25/05/2026
" डॉ. नारायणराव सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: " 🚩
✍️ -- श्री. माधवराव सातवसे, मुंबई
✍️ -- श्री. शिरीष पाठक, नाशिक
✍️ -- श्री. संतोष भोसेकर, पंढरपूर
यांच्या लेखांचे संकलन
१) "बाळाराव" टोपण नाव आलेले डॉ. नारायणराव सावरकर हे बाबाराव आणि विनायक दामोदर यांच्यापेक्षा लहान, सर्वात धाकटे, तिसरे बंधू आणि उत्कृष्ट वक्ते ! त्यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे २५ मे १८८८ रोजी झाला. लहानपणीचे शिक्षण भगूर येथे झाले. ते ४ वर्षाचे असताना भगूरच्या आसपास महामारीची साथ सुरू झाली. त्यात नारायणरावांची आई सौ. राधाबाई यांचा साथीच्या आजाराने मृत्यू झाला. पुढे त्यांना नाशिकमध्ये आणण्यात आले. २ ही मोठ्या भावांचा प्रभाव नारायणरावांवर पडला.
२) इयत्ता ६ वीत ते इंग्रजी शाळेत जाऊ लागले. ते आपले निबंध उत्कृष्टपणे सभेपुढे मांडू लागले. यांच्या वक्तृत्वाचं सर्वत्र कौतुक होऊ लागलं. नवरात्रात नाशिक येथे कालीकामातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. सरकारी अधिकाऱ्यांनी त्यावेळी "वंदे मातरम" या राष्ट्रीय घोषावर बंदी आणली होती. त्या बंदीला जनतेचा मोठा विरोध होता. त्याविरोधातून जनतेतून प्रचंड क्षोभ उसळला. त्यामध्ये श्री बाबासाहेब खरे वकील, बाबाराव सावरकर, नारायणराव सावरकर, श्रीधरपंत वर्तक अशा ११ जणांवर खटला भरण्यात आला. त्यात नारायणरावांना व इतर काही जणांना दोषमुक्त सोडून देण्यात आले. हा खटला 'वंदे मातरम' या नावाने ओळखला गेला.
३) आपल्या बंधूंपासून स्फूर्ती घेऊन त्यांनी "मित्र समाज" या नावाची विद्यार्थी संघटना स्थापन केली. विद्यार्थीदशेत असणाऱ्या नारायणरावांनी आपल्या ओजस्वी वक्तृत्वामुळे तरुणांना मोहित केले आणि क्रांतिकार्याकडे आणले.
४) सन १९०८ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी बडोदा येथे गेले. स्नेही दत्तात्रय केतकर यांच्या सहकार्याने अभिनव भारताची स्थापना बडोद्यात केली. प्रो. माणिकरावांच्या व्यायामशाळेत त्यांनी कुस्ती, मल्लखांब, लाठी, फरीदगाचे उत्तम शिक्षण घेतले.
५) सन १९०४ मध्ये स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' सशस्त्र क्रांतीच्या चळवळीने स्वातंत्र्यपूर्व काळात अखिल भारतीय स्वरूप धारण केले. विशेषतः पश्चिम बंगाल (कलकत्ता) मध्ये खूप जोर दिसत होता. डॉ. केशव बळीराम हेगडेवार क्रियाशील कार्यकर्ता म्हणून काम करीत होते.
६) दिनांक २१ डिसेंबर १९०९ मध्ये नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सन याचा हुतात्मा कोन्हेरे या तरुणांनी वध केला. त्यात अभिनव भारताचे सभासदांना पकडण्यात आले होते. कटाच्या खटल्यात ३८ जणांत नारायणराव हे एक आरोपी होते. त्यांना ६ महिन्याची शिक्षा देण्यात आली.
७) सन १९१० मध्ये डॉक्टर हेडगेवार शिक्षणासाठी कलकत्याला गेले. १९११ मध्ये डॉ. नारायणराव सावरकर यांनीसुद्धा त्याच विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
८) दोन्ही बंधू अंदमानात गेल्यावर क्रांतीकार्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर नारायणराव यांनी समर्थपणे पेलली. दोन्हीबंधूंच्या सुटकेसाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. अनंत हरी गद्रे व सेनापती बापट यांच्या सहकार्याने महिन्यात ८०,००० स्वाक्षर्या गोळा करून ब्रिटीश सरकारला त्यांनी निवेदन पाठवले. पण सरकार काही बधले नाही.
९) "अभिनव भारत" च्या क्रांतिकार्यात त्यांनी खंड पडू दिला नाही. तर संघटनेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. सततची झडती, जप्ती, अटक असूनही त्यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करीत.
१०) बऱ्याच अडचणींना न जुमानता डॉक्टरकीचा अभ्यास पूर्ण केला. पुढे एक वर्ष होमिओपॅथीचा अभ्यास केला. त्यानंतर दंतवैद्यकीचाही अभ्यास पूर्ण केला. त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च मादाम कामा यांनी केला. याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक प. पू. डॉक्टर हेडगेवार हे त्यांचे कॉलेजमधील सहकारी मित्र बनले. ते मुंबईत आल्यानंतर दंतवैद्य म्हणून व्यवसाय सुरू केला. गिरगावात त्यांनी दातांचे औषधालय काढले.
११) हिंदूची एखादी संघटना असावी असे विचार १९१० पासून डॉ. हेडगेवार यांच्या मनात घोळत होते. श्री. बाबाराव सावरकर यांची अनेक वेळा भेट झाल्यावर त्या विचारांना अधिक चालना मिळाली. बाबारावांच्या प्रभावी मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने हिंदूंची एक संघटनसंस्था १९२५ मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे सुरू केली. १७ एप्रिल १९२६ मध्ये त्या संस्थेला सर्वानुमते 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' हे नांव देण्यात आले.
१२) गव्हर्नर जनरल लॉर्ड होर्डिंग यांच्या दिल्ली प्रवेशाला अपशकुन करण्यासाठी १९१२ मध्ये त्यांच्यावर बॉम्ब टाकण्यात आला होता. त्या संबंधात नारायणराव सावरकर यांनाही इतर क्रांतिकारकांबरोबर पकडण्यात आले होते. काही दिवस त्यांना बंदी ठेवून शेवटी सोडून देण्यात आले.
१३) खेड्यातील हिंदू घटकापर्यंत संघाची विचारसरणी नेऊन पोचविली पाहिजे, अशी त्यांची विचारधारा होती. अखिल भारतीय दर्शन घडविणाऱ्या नि जागतिक कीर्तीच्या मुंबई शहरात आपल्या संघाची शाखा असली पाहिजे, ही त्यांच्या मनातील ओढ होती. या विचाराने प. पू. डॉक्टर हेडगेवार यांनी आपले वर्गमित्र डॉ. नारायण दामोदर सावरकर नि देशभक्त बाबाराव सावरकर यांच्याशी पत्रव्यवहार केला. एप्रिल १९३१ मध्ये प. पू. डॉक्टर मुंबईला आले. डॉ. सावरकरांनी गिरगावातील सोमण बिल्डिंगमध्ये आपल्या औषधालयात डॉ. हेडगेवार यांची बैठकीची जागा निश्चित केली. शहरातील काही प्रमुख व परिचित व्यक्तींना भेटणे सोयीचे व्हावे, म्हणून ही योजना होती.
१४) ज्या व्यक्ती संघकार्याला सहाय्य करतील, प्रत्यक्ष हातभार लावतील असे वाटत होते अशा निवडक व्यक्तींना एकत्र अथवा त्यांच्या सोयीच्या वेळेप्रमाणे आणण्याची जबाबदारी श्री. बाबाराव सावरकर अन् डॉ. नारायणराव सावरकर यांनी घेतली. त्या दृष्टीने अनेक बैठका डॉ. सावरकर यांचे औषधालयात झाल्या. प्रामुख्याने दादाराव नाईक, डॉक्टर मोतीराम बाळकृष्ण वेलकर, खानविलकर (खानसो) मोतीवाले, अनंत हरी गद्रे, का. ना. धारप, शिवरामपंत देवधर, आर. एन शिंदे, लक्ष्मणशास्त्री ओगले, परशुरामपंत महाजन (माधवाश्रमाचे मालक), शिवरामपंत धोंड, राजाराम देसाई, गोविंदराव वर्तक ह्या व्यक्ती उपस्थित होत्या. बाबारावांनी संघाची उपयुक्तता पटवून दिली. पू. डॉ. हेडगेवारानी संघाचा व्यापक दृष्टिकोन समजावून सांगितला. शंकानिरसन, चर्चा होऊन मुंबईत १९३२ मध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१५) सन १९३२ मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवडयातच सावरकरबंधूंना पुन्हा अटक झाली. दिनांक १४ जानेवारी १९३२ पासून मुंबईत हिंदु-मुसलमानांचा जोरदार दंगा सुरू झाला. काही काळ मुंबई शहर लष्कराच्या ताब्यात देण्यात आले होते. हा दंगा दीर्घकाळ म्हणजे ६ महिने चालला होता. ६ महिन्यांत रस्त्यावरील कचरासुद्धा झाडला नव्हता. अशा प्रकारे १९३२ चे वर्ष फुकट गेले.
१६) सन १९३३ ला पू. डॉ. हेडगेवार पुन्हा मुंबईत आले. सर्वांना भगव्या ध्वजासमोर उभे करुन प. पू डॉ. हेडगेवार यांनी संघाची प्रतिज्ञा दिली. अशा प्रकारे १९३३ मध्ये मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू झाली. डॉ. नारायणराव दामोदर सावरकर, दादाराव नाईक, सयाजीराव सिलम, माधव यशवंत सातवसे, कृष्णा वैद्य हे प्रारंभीचे स्वयंसेवक होते. बाबू तेलंग, विनू वालावलकर, राजा धारप, भालचंद्र पाटकर, सदानंद नाडकर्णी, दत्ता नाडकर्णी, राजा राजाध्यक्ष, जया वाघ, जया वरळीकर, गोविंदराव जोगळेकर, रामू गोखले, लघाटे, लिमये हे त्यानंतर आले. पू. डॉ. हेडगेवार एक महिना मुंबईत राहिले. मुंबई शाखेची आणि संघ कार्याची सर्व जबाबदारी डॉ. नारायणराव सावरकर यांचेवर सोपवून ते नागपुरला परत गेले.
१७) हिंदुमहासभेचे दंग्यातील मदतकार्य, धर्मांतरितांचे शुद्धिकरण, इतर सामाजिक कामे तसेच संघाचे काम या सर्वांचा डॉ. सावरकर यांचेवर बराच ताण पडेल, याची डॉ. हेडगेवार यांना कल्पना होती. नागपुरला पोचल्यावर पु. डॉक्टरांनी श्री. गोपाळराव सदाशिव येरकुंटवार यांना ५ वर्षासाठी प्रचारक म्हणून मुंबईत पाठविले.
१८) डॉ. सावरकर आणि इतर स्वयंसेवकांच्या प्रयत्नांनी शाखेवर उपस्थिती चांगलीच वाढली होती. पण मोकळ्या वातावरणात शाखा भरविण्यासाठी सोईस्कर असे मोकळे प्रशस्त पटांगण मात्र मिळत नव्हते. डॉ. सावरकर यांनी शिकस्तीचे प्रयत्न करून राजा नारायणलाल बन्सिलाल पिटा या बड्या धनाढ्य व्यापाऱ्याच्या सध्यस्थिने गिरगावातील मारवाडी विद्यालयाचे भव्य पटांगण मिळविले. डॉ. सावरकरांच्या औषधालयात भरणारी संघाची शाखा सहा महिन्यानंतर मारवाडी विद्यालयाच्या पटांगणावर मारवाडी विद्यालय 'मुख्य शाखा' या नावाने भरू लागली.
१९) डॉ. सावरकर मुंबईतील संघशाखांचे प्रमुख अधिकारी या नात्याने काम पहात होते. संघाच्या प्रचारकाचे सर्व प्रश्न त्यांनीच सोडवावयाचे होते. आणि ती जबाबदारी त्यांनी अत्यंत आनंदाने आत्मविश्वासपूर्वक स्वीकारली होती. संघाकडे द्रव्य नसल्यामुळे प्रारंभी निर्माण होणारे बिकट प्रश्न प्रयत्नपूर्वक स्वतःच सोडविणे क्रमप्राप्त होते. प्रत्यक्ष संघशाखेत येणं शक्य नसेल तर त्यांच्याकडून परस्पर सहाय्याची अपेक्षा होती.
२०) संघटनेचे कार्य अविरत करता यावे आणि हिंदू संघटनेचे महान कार्यं यशस्वी व्हावे अशी मनापासून इच्छा असलेल्या जाणीवपूर्वक सहानुभूती असणाऱ्या व्यक्तीकडूनच आवश्यक तितक्याच आर्थिक सहाय्याची अपेक्षा केलेली होती.
२१) थोड्याच दिवसात आणखी तिसरी संघशाखा कामाठीपुरातील मरिअम्मा मंदिराचे आवारात सुरू करण्यात आली. माननीय डॉ. सावरकरांचे अगदी निकटचे लढवय्ये हिंदुत्वनिष्ठ स्नेही आणि कॉंग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते श्रीयुत सयाजीराव सिलम आणि डॉ. भुसरथ यांच्या प्रयत्नांनी प्रभावी शाखा सुरू केली. जातीय दंगलीची सरहद्द संरक्षण करण्याच्या दृष्टीने ही योजना होती. अशा प्रकारे डॉ. नारायणराव सावरकर संघकार्याची स्वीकारलेली जबाबदारी अगदी योजनापूर्वक व्यवस्थितपणे पार पाडीत होते. त्यांचा कामाचा उरक खरोखरच अगदी वाखाणण्यासारखा होता.
२२) इच्छा असूनही संघकार्याला अधिक वेळ देता येत नाही, ही त्यांच्या मनातील खंत होती. म्हणून त्यांचे निकटवर्ती स्नेही दादाराव नाईक यांच्याशी विचार विनिमय करून विचारपूर्वक निर्णय घेतला आणि मुंबईच्या संघकार्याची सर्व जबाबदारी श्री. दादाराव नाईक यांच्यावर सोपविली. एकूण परिस्थिती लक्षात घेऊन दादांनी संघकार्याची धुरा आनंदाने स्वीकारली. त्यानंतरही माननीय डॉ. नारायणराव सावरकर संघाच्या सांघिकला पूर्ण गणवेशात उपस्थित रहात होते. हा त्यांच्या संघकार्याचा इतिहास.
२३) हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. स्वामी श्रद्धानंद महिलाश्रमाची स्थापना केली. निर्भीड आणि प्रखर हिंदुत्ववादी वृत्तपत्र "श्रद्धानंद" त्यांनी सुरू केले. साडेतीन वर्षे त्यांनी ते एक टाकी लिहिले. त्यांच्या जहाल लिखाणामुळे अखेर सरकारने "श्रद्धानंद" या वृत्तपत्रांवर बंदी आणली.
२४) पंजाब व बंगालच्या क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेबरोबर त्यांचा संपर्क होता. त्यांचा दवाखाना म्हणजे क्रांतिकारकांचे आश्रयस्थान होते.
२५) गांधी-वधानंतर सावरकरांचं घरावर अहिंसावादी गुंडांनी हल्ला केला, त्यात ते जखमी झाले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळली. केसरीत त्यांचे काही लेख प्रसिद्ध झाले होते. औषधालयाच्या दुपारच्या वेळी त्यांचे लेखन कार्य चाले. अखेर १९ ऑक्टोबर १९४९ मध्ये त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली.
🚩 🕉️ 🚩
#हिंदुत्व
#वंदे_मातरम्
#अखंडभारत