03/05/2026
परमपूज्य सद्गुरू श्री दादा महाराज झुरळे लिखित अमृतधारा क्रमांक ६७.
पूर्णपरब्रह्म, परमात्मा, परमपावन, परमदयाधन, परमकारुणिक, अनंतकोटी ब्रह्मांडांचे नायक, राजांचे अधिराजे, भक्तांच्या कामना पूर्ण करणारे कल्पवृक्ष, योगसम्राट, पतितपावन, भगवान दत्तात्रेय आपल्या परमप्रिय शिष्याला सांगतात. तसेच वेदमूर्ती नारायणस्वरूप वेदधर्मामुनी आपल्या प्रेमसागर दिपक शिष्याला कथन करतात. तसेच जिज्ञासू पित्याला त्याचा ज्ञानी पुत्र श्रवण करवितो.
परमार्थमार्गात नियमितपणाला अत्यंत महत्व आहे. तसेच एखादे कार्य पूर्णत्वास नेण्याची त्याच्या ठिकाणी धमक पाहिजे म्हणजे जिद्द पाहिजे. जे कार्य अंगिकृत केले असेल, त्या कार्याबद्दल प्रेम पाहिजे. ते कार्य मीच पूर्ण करणार आहे असा वृथा अभिमान नसला पाहिजे आणि मी ते कार्य पुरे केले अशी फुशारकी मारु नये. कोणी ' ते कार्य आपण केले ' अशी आपली स्तुती केली तरी त्याबद्दल हुरळून जाऊ नये किंवा त्या कार्यामध्ये दोष दाखविले वा दोषाचा आरोप केला तरी त्याबद्दल विषाद मानू नये. आपल्या मनाला ते कार्य करण्यापासून परावृत्त करु नये. यासाठी कार्याला आरंभ करतेवेळी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे.आपल्या गुरूदेवांना मनोमन वंदन करावे व मी हे कार्य पूर्ण करण्याची इच्छा बाळगतो, पण त्यात आपली कृपा पाहिजे. अशी विनंती करावी.
अशी शिस्त पूर्णपरब्रह्मांनी देवांनासुद्धा घातली आहे. भगवान सूर्यनारायणालासुद्धा केव्हा उदयाचलावर यायचे हे ईश्वराने ठरविलेले आहे. चंद्राने पूर्णत्वाने केव्हा प्रकाश पाडायचा हे सुद्धा ईश्वराच्या इच्छेवर अवलंबून आहे. त्यामध्ये एकही दिवस कमीजास्तपणा होत नाही. जे मंगल दिवस असतात ते सवडीप्रमाणे पुढे ढकलता येत नाहीत. म्हणजे एकादशीच्या दिवशीच एकादशी येणार. अंगारकी संकष्टी रविवारी किंवा सोमवारी येत नाही. शनिप्रदोष बुधवारी येत नाही. सूर्यनारायण रजेचा अर्ज टाकत नाहीत आणि टाकला तरी त्यांची रजा मंजूर होत नाही. पर्जन्याने केव्हा वर्षाव करावा हे ईश्वराने ठरविलेले असते. अकाली पर्जन्यवृष्टी होते, ती ईश्वराच्या इच्छेनेच होते. ज्यावेळी पृथ्वीवर वास करणाऱ्या मानवाच्या हातून अनेक दोष घडतात, त्यावेळी ईश्वर त्यांचे जीवन विस्कळीत करतो व त्यांना त्यापासून दुःखाची प्राप्ती होते. कोणत्याही पर्वताला वाटले आपण आपली जागा सोडून दुसरीकडे जाऊ. तरी तसे घडत नाही. म्हणून म्हटलेले आहे,
पर्वताने अचल रहावे ही माझी सत्ता
ज्यावेळेला मोठा प्रभंजन सुटतो, त्यावेळी क्षणामध्ये होत्याचे नव्हते होते. वादळ आले कुठून आणि गेले कुठे हे कोणीही सांगू शकत नाही.
यासाठी प्रत्येकाने ईश्वराने घालून दिलेले नियम काटेकोरपणाने पाळले पाहिजेत. काकडआरती सकाळी ११ वाजता करता येत नाही किंवा शेजारती संध्याकाळी ५ वाजता करावी असे होत नाही. लोकांना करमणुकीच्या कार्यक्रमास रात्रौ ९ वाजता जावयाचे असते, म्हणून लोक रात्रौ ८.३० वाजता शेजारती करतात. सायंकाळी सूर्यास्ताची वेळ कोणत्याही कारणास्तव पुढे नेता येत नाही किंवा सूर्यनारायणाला त्याचा अवलंब अगोदर करता येत नाही. म्हणून ईश्वराने घालून दिलेले जे नियम आहेत त्यांचे पालन प्रत्येकाने
केलेच पाहिजे.
प्रत्येकाची काम करण्याची कार्यक्षमता ईश्वराने घालून दिलेली असते, म्हणून निवृत्तीचे वय ५८ किंवा ६० हे लोकांनी ठरविलेले आहे, ईश्वराने ठरविलेले नाही. पण ईश्वराची उपासना किंवा भक्ती यावर कालाचे बंधन असत नाही. मग ज्या काही अकाली गोष्टी मानवाच्या आयुष्यात दिसून येतात ती मानवाची दुर्बलता होय. प्रमाणापेक्षा जास्त आहार घेतला की मनुष्यास अजीर्ण होते. भर उन्हामध्ये मस्तकावर आवरण न घेता गेले की त्यास मस्तकशूल प्राप्त होतो. पर्जन्यामध्ये छत्रीशिवाय गेले व आपले अंग भिजले तरच सर्दीपडशाला तोंड द्यावे लागते. प्रमाणापेक्षा जास्त श्रम केले की त्यास ज्वर प्राप्त होतो. म्हणजे ईश्वराने जे नियम घालून दिलेले आहेत त्याचा भंग केला की निसर्ग त्याला तडाखा दिल्याशिवाय सोडत नाही. रस्त्यावरुन बेसावधपणाने चालून किंवा आपले मन दुसरीकडे व्यग्र केले तर अपघातास तोंड द्यावे लागते. म्हणून मार्गामध्ये मोबाईल कानाला लावायचा नसतो. एखादा गाडीचालक गाडी चालवित असता त्याने शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे वळून बघावयाचेसुद्धा असत नाही. एवढेच नाही तर त्याने एकही अक्षर शेजाऱ्याशी बोलावयाचे असत नाही. याला अपवाद ईश्वराचे गुणगान किंवा संतांच्या लीला सांगणे किंवा ऐकणे. त्याचे लक्ष आपली गाडी ज्या रस्त्यावरुन चालली आहे तिकडे असले पाहिजे. पण आपण ज्या वेळेस शिस्त पाळतो त्याच वेळी इतरांस शिस्तीचा उपदेश करता येतो.
हाच नियम भगवान श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांनी त्रिविक्रमभारर्तीना; ज्यावेळी त्यांनी आपली श्रीमहाराजांजवळ राहण्याची इच्छा प्रगट केली, त्यावेळी तुम्ही कुमसीला राहून धर्मप्रचार केला पाहिजे असे सांगितले व त्याप्रमाणे ते कुमसीस राहून धर्मप्रचार करीत असता ;
त्यांचेकडे दोन विद्वान ब्राह्मण आले व आपण वेदज्ञ आहोत व आपल्याशी वेदचर्चा करावयाची आहे, असे त्रिविक्रमभारतीना म्हणाले. तेव्हा परोपरीने त्यांनी त्या ब्राह्मणांना ते काम फार कठिण आहे व त्याचे ज्ञान ईश्वराशिवाय कोणासही संपूर्णपणे असत नाही आणि मी तर वेद जाणण्यास असमर्थ आहे असे सांगितले. हे त्रिविक्रमभारतींचे उत्तर ऐकताच त्या ब्राह्मणांनी " आम्हाला जयपत्र द्या " असे सांगितले. त्रिविक्रमभारतींनी सांगितले, " आमच्यासारख्या संन्याशाकडून जयपत्र घेण्यात तुमचा काय लाभ आहे? तेव्हा आपण त्याबद्दलचा आग्रह सोडावा आणि तसे नसेल तर आमच्याबरोबर गाणगापुरास चलावे. तेथे आमचे गुरूदेव वास्तव्य करतात. त्यांच्या आज्ञेने आम्ही आपली इच्छापूर्ती करु." असे म्हणून, त्या दोन ब्राह्मणांचा अभिमान नाहीसा करण्यासाठी त्रिविक्रमभारती त्या ब्राह्मणांना घेऊन गाणगापुरास आले. श्रीमहाराजांनीसुद्धा " वेद ईश्वरीय कृपा प्राप्त झाल्याशिवाय कोणासही जाणता येत नाहीत, अशी ईश्वराची कृपा अनन्य शरणागतीने ईश्वराच्या सान्निध्यात गेल्याशिवाय होत नाही व तुम्ही जसे आलात तसेच परत जा " असे सांगितले. आमच्यापासून वादाची किंवा जयपत्र मिळविण्याची अपेक्षा ठेवू नका. पण हे श्रीमहाराजांचे सांगणे अभिमानाने तुडूंब भरलेल्या त्या ब्राह्मणांना कसे पटणार! ही महाराजांची प्रत्येक गोष्ट त्यांना विपरीत वाटू लागली. कारण सर्पदंश झालेल्या मनुष्याला गोड वस्तू तिखट लागते व तिखट वस्तू गोड लागते. तसेच गर्वाने फुगलेल्या मनुष्याला कितीही कल्याणाचा मार्ग सांगितला तरी त्याप्रमाणे वागण्यास तो इच्छित नाही.
याचा परिणाम म्हणजे श्रीमहाराजांचा त्यांच्यावर रोष झाला व त्यांनी मार्गावरुन जात असलेल्या एका मातंग मनुष्यास बोलावून आणले. त्याच्या सर्वांगावर भस्माचे सिंचन करुन त्याला ज्ञानी केले व त्या गर्विष्ठ ब्राह्मणांशी ज्ञानचर्चा करण्याचा त्यास आदेश दिला. त्यावेळी त्या मातंगाच्या मुखावर दैवी तेज झळकू लागले. ते पाहून वादासाठी आलेले ब्राह्मण प्रभावित झाले व श्रीमहाराजांना शरण आले. तरी श्रीमहाराजांनी तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल अशा आपल्या शापवाणीचा उच्चार आपल्या मुखाने केला व त्यांना परत पाठविले. यावर ते ब्राह्मण आपल्या गृहीसुद्धा जाऊ शकले नाहीत. मार्गामध्ये असलेल्या एका नदीच्या काठी ते हृदयशूळाने मृत्युमुखी पडले.
इकडे चांडाळाची स्त्री आपल्या मुलांना घेऊन श्रीमहाराजांकडे आली व आपला पती घरी येत नाही असे तिने सांगितले व आम्हाला स्पर्शसुद्धा तुम्ही करु नका असे बोलू लागल्यामुळे आता आम्ही कोठे जावे? त्यावेळी महाराजांना लक्षात आले की हा भस्माचा प्रभाव आहे. म्हणून त्यांनी रस्त्याने जाणाऱ्या एका लुब्धकाला पाचारण केले व त्याच्याजवळील पाण्याने त्या मातंगाला स्नान घालावयास सांगितले. तसे करताच मातंगाच्या अंगावर असलेली दिव्य विभूती धुऊन गेली व तो मातंग अज्ञानी झाला आणि लगेच आपल्या मुलाबाळांमध्ये मिसळून आपल्या घरी निघून गेला.
हा प्रकार त्रिविक्रम भारतींनी बघून त्यांना विभूतीचे महत्व समजले व त्यांनी श्रीमहाराजांना भस्ममहात्म्य सांगण्याची प्रार्थना केली.
म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या इच्छेची पूर्तता गुरूकृपेनेच व्यक्त होते. पण गुरूकृपा अनन्यभावाने त्यांना शरण जाऊन त्यांनी दिलेली उपासना केली की प्राप्त होते.
यासाठी भगवान श्रीस्वामीसमर्थांना प्रसन्नचित्त पाहून शिप्यांनी प्रार्थना केली. अहिल्येचा उद्धार करून विश्वामित्रऋषी रामलक्ष्मणांना घेऊन जनकपुरीकडे रवाना झाले. मार्गामध्ये त्यांनी रामप्रभूना सांगितले की, सीता ही जनकराजाची कन्या कशी? तर त्याची एक दिव्य कथा आहे ती आम्ही तुम्हाला सांगतो.
एकदा एका सधन गृहस्थाने आपली जमीन एका गरीब शेतकऱ्याला दान केली होती. तो शेतकरी ती जमीन नांगरण्यासाठी नांगर घेऊन शेतात गेला असता नांगरताना त्याचा नांगर कोणत्यातरी वस्तूला स्पर्श करुन थांबला. तेव्हा त्याने ती जागा उकरली, तर त्यास एक लाकडी पेटी आढळली. ती पाहून त्याला फार आश्वर्य वाटले. त्याने ती पेटी उघडूनसुद्धा न पाहता तो शेताच्या मालकाकडे ती पेटी घेऊन गेला व त्या मालकाच्या स्वाधीन करुन म्हणाला, आपण मला शेताचे दान केले, पण पेटीचे केलेले नाही. त्या शेतकऱ्याने पेटीमध्ये काय आहे हे उघडूनसुद्धा पाहिले नाही. त्यावेळी तो दानी म्हणाला, ज्यावेळी आम्ही तुम्हाला शेत दान दिले, त्यावेळी शेताची मालकी तुमच्याकडे आली व त्या शेतामध्ये असलेल्या पण असून प्रगट होणाऱ्या प्रत्येक वस्तुवर तुमची मालकी आहे. तरी मी तिचा स्वीकार करणार नाही. ती तुमचीच आहे. हा वाद जनक राजांकडे गेल्यानंतर दोघांनीही त्या पेटीचा स्विकार करण्याला आपली संमती दिली नाही.
श्रीस्वामीमहाराज शिष्यांना सांगतात, इतकी निस्पृहता सध्याचे काळी आपल्यास कोठे आढळेल का? अशीच निस्पृह माणसे ईश्वराला आवडतात. मग त्याने साधना किती केली, कशी केली हा प्रश्न गौण असतो.
तेव्हा जनकराजे म्हणाले, ती पेटी उघडा. त्यात काय आहे हे आपण पाहूया तरी! त्यावेळी जनकराजाने आपले गुरू शतानंद यांना बोलावले व त्यांच्या समक्ष ती पेटी उघटली. त्याबरोबर त्या पेटीमध्ये एक सुंदर कन्या त्यांना दृष्यमान झाली. तिला मोठ्या प्रेमाने जनकाने हातात धरुन पेटीबाहेर काढले. त्यावेळी सभेमध्ये 'कडकड' असा मोठा आवाज झाला व दिव्य आकाशवाणी झाली. "ही कन्या प्रत्यक्ष लक्ष्मीच आहे. तेव्हा ती आपल्या सान्निध्यात राहील. ती आपली कन्याच आहे असे जाणा व ती विवाहास योग्य झाल्यानंतर तिचे स्वयंवर आयोजित करा. तिचा स्वीकार श्रीविष्णूच करतील'. यावरुन जनकराजाने आपल्या मुलीप्रमाणे तिचा प्रतिपाळ केला. शेतामध्ये सापडली म्हणून तिला 'सीता' हे नामाभिधान प्राप्त झाले. जनकराजाने त्या मुलीचा कन्येप्रमाण स्वीकार केला म्हणून तिला 'जानकी' हे नाव प्राप्त झाले.
अशी विश्वामित्रऋर्षीनी रामप्रभूना सीतेसंबंधीची हकीकत कथन केली. त्यामुळे त्यांच्या समोरुन त्यांचे स्वागत करण्यासाठी जनक राजांचे पुरोहित शतानंद केव्हा त्याठिकाणी आले हे त्यांना कळलेसुद्धा नाही. इतक्या एकाग्रतेने रामप्रभू विश्वामित्रांचे बोल ऐकत होते यावरुन श्रीस्वामीमहाराज आपल्या शिष्यांना सांगतात, इतकी एकाग्रता गुरुंच्या सांगण्याकडे शिष्याची असली पाहिजे.
अशीच एकाग्रता एका केशकर्तन करणाऱ्याची आपल्या व्यवसायामध्ये होती. तो आपल्या कामामध्ये इतका वाकबगार होता की, त्याच्या समोर बसलेल्या माणसाला लहान मुलाच्या टाळूवर आई तेल घालून जसे हात हलविते, तसे वाटत असे. इतका त्याचा हात हलका होता. त्याच्या या कौशल्यामुळे राजासद्धा त्याला नित्य पाचारण करीत असे. एक दिवस राजाला नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर दरबारात जावयाचे होते. म्हणून राजाने या केशकर्तनकाराला आपल्या सेवकाकरवी बोलावणे पाठविले व त्यावेळी हे केशकर्तनकार आपल्या साधनेमध्ये निमग्न होते. त्यांनी राजांना निरोप पाठविला, " आमची ईश्वरी उपासना चालू आहे. यावेळी आम्ही फक्त ईश्वराचे असतो. आम्ही इतर कुणाचेही असत नाही. आमचे येथील कार्य झाल्याबरोबर आम्ही आपणाकडे येऊ." हे त्या केशकर्तनकाराचे उत्तर ऐकल्याबरोबर राजाच्या सेवकाला फार आश्चर्य वाटले. तो म्हणाला, " हे उत्तर ऐकल्यावर आपणास कुठल्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे याचा विचार केला का?" त्यावेळी तो केशकर्तनकार म्हणाला, " माझी उपासना चालू असता ती निर्विघ्नपणे पार पाडावी याची काळजी परमात्मा घेतो. " असे सांगून त्याने त्या सेवकाची बोळवण केली आणि तो आपल्या उपासनेत गर्क झाला. परमात्मा आपल्या सेवकाच्या सतत संन्निध असतात. ते सेवक राजवाड्यात जाण्यापूर्वी प्रत्यक्ष परमेश्वराने हे घृणीत कार्य आपल्या खांद्यावर घेतले व सबंध ब्रह्मांडाचा रक्षण करणारा परमात्मा केशकर्तनकाराची धोपटी खांद्यावर घेऊन राजवाड्यात जाऊन राजाचे केशकर्तन करण्याचे कार्य करुन बाहेर पडला. त्यावेळी मार्गामध्ये त्या सेवकांनी त्या केशकर्तनकारास पाहताच त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना व ते म्हणाले, " आपण त्याच्या घरातून बाहेर पडल्यानंतर हा राजवाड्यात गेला केव्हा व राजाचे केस कर्तन करुन परत निघालासुद्धा!" त्या आश्चर्याने ते सेवक राजगृहाकडे निघाले. ते प्रख्यात ईश्वराचे भक्त सेनान्हावी होते. त्यांनी राजाचे केस कसे कर्तन केले व राजाला कोणती दिव्य अनुभूती आली, हा सुंदर भाग भगवती जगदंबेच्या कृपेने आम्ही पुढील धारेमध्ये विशद करु.
|| श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ||
|| श्री गुरुदेव दत्त ||
संतशिरोमणी दत्तावतारी परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराज झुरळे मठ मलकापूर कराड.