स्वारगेट पासून २४ किलोमीटर अंतरावर खानापूर (ता. हवेली ) हे गाव आहे. दक्षिण दिशेला हिरवाईने नटलेल्या सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ आणि उत्तर दिशेला वाहणाऱ्या मुठा नदीच्या तीरावर वसलेल्या खानापूर गावी श्री नाथ म्हस्कोबाचे मंदिर आहे. पूर्वाभिमुख मंदिराची सादर मंडप गाभारा अशी रचना असून गाभाऱ्यात श्री नाथ - जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्ती आहेत.
श्री नाथ हे काशी अथवा सोनारी चे काळ भैरव असून हा देव स्मशान भूमीत प्रगट झाल्याने यास म्हस्कोबा असेही म्हणतात." सवाई सर्जाचं चांगभलं " च्या गजरात ढोल-ताशांच्या निनादात गुलाल-खोबर्यांची उधळण करत पारंपरिक वातावरणात श्री क्षेत्र खानापूर येथे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा दरवर्षी साजरा होतो.श्री नाथ म्हस्कोबा देवस्थानचा वार्षिक यात्रा महोत्सव देवाच्या हळदी समारंभाने सुरु होऊन माघ शुद्ध पौर्णिमा ते वद्य नवमी अशी दहा दिवस येथे यात्रा भरते.
परंपरेनुसार खानापूर गावाची बापूजी बुवाची मानाची सासनकाठी यात्रेसाठी येते. ढोल-ताशांच्या गजरात पालखीसह ग्रामप्रदक्षिणा होते.त्याप्रसंगी वर्हाडी मंडळीच्या भेटाभेटीचा कार्यक़्रम होतो.सोहळ्याचे मानकरी जावळकर, वाघ, पवार, झरांडे व भोई समाज यांच्यासह विश्वस्त आदींच्या उपस्थितीत धार्मिक विधी होतात.उत्सव मूर्तीस अलंकार व पारंपरिक वस्त्रांनी सजविले जाते.अक्षतावाटप झाल्यानंतर सायंकाळी ६:३० वाजता मंगलाष्टकांना सुरुवात होते.
श्री नाथ म्हस्कोबा - देवी जोगेश्वरीच्या लग्नाला हजारो भाविक हजेरी लावतात.गुलालात न्हालेल्या भाविकांच्या वऱ्हाडाकडून पडणाऱ्या अक्षता अन् मावळत्या सूर्याच्या साक्षीने देवांचा पारंपरिक लग्न सोहळा पार पडतो. विवाह सोहळ्यानंतर जमलेल्या भाविकभक्तांसाठी मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
यात्रेला विवाह सोहळ्याने सुरुवात होते.दहा दिवस चालणार्या या यात्रेत रोज रात्री देवळात छबिना भरतो.वद्य पंचमी पासून भाकणूक (भविष्य वाणी) सुरु होते. वार्षिक पीक पाण्यासंबंधीची भविष्यवाणी सांगण्यात येते.वद्य नवमी हा यात्रेचा मुख्य दिवस (मारामारी) असतो.त्यादिवशी सायंकाळी ५ वाजता ढोल-ताशाच्या निनादात पालखी प्रदक्षिणा होऊन छबिना भरतो व भाकणूक सांगितली जाते. तसेच भाविकांच्या उपस्थितीत रात्री छबिना व मानाच्या रंगाचे शिंपण केले जाते. माघ वद्य दशमीच्या दिवशी वरात काढण्यात येते व रात्री बापूजी बुवाची मानाची सासनकाठी पुन्हा मंदिरात जाते.
अशाप्रकारे १० दिवस चालणारा हा यात्रा महोत्सव परंपरागत पध्दतीने साजरा होतो.
तसेच कार्तिक वद्य अष्टमीच्या (कालाष्टमी) दिवशी कालभैरव जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातो. सकाळी देवास अभिषेक, दुपारी होमहवन व सायंकाळी ढोल-ताशाच्या निनादात पालखीसह ग्रामप्रदक्षिणा केली जाते.पालखी सोहळ्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडतो व नंतर किर्तनाचा कार्यक्रम होतो.
सवाई सर्जाच चांगभलं!!!