्मणोन्यत्र I पुर्वाध्यायांत हा निर्णय पवित्र I
बोलिला कमल नेत्र I की बंध या वेगळ्या कर्म मात्री II”
कर्माच्या बंधनांतून सुटण्याला एकच उपाय आहे, आणि तो ह्या श्लोकात दिला आहे. “सुकृत लौकिक वैदिक पांडवा I मज समर्पुनि तू करि तांडवा I करिसी होमिसि भक्षिसि देशिरे I मजमध्येच समर्पित ते शिरे II”
ह्यालाच भगवददास्य म्हणतात. त्याशिवाय दुसरे काहीच करावयास नको. “कर्म योगाचे लक्षण I दोन अध्यायी कमलेक्षण I बोलिला की निष्काम ईश्वरार्पण I तोचि कर्मयोग II”
सर्व गीता यांत आटोपली. कारण निष्काम ईश्वरार्पण केल्याने अंत:करण शुद्धी होते आणि ते करून ज्ञानप्राप्ती होते. मग पुढे चित्तचैतन्य होते आणि शेवटी ज्ञानी भक्त वैकुंठात जातो. तेव्हा “निष्काम ईश्वरार्पण” हा मूळ पाया आहे.

“एवं जालिया ही ज्ञान I विहित गीतेत सगुण भजन I हे विचारून सज्जन I अभिमानाते दवडूनी.”

ज्ञान झाल्यावर सर्व आटोपले असे कित्येकांचे मत आहे. पण तो गैरसमज आहे, कारण चित्तचैतन्य होईपर्यंत ज्ञान भ्रष्ट होण्याची धास्ती आहे. ते ज्ञान टिकवण्याकरिता किंवा वाढविण्याकरिता सगुण भजनाची अत्यंत जरुरी आहे.

“ऐसा अध्याय चतुर्थ I येथे बोलिला समर्थ I की ज्ञान होऊनि ही यथार्थ I करावे सगुण भजन II”

म्हणून भगवंताने अवतार घेऊन नाम आणि लीला केल्या. त्या लीला इतरांसारख्या नाहीत. त्या अलौकिक आहेत.

“जन्म कर्मच मे दिव्य म्हणोनि I या श्लोकी तत्त्वज्ञाने करुनी I माझे जन्म कर्म दिव्य जाणे तो देह सोडूनि I मातेपावे जन्मा पुन्हा न ये हे बोलिलाII”

मी ज्या लीला केल्या त्या अलौकिक होत. त्यांच्यामध्ये असे सामर्थ्य ठेविले आहे की, त्या गायिल्या असता :- “त्यक्त्वा देहं पुनर्जन्म न एति मामेति सोर्जुन II” त्याला सगुण मुक्ती प्राप्त होते. “इत्यादि सगुण पर I अध्यायारंभ करी ईश्वर I ब्रह्मार्पण श्लोके चक्रधर I सगुण प्राप्ती बोले ज्ञानियासी II ब्रह्मैव तेन गंतव्य म्हणोनी I ब्रह्मचि झाला जो ज्ञानी I त्यास ही सगुण ब्रह्म प्राप्ती स्ववचनी I अनन्य गतिकत्वे बोलिला II” म्हणजे सगुणाच्या ध्याने करून जो पूर्णता करून घेतो तो :-
“मांचयोव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते I
स गुणान्समती त्यैतान ब्रह्मभूथाय कल्पते II
आणि जो एकनिष्ठ भक्तियोगाने, अनन्य भावाने माझी सेवा करितो, तो निश्चय करून त्या गुणांना उत्तम प्रकारे जिंकून सगुण ब्रह्म होण्याला योग्य होतो.
“की स्थिरता ब्रह्मानंदानुभव I ज्ञानियास देह असता जे वैभव I
ते नसे तेव्हा स्वये एकमेव I ब्रह्म मात्र आहे तैसेच उरते II”
जे निर्गुणाचीच नुसती उपासना करतात, त्यांना देह पडल्यावर सायुज्यताच मिळते. त्यांच्या दुःखाचा तर नाश होतोच, पण त्त्याबरोबर सुखाचाही अंत होतो. सायुज्यतेंत सुखाचा अनुभव घेण्यास वृत्ती राहत नाही. ती ब्रह्मात लीन होते. जसा पावसाचा थेंब समुद्रात पडतो, तेव्हा तो सागरापासून निराळा राहत नाही, तशी सायुज्यतेंत वृत्ती ब्रह्माशी ऐक्य पावते.
“घनाच्या मूखें सिंधूचा बिंदू जैसा I मिळे सागरी निर्गुणी मोक्ष तैसाII”
परंतु सगुणोपासकांची देह पडल्यावर देखील सगुण मोक्षाचा आनंद भोगण्याकरिता सत्त्ववृत्ती कायम रहाते, म्हणून त्यांना अखंडानंदानुभव सतत भोगता येतो. ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळाल्यावरही नदी म्हणून निराळी राहतेच.
“सदा भेटते ऐक्य पावोनी गंगा I समुद्री असी भक्ति हे अंतरंगा II”
“यथा नद्य: स्पंदमाना: समुद्रे स्तंगच्छन्ति नामरूपे विहाय I
तथा विद्वान्नामरूपाद्विमुक्त: परात्परं पुरुष मुपैति दिव्यम II”
म्हणून ज्ञानीयास सगुण भजन परम I बोलिला शीघ्र सिद्धिप्रदत्त्वे II त्याचे चित्तचैतन्य लवकर होते.
“योगी म्हणजे ईश्वराराधनेचे ठायी I कर्म अर्पणे ईश्वराचे पायी II
की या मागितल्या श्लोकी शेषशायी II हाचि बोलिला योग शब्दार्थ II”
“योग संन्यस्त कर्माण” म्हणोनि I या चरणे हेंचि सुचवूनी I
बोलिला त्या वरुनी I हा अर्थ येथेही साधतो II”
ईश्वराराधन हाच योग केल्याने चित्तचैतन्य लवकर होते. “योगी कर्मे समर्पी जो अगोचर I” तो “योग संन्यस्त कर्मा” म्हणावा I आणि ज्ञाने संच्छीन्न पांडवा I संशय ज्याचे II” “योग संन्यस्त कर्मा म्हणजे I योगी समर्पी कर्म वृंद करि जे जे I तेव्हा योग शब्दे घेतले पाहिजे ईश्वराराधन II की कर्मे अर्पी ईश्वराराधनेचे ठायी I एवं करणे आराघन, अर्पणे पायी I त्या पुरुषास म्हणे शेषशायी I ज्ञान संच्छीन्न संशय म्हणोनी II”

क्रमश: /=

ओम श्री गुरुदेव दत्त !
( दि. ४ डिसेंबर २०२५ )

27/11/2025

श्री वामन पंडितांच्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ
"श्री सदगुरुभ्योनमः "
तारीख : ५.५.१९२७
भाग ३ रा : -

भगवंतांनी अर्जुनाला ज्ञानाचे महत्त्व आणि ज्ञान प्राप्तीची सर्व साधने सांगितल्यावर ते ज्ञानाच्या पुढच्या स्थितीचे वर्णन करतात :-
“योग संन्यस्त कर्माण ज्ञान संछिन्न संशयम I
आत्मवंतं न कर्माणि निबधन्ती धनंजय II
निष्काम कर्मे ईश्वरार्पण केल्याने ईश्वराची कृपा होते. त्याच्या कृपेने संत संगती आपोआप मिळते व त्याच्या जवळ शास्त्र श्रवण केल्याने ज्ञान प्राप्त होते. मग त्या ज्ञानाच्या योगाने सर्व संशय नाहीसे होतात.
“भिद्यते हृदय ग्रंथि:च्छीद्यते सर्व संशय: II”
“मग कर्मे तथा I
काही न बाधती धनजंया I
संचिते जळतां जया I
मोक्ष, सरता प्रारब्ध II”
म्हणून हे अर्जुना I तू मानूनी माझ्या वचना I ऊठ झगड पांडुनंदना II”

“तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थ ज्ञानासिनात्म्न: I
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत II”

“यासाठी हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला असा जो तुझ्या हृदयांतील संशय, तो ज्ञानरूप शस्त्राने तोडून टाक, आणि योगाचा आश्रय कर, ऊठ II”

ही गोष्ट महत्वाची आहे. पहिल्याने ज्ञान संपादन करून घे आणि मग ज्ञान खड्डाने सर्व संशय छेदून टाक.
“अगा! जो झाला ज्ञानी I त्यास कर्मे न बाधों शकती म्हणोनी I बोलिलो तूतें पूर्व श्लोके करुनी I या कारणे II”
ज्ञान झाल्याशिवाय जर देह पडला, तर लक्ष चौऱ्याशी फेरे फिरावे लागतील. ज्ञानाने ते फेरे चुकतील. “ज्ञानदेवा तू कैवल्यम.” ते प्राप्त होण्याला कर्म केले पाहिजे. मला वास्तविकरित्या कोणाच्याच कर्माची आवश्यकता नाही. तथापि मी ही लोकांसारखीच कर्मे करतो. तू माझा भक्त आहेस म्हणून मी तुला सांगतो की तू ही निष्काम बुद्धीने कर्म कर, मग ज्ञान प्राप्त होईल. ते प्राप्त झाल्यावर म्हणजे ज्ञान नौकेत बसल्यावर कर्मे करूनही तू अलिप्त राहशील.
“मी एक साचा मारणार I हे एक साचे मारणार I या संशयाचा छेद करणार I एकचि खड्ग ज्ञानाचा II” ‘मी’, ‘तू’ हा भ्रम मग औषधाला देखील उरणार नाही. “ज्ञान जालियाहिवरी I अर्जुना I तू कर्म योग करी I म्हणूनी म्हणतो हरि I या भावे II” ह्या योगाचा आश्रित हो. ह्या योगाचा अभ्यास केला पाहिजे. नाहीतर बुद्धीवर रजतमाचे लेप चढतील, मग बुद्धि तदाकार होणार नाही. “की पावोनि अद्वैत खुणे I सर्वात्मत्त्व ही जरी होणे I तरी ते अभ्यासे बाणे I मोडूनि पूर्व संस्काराते II” पूर्व संस्कार मोडल्याशिवाय ‘नानात्व’ जाणार नाही.
“यावन्नानात्मधी: पुंसो न निवर्तेत युक्तिभि: I
जागर्त्यपि स्वपन्नज्ञ: स्वप्ने जागरण यथा II
“ज्याप्रमाणे निजलेला मनुष्य स्वप्नात नानातऱ्हेचे आकार आणि देखावे पाहतो, व व्यवहार करतो, तरी त्याला जागा म्हणता येणार नाही. त्याप्रमाणे जोपर्यंत नानात्वाची भावना गेली नाही व सर्वात्मता बाणली नाही, तोपर्यंत तो मनुष्य अज्ञानीच आहे असे समजले पाहिजे.” म्हणून ज्ञानयोग केला पाहिजे. सर्व जग भगवद्रूप दिसे पर्यंत या योगाच्या अभ्यासाची अत्यंत जरुरी आहे. “ते बाणायास साधन I ईश्वराचे आराधन I स्वकृत कर्मापण भजन I थोर येथे II” ये तु समर्पाणी कर्माणि I मयि संन्यस्थ” म्हणोनि I द्वादशी श्रीकृष्ण बोलेल की ज्ञानी I भक्त भज सर्व कर्मे अर्पिती I “कर्म योग तो की नि:संग I ईश्वरी समर्पी II” संपूर्ण कर्मे अर्पण करणे हे उगीच आहे, कारण कर्म करणे हे आपल्या हातातच नाही, आणि अर्पण हे “ओम तत्सदब्रह्मार्पणमस्तु” म्हणून होत नसते. मी एक आणि ते कर्म ईश्वराला अर्पण करतो ह्या कल्पनेने कर्म कधीच अर्पण होत नाही. मी कर्ता ही भावनाच उठता कामा नये. “मी मजला पावुनी I स्थिर तेथे राहुनि, कल्पनाही जाय जंव आप आपेलया II ऐसी करी हो दया, परतोनि मन न घरी ह्या देहाची माया II सोहिरा म्हणे निरामया, झालीच ना हेचि काया I मिठी पडली चिन्मयासी I मिनली तन्मया ऐसी करी II” जसे “विटेवरी उभा कटेवरी हात II” आणि “काया ही पंढरी I आत्मा हा विठ्ठल II” वगैरे ह्या वाद्यसंज्ञा होत, तसे “ओम तत्सत” हे अर्पणाचे वाद्य चिन्ह आहे.
“यज्ञानार्थात्कर्मणोन्यत्र I पुर्वाध्यायांत हा निर्णय पवित्र I
बोलिला कमल नेत्र I की बंध या वेगळ्या कर्म मात्री II”

कर्माच्या बंधनांतून सुटण्याला एकच उपाय आहे, आणि तो ह्या श्लोकात दिला आहे.

“सुकृत लौकिक वैदिक पांडवा I मज समर्पुनि तू करि ताडवा I करिसी होमिसि भक्षिसि देशिरे I

क्रमश: /=

ओम श्री गुरुदेव दत्त !
( दि. २६ नोव्हेंबर २०२५ )

20/11/2025

श्री वामन पंडितांच्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ
"श्री सदगुरुभ्योनमः "
तारीख : ५.५.१९२७
भाग २ रा : -
“ऐसा अंत:करणी I साशंक झाला II”
हे भगवंताने जाणले.
“तो पुसे तो स्वमेव I हांसोनि बोलतो हा श्लोक II”
“जन्म कर्मच मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वत: I
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन II”
माझे नाम आणि माझ्या लीला गाऊन सर्व लोकांनी आपला उद्धार करून घ्यावा याकरिता मी अवतार घेतो.
“दिव्ये माझी चरित्रे I लोकांसारखी नव्हती निश्चिते I ऐसे समजेल जो त्याते I मोक्षचि होय II” असा अवतार महिमा सांगता सांगता भगवान यज्ञाकडे वळले.
“द्रव्य यज्ञास्तपो यज्ञा योग यज्ञा यज्ञास्तथापरे I
स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतय: संशितव्रता: II”
असे नानातऱ्हेचे यज्ञ सांगितले आहेत, आणि लोक आपल्या आवडीप्रमाणे ते करतात. जो काहीच यज्ञ करीत नाही, त्याने निदान उपवास, व्रते वगैरे तरी करावी. जो ‘अयज्ञ’ म्हणजे जो काहीच यज्ञ करीत नाही, जो केवळ नास्तिक आहे, तो मात्र अगदी वाईट. सर्व यज्ञामध्ये ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे, कारण “सर्व कर्माखिलं पार्थ ज्ञाने परि समाप्यते II”
“ज्ञाने सर्व कर्म सरे I पुनरावृत्तीस हेतू काही न उरे II” पण हे ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे व कोणाकडून घ्यावे हे “अर्जुन नेणे काहीच रीती I म्हणवुनि श्री कृपा सिंधु त्या प्रती II” हे ही उपदेशितो या श्लोकी :-
“तद्विद्धि प्रणि पातेन परिप्रश्नेन सेवया I
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्व दर्शिन: II”
“जे ज्ञानि शास्त्रे जाणती सकळ I अद्वैत बोलती प्रांजळ II” म्हणोनि “शास्त्रज्ञ आणि अनुभवी I साजे त्याला गुरुत्व पदवी I तोचि जगद्गुरू गोसावी I की शास्त्रज्ञ आणि अनुभवी परिपक्व II”
“जो शब्दज्ञाने पारंगत I ब्रह्मानंदे सदा डुल्लत I
शिष्य प्रबोधनी समर्थ I तो मूर्तिमंत स्वरूप माझे II”
नुसता अनुभव आहें पण शास्त्र ठाऊक नाही, तर त्याला शिष्याचे संशय दूर करता येणार नाही. “असोनिही अनुभव I ज्यास नाही शास्त्र वैभव I ते चुकविती आपुला पुनर्भव I परी उद्धरू न शक्ती मुमुक्षुते II” बरे ज्यांना शास्त्र माहिती पुष्कळ आहे, जे अद्वैता संबंधाने अघळपघळ बोलतात, पण “अनुभव पुसता केवळ I तोंड वांसिती II” असेही गुरु काही कामाचे नाहीत. “या करिता गुरु I अनुभव सुखाचा कल्पतरू I वेद जंबूद्विपाचा मेरू I तोचि सेवावा II” अशा सत्पुरुषाची सेवा करावी, म्हणजे त्याच्या कृपेने तुला ‘अन्वय’ व ‘व्यक्तीरेख’ ज्ञान प्राप्त होईल.
“येन भूतान्य शेषेण द्रक्ष्यस्यात्मथोमयि II”
“सर्व भूते तूं आपल्या ठायी आणि
माझ्या ठायी अभेद्पणाने पाहशील.”
मग मी एक पांडव आणि इतर कौरव त्या जडाभिमानाचे तूं तांडव करणार नाहीस. तसेच “भीष्मादिवधे पाप I अर्जुनास वाटे अनुताप I तो हरावया पूर्वोक्त ज्ञान प्रताप I प्रकारांतरे बोलतो दो श्लोकी II”
“अपि चेदसि पापेभ्य: सर्वेभ्य: पापकृत्तम: I
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि II”
“जरी कदाचित तू सर्व पाप्यांपेक्षा अत्यंत पापी असलास, तरी तू ज्ञानरूप नौकेच्या योगाने सर्व पापसमुद्र अनायासे तरून जाशील.” ज्याप्रमाणे नावेत बसले असता सर्व बाजूला पाणीच पाणी असते, परंतु नावेत बसणाऱ्याच्या अंगावर पाण्याचा एक शिंतोडा देखील उडत नाही, तद्वत “पृथ्वीवरील पापी I त्याहूनी थोर होशील तथापि I या ज्ञान नावेने कदापि I न बुडता, तरसी समुद्र पापाचा II” म्हणजे क्रियमाणाचा लेप तुला लागणार नाही, व ज्ञान जसजसे बाणत जाईल, तसतसे तुझे अनेक जन्मकृत संचित दग्ध होत जाईल.
“यथेधांसि समिद्धो अग्निर्भस्मसात्कुरुतेर्जुन I
ज्ञानाग्नि: सर्व कर्माणि भस्मसात्कुरुते तथा II”
“अर्जुना जैसी काष्टे I ओली कोरडी यथेष्टे II पेटला अग्नि अवष्टे I न उरवी करीच भस्म II” त्याप्रमाणे हा ज्ञानानळ अभ्यास आणि वैराग्य या दोन साधनांनी धडकू लागेल, तेव्हा पाप पुण्यरूप अनेक जन्मकृत संचिते भस्म होऊन जातील. अशा रीतीने भगवान ह्या व पुढच्या श्लोकात ज्ञानाचा महिमा वर्णन करितात :-
“नहि ज्ञानेन सदृशं पवित्रामिह विद्यते II
तत्स्वयं योग संसिद्ध: कालेनात्यनि विंदति II”
“नाहीं नाहीं नाहीं I ज्ञानासारखे पवित्र काही I संसार दु:ख सरिता प्रवाही I तारू न असे या सारिखे II” कर्मयोग जो नीट करतो, तो ज्ञानाला अधिकारी होतो. ज्याची वेदावर व गुरुवचनावर पूर्ण श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होईल. “श्रद्धावांल्ल्भते ज्ञानम II”
परंतु जे अज्ञ, अश्रद्दधान किंवा संशयी आहेत, त्यांच्या ते पचनी पडत नाही. “अज्ञपश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति I नायं लोकोस्ति न परोन सुखं संशयात्यन: II”
जो अज्ञ आहे, आणि ज्याला श्रद्धा नाही, आणि ज्याचे मन सदा संशयी तो नाश पावतो. ज्याचे मन संशयी त्याला हा लोक नाही, परलोकही नाही आणि सुखही नाही.
अज्ञ जो आहे, त्याला हे ज्ञान आकलन होत नाही. “सहज लोक अज्ञानी I तेही म्हणावे अज्ञ म्हणोनी II” ज्ञान प्राप्त झाल्यावर सत्त्व फारसे नसल्यामुळे “पांडित्यबळे द्वैत अज्ञान I तेंचि ज्ञान अद्वैत म्हणून I बरळू लागला II” आणि गुरूच्या ठिकाणी ज्याची अंधश्रद्धा उत्पन्न झाली आहे, तो ‘अश्रद्दधान.’ संशयी जो आहे त्याची कोठेच श्रद्धा बसत नाही. तो जसा “A rolling stone gathers no moss“ म्हणजे “गडगडत जाणाऱ्या दगडावर शेवाळ कधीच वाढत नाही, त्याप्रमाणे आहे.

क्रमश: /=

ओम श्री गुरुदेव दत्त !
( दि. २० नोव्हेंबर २०२५ )

13/11/2025

श्री वामन पंडितांच्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ
"श्री सदगुरुभ्योनमः "
तारीख : ५.५.१९२७
अध्याय – ४
“जय जय सकळ रुप I जय जय सकळरूपा अप्रुप I
जय जय सच्चिदानंद I जगद्गरो! जय जय शेषफणी गुण II
जय जय सगुण निर्गुण I पार्थ सारथे! II वंदूनि तुझे श्री चरण I
गीता चतुर्थाध्याय विवरण I करीन म्हणतो शरण I सर्व भावे II”
श्री सद्गुरूभ्यो नम: II भगवंताच्या मनात आले की आता ज्ञानाची थोरवी सांगून अर्जुनाच्या मनात ज्ञान प्राप्तीची आवड उत्पन्न करावी, म्हणजे ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तो यथासांग कर्मे करावयास – अर्थात सध्या लढाई करण्यास तयार होईल. कारण आता त्याला हे समजले आहे की, विहित कर्मे ईश्वरार्पण केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही. या करिता ज्ञानाच्या महत्वाचे वर्णन करावे म्हणून श्री भगवान म्हणतात :-
“इभं विवस्वते योग प्रोक्तवान हमव्ययम II
विवस्वान्मनवेप्राह मनुरिक्ष्चाकवेब्ररीत II”
“हा ज्ञानयोग काही युगापुर्वी मी सूर्याला सांगितला होता. पुढे सूर्याने आपला पुत्र जो मनु त्याला सांगितला.
“श्राद्धदेव म्हणावे ज्याला I तयास हा योग मोलता झाला II
दिवाकर II त्या श्राद्धदेव मनुचा पुत्र I ए इक्ष्वाकु नामे पवित्र I
यास हा योग विचित्र I तो बोलिला II”
पुढे कालांतराने असे झाले की सत्त्वाचा लोप होत चालला तसा हा ज्ञानयोग नष्ट झाला.
“एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्ष योविदु: II
स काले नेह महता योगो नष्ट: परंतय II”
ह्या योगाचे जाणते कोणी न उरल्यामुळे तो पुन्हा मज प्रत आला.
“म्हणोनि म्हणता परंतया I ज्ञान देऊनि चेतवी त्याच्या प्रतापा I
आता तो योग तुज बोलिलो ऐसी कृपा I दाऊनि बोलतो याश्लोकी II”
“स एवायं मया तेद्य योग: प्रोक्त: पुरातन: I
भक्तोसि मे सखा चेति रहस्य द्येत दुत्तमम II”
जो मी काही युगांपूर्वी सूर्याला सांगितला, “तो योग पुरातन II कल्पांती मज माजी होता जतन II” तो योग तुला सांगतो. यांचे कारण “तू भक्त आणि सखा विवेकी I अगा! अत्यंत II” परंतु अर्जुनाच्या मनात शंका आली की कृष्ण म्हणतो की मी हा योग काही युगापूर्वी सूर्याला सांगितला, हे संभवनीय कसे होईल, कारण कृष्ण आणि मी एकाच युगात जन्मालो. सद्गुरूच्या ठिकाणी असलेली श्रद्धा केसा इतकी सुद्धा डळमळीत होता कामा नये. तसे झाले तर परमार्थाची इतिश्रीच झाली म्हणून समजावे. म्हणून अर्जुन म्हणतो :-
“अपरं भवतो जन्म परं विवस्वत: I
कथमेद्विजानीयां त्वमा दौ प्रोक्तवानिति II”
कृष्णाने सूर्याला उपदेश कसा केला? त्याचा जन्म अलिकडचा आणि सूर्याची उत्पत्ति पलिकडची. “बरे, देव हुति जननी I तिचा पुत्र कपिल मुनी I तीस तो स्वमुखे करुनी I सांगे तत्त्वोपदेश II” असा धाकट्याने मोठ्यास उपदेश केला असे हा म्हणतो, म्हणजे हा खरोखर गप्पा मारतो असे झाले.
ह्या शंकेचे भगवंतांनी असे निवारण केले :-
“बहूनि मे व्यतीता नि जन्मा नि तव चार्जुन I
तान्य हं वेद सर्वाणि व त्वं वेत्थ परंतप II”
या उत्तराने अर्जुनाचे समाधान झालेच, पण दुसरी एक शंका आली की आम्ही आमच्या कर्मानुरूप जन्म घेतो. पण तसे तुझे नाही. तेव्हा तू का जन्म घेतोस त्याचे कारण मला समजत नाही. त्या शंकेचे भगवंतांनी असे निवारण केले.
“परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम I
धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे II”
“त्या साधूंची संरक्षणे I अगा! करावया कारणे I मज लागते देह धरणे I युगायुगा प्रती II” असे भगवंतांनी सांगितले, तरी अर्जुनाचे मनापासून समाधान झाले नाही.
“की साधूचे पालन I आणि दुष्टांचे निर्दलन I आणि तिसरे धर्माचे स्थापन I काय कठीण या ईश्वरा II” नुसत्या संकल्प मात्रे I ब्रह्मांडे अनंत विचित्रे I उपजती नासती आणि माया सूत्रे I नाचवी बुद्धि सर्वांच्या II”
भगवंताला ह्या तीन कामांसाठी जन्म कशाला घ्यावयास पाहिजे? ह्या गोष्टी त्याला केवळ संकल्प मात्रेच करून करता येतील. अशी शंका अर्जुनाच्या मनांत उद्भवली.
क्रमश: /=

ओम श्री गुरुदेव दत्त !
( दि. १३ नोव्हेंबर २०२५ )

Address

Sadbhakti Mandir Saraswati Baug Road, Saraswati Baug, Natwar Nagar, Jogeshwari East
Mumbai
400060

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sadbhakti Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category