16/01/2026
श्री वामन पंडितांच्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ
"श्री सदगुरुभ्योनमः "
तारीख : ५.५.१९२७
भाग २ रा : -
जो यज्ञ तपाचा भोक्ता आहे , तोच सर्व प्राण्यांचा ईश, स्वामी, देवाधिदेव असून अनादी सखा आहे असे जाणून जो त्याची भक्ति करितो, तोच निर्वाण शांतीप्रत जातो. आपण आपल्यावर जेवढी प्रीति करतो, तेवढीच आपल्या ईश्वरावर प्रीति असणे हे खरे प्रीतीचे लक्षण आहे. कदाचित जगातल्या अनेक पदार्थांच्या ठिकाणी आपली अनावडी होण्याचा संभव आहे, पण आपली स्वतःची अनावडी कधीच होऊ शकणार नाही. ज्या आत्म्याची ओळख नसताना त्याच्या विषयी आपले एवढे प्रेम आहे, त्या आत्म्याची ओळख करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. तो इतका अत्यंत जिवलग सखा असून त्याची आपणाला का ओळख पटत नाही? “मी पणामुळे”, “अहंकारामुळे” ती पटत नाही, म्हणून त्या अहंकाराचा जर नायनाट केला, तर सहजच कार्य होईल.
“परम आवडी आपुली आपणा I वळख तू तुज टाकुनि मीपणा II”
आत्मस्वरूपाचा विसर पडल्यामुळे आत्म्याशी निकट असलेला अहंपणावर प्रेम जडले. देहच ‘मी’ अशी भावना झाल्यामुळे देहावर प्रेम जडले, व पुढे देहाचे जे संबंधी ते आपले संबंधी वाटू लागले. अशा रीतीने गोंधळ वाढतच चालला, आणि आत्म्याबद्दल कोणी चौकशीच करीनासे झाले. देह प्रिय का वाटतो याचा कोणी सारासार विचार करीत नाही. त्याच देहाच्या एका भागाला इजा झाली, व त्यामुळे सर्व देहाला अपाय होण्याचा संभव असला, तर तो भाग कापून टाकण्यास तो तयार होतो. हे असे का? केव्हा केव्हा तर तो देहावरच उदार होतो. म्हणजे आत्महत्या करण्यास तयार होतो याचा बारकाईने शोध केला तर असे कळून येईल की एका आत्म्याच्या अत्यंत प्रीतीमुळे त्याला सुख व्हावे म्हणून तो जीवावर देखील उदार होतो. सेवक आपल्या सुखाकरिता राजाची सेवा करतो. भार्येला पती आपल्याच कार्याकरिता प्रिय होतो. पतीच्या कार्याकरिता नव्हे. देवाच्या कार्याकरिता देव भक्ताला प्रिय होत नसतो, तर आपल्याच कर्माकरिता देव प्रिय होतो. भुक्ती, मुक्ती आपणाला मिळावी एतदर्थ भेदवादी जे आहेत ते देवाची उपासना करतात. म्हणून त्यांचे भजन पूजन निर्निमित्त होत नाही. त्यांच्या इच्छेप्रमाणे जर भजन पूजनाचे फळ मिळाले नाही, तर ते देवाला शिव्या देण्याला कमी करत नाही. परंतु जे माझे भक्त आहेत, ज्यांना मीच हवासा असतो त्याचस भजन निर्निमित्त असते. त्यांना मुक्तीची देखील पर्वा नसते :-
“फिकी मुक्ती भक्ति पुढे ज्ञान याला I
स्वये मुक्ती देती पहाती तयाला II
मुमुक्षुसही कामना मोक्ष कामी I
न भक्तास जे देखती मुक्ती नामी II”
भगवान म्हणतात :- अर्जुना, तू माझा भक्त आहेस, या करिता ती त्रिदोष रहित जी अति पवित्र भक्ति आहे ती कर. त्या भक्तीलाच मुक्तीवरची भक्ति, विमल भक्ति, पराभक्ती असे म्हणतात. या भक्तीचे अवलंबन करणारेच खरे योगीराज. त्यांची योग्यता मी काय सांगू?
“यथेच्छ लोकीं वर्तणार I कोण धरी त्यांचा कर II
श्रुतीचेही शिरावर I वर्ते योगी II
त्या स्थितीला अनुलक्षून तुकाराम महाराज म्हणतात :-
“प्रारब्ध क्रियामाण I भक्तांसंचित नाही जाण II
अवघा देवचि जाला पाही II भरोनिया अंतर्बाही II
सत्त्व रज तम बाधा I नव्हे हरि भक्तांसी कदा II
खाये बोली करी I अवघा त्यांच्या अंगे हरि II
देवभक्त पण II तुका म्हणे नाही भिन्न II”
ज्ञानी भक्त जे जे काही करितो, ते ते त्या भगवंताचेच म्हणून समजतो. असो. या प्रमाणे जो आपला आत्मा तोच मुकुंद असे समजतो, त्यालाच शांती प्राप्त होते. ज्याच्या ठिकाणी अशी भावना नाही, त्याला शांती कोठून मिळणार? शांती प्राप्त होण्याला आधी ज्ञान पाहिजे, व ते मिळण्याला अंत:करण शुद्धी झाली पाहिजे. आरशामध्ये स्वच्छ प्रतिबिंब दिसावे म्हणून आरसा स्वच्छ असला पाहिजे, नाहीतर प्रतिबिंब बरोबर दिसणार नाही.
“एवं मुक्ती तेव्हा जेव्हा ज्ञान I ज्ञान ते की ज्याने नासे अज्ञान II
अज्ञान ते की आपणास आपण जन I न जाणती II”
सारांश, सर्व भूतांचा सहृदय आत्मा तोच मुक्तीदाता गोविंद असे समजल्याने मुक्ती मिळेल. तो अनुभव येण्याला अन्वय, व्यतिरेख ज्ञानाची जोड पाहिजे. कारण ‘ज्ञानादेव तू कैवल्यम II’ ज्ञान म्हणजे आपणास आपण जाणणे, त्याच्या व्यतिरिक्त तेवढे अज्ञान. मी देह मानणे हा अज्ञान रुपी भ्रम पहिल्याने गेला पाहिजे, कारण तो आहे तो पर्यंत ज्ञान कधीच प्राप्त होणार नाही. हटयोगादि साधनांनी ज्ञान कधीच प्राप्त होणार नाही आणि जोपर्यंत अनुभवजन्य ज्ञानाचा अभाव आहे, तोपर्यंत शांतीचा मागमूस लागणार नाही. जर गाठी द्रव्य असेल, तर बाजारांत गेले असता पदार्थ मिळू शकतील. तद्वत ज्ञान असेल तरच शांती सुख होईल. एरव्ही कोटी साधने जरी केली तरी सुख प्राप्ती होणार नाही हा सिद्धांतच समजावा. शिवाय हेही ध्यानांत ठेवावे की ज्ञान असून भक्तीबळ असेल, तरच शांती सुखाचा लाभ घडेल. नाहीतर “तो वरि तळमळरे, तळमळरे, जो नाही भक्ति बळ रे II
परंतु ज्ञान प्राप्त होणे, अक्षय शांतीचे सुख भोगणे हे केवळ भगवंताच्याच कृपेवर आहे :- “जरि हा हो कृपा करील नारायण I तरि हेंचि ज्ञान ब्रह्म होयII मुमुक्षु आपल्या सामर्थ्यावर ज्ञान मिळविन म्हणून म्हणेल तर ते मुळीच संभवनीय नाही, हाही सिद्धांत लक्षात ठेवावा. भगवंताची कृपा होण्यास, व त्या योगाने हा अलक्ष्य लाभ होण्यास एकच उपाय आहे.
“वर्णाश्रय विहित कर्म, करणे हा प्रथम धर्म, निरहंकृति कंजनयन ध्यात जा रे II सदा श्री हरिचे नाम मुखी गात जा रे II” वर्णाश्रमाला उचित अशी कार्ये करून ती सर्व यज्ञ तयांचा भोक्ता आणि सर्व भूत सुहृदय असा जो महेश्वर त्याला अर्पण केल्याने अंत:करण शुद्धी होईल. कारण भगवान अर्जुनाला म्हणतात :- मला भक्तीने अर्पण केलेल्या पदार्थांची फार आवड आहे, म्हणून हे कौंतेया,
“यत्तपस्यसि कौंतय तत्कुरुण्व मदर्पणम II”
कोणी मला प्रीतिने काही दिले ते मी मोठ्या प्रेमाने व आनंदाने भक्षण करतो. कारण जे काही भक्तीने माझा भक्त मला देतो, ते मला आवडते :-
”पत्र पुष्प फलं तोयं यो मे भक्तया प्रयच्छति I
तदहं भक्त्युप हृदमश्रामि प्रयतात्मन: II”
त्या मी आपल्या आनंदाच्याच परवडी म्हणून समजतो, व त्याचा मोबदला म्हणून त्याची मी अंत:करण शुद्धी करतो, आणि ज्ञान देऊन भक्ति देतो. मुक्ती माझ्या शिवाय दुसऱ्या कोणाच्याच हातात नाही. ज्याने वेद निर्माण केले, आणि ज्याने सृष्टीच्या आदिकाली ब्रह्मदेवाला ज्ञानोपदेश केला त्याच देवाला शरण जा. सर्व आपआपल्या परीने ईश्वरच आहेत. परंतु ज्ञान देण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य नाही. मी सर्व ईश्वराचा आत्मा आहे असे जाणून जो मला शरण येतो, त्यालाच ज्ञान प्राप्त होऊन अक्षय शांती मिळेल. म्हणून –
“एवं ज्ञाना वांचूनि न घडे मुक्ति I
ते तेव्हा की जेव्हा ईश्वर प्रसादा भिव्यक्ति II
तो प्रसाद होय करिता भक्ति I सर्वेश्वराची II
“पूर्ण करिता भगवद्भक्ति II” ज्ञान प्राप्त होईल. मग ते ज्ञान बाणल्यावर चित्तचैतन्य होईल. चित्तचैतन्य झाल्यावर देखील जो भक्ति करितो, त्या भक्तीला पराभक्ती, विमलभक्ति म्हणतात. त्या भक्तीच्या योगे ज्ञानी भक्त कृतकृत्य होतो. म्हणजे अखंड शांती सुख भोगतो. सारांश भगवानच एक मुक्तीदाता. इतर देवता कितीही सामर्थ्यवान असल्या तरी मोक्ष देऊ शकणार नाहीत, म्हणून वामन पंडित मोठ्या कळकळीने सांगतात :- त्या कृष्ण भगवंताच्याच चरणांचा आश्रय करा, म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त होऊन अक्षय शांती मिळेल. “अक्षय शांतीचा सुखदाता I केशव कवी म्हणे आता I तो मज आढळतो गुरु राजा I प्राण विसावा माझा II”
- नारायण -
ओम श्री गुरुदेव दत्त !
( दि. १६ जानेवारी २०२६ )