24/02/2026
प्रति,
मा. श्री. अभिनव गोयल साहेब, आयुक्त (भा.प्र.से.)
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
कल्याण, जि. ठाणे.
विषय: दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या शासकीय बैठकीच्या अनुषंगाने बुद्धभूमी फाउंडेशन बाबत केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. रामदास आठवले साहेब यांनी निर्देशित केलेल्या कार्यांची यथाशीघ्र अंमलबजावणी करण्याबाबत.
महोदय,
माननीय नामदार श्री. रामदास आठवले, राज्यमंत्री, सामाजिक न्याय व अधिकारिता, भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी बुद्धभूमी फाउंडेशन (अशोक नगर, वालधुनी, कल्याण, जिल्हा ठाणे) बाबत शासकीय बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस माननीय आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या वतीने शहर अभियंता मा. श्रीमती अनिता परदेशी, एम.एम.आर.डी.ए. यांच्या वतीने अभियंता श्री. अरविंद धाबे, थोरवे अँड थोरवे इन्फ्रा कंपनी (पुणे) यांच्या वतीने प्रोजेक्ट मॅनेजर श्री. हारून सय्यद रशीद तसेच बुद्धभूमी फाउंडेशनचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
सदर बैठकीत सर्व शासकीय व खाजगी अधिकारी तसेच शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी माननीय केंद्रीय मंत्री महोदयांसमोर आपापली बाजू मांडली.
सखोल चर्चा व सत्य परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर माननीय मंत्री महोदयांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी व एम.एम.आर.डी.ए. अधिकारी यांना खालील निर्देश दिले आहेत –
१) बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीवरून वळवून नेण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या आराखड्यात नाममात्र बदल करून सदर पूल सरळ घेऊन बुद्धभूमी महाविहाराच्या पश्चिमेकडून नेण्यात यावा.
२) १८ मीटर रुंद नियोजित अंतर्गत रस्त्याबाबत बुद्धभूमी फाउंडेशन यांनी सुचविल्याप्रमाणे सुधारित आराखडा तयार करण्यात यावा.
३) २८ मीटर रुंद रस्त्याबाबत एम.एम.आर.डी.ए. अधिकारी तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी यांची संयुक्त पाहणी दौरा त्वरित आयोजित करण्यात यावा.
४) २४ मीटर व १८ मीटर रुंद रस्त्यासाठी बाधित जमिनीचा पंचनामा करून होणाऱ्या नुकसानीचा अहवाल तयार करण्यात यावा.
५) बाधित जमीन व मालमत्तेची संयुक्त मोजणी करून नुकसानभरपाई व मोबदला निश्चित करण्यात यावा.
६) वालधुनी ब्रिजजवळ उड्डाणपूलाखाली भव्य व आकर्षक “बुद्धभूमी धम्मगेट” बांधून देण्यात यावे तसेच सदर उड्डाणपूलास “भगवान गौतम बुद्ध उड्डाणपूल” असे नाव देण्यात यावे.
७) प्रस्तावित उड्डाणपूलाखालून जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे लाईनमुळे डेड एंड असल्याने पुलाखालील रस्ता फक्त बुद्धभूमीकरिता वापरण्यात यावा.
८) बौद्ध अनुयायांच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक सन्मानाचा विचार करून बुद्धभूमी फाउंडेशनच्या ३६ एकर जमिनीवर “भव्य बुद्ध विहार” व आंतरराष्ट्रीय दर्जाचे “बौद्ध पर्यटन केंद्र” उभारण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात यावा.
माननीय मंत्री महोदयांच्या वरील निर्देशांची आपण यथाशीघ्र अंमलबजावणी करून तमाम आंबेडकरी बौद्ध समाजाचे जिव्हाळ्याचे श्रद्धास्थान असलेल्या बुद्धभूमी फाउंडेशनला न्याय द्यावा, ही कळकळीची विनंती.
या पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येते की, खोट्या कागदपत्रांच्या आधारे तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम आणि डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशनचे उल्लंघन करून मंजूर करण्यात आलेल्या टी.डी.आर. रद्द करण्याबाबतची चौकशी सध्या प्रलंबित आहे. सदर चौकशी लवकरात लवकर, सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी, अशी मागणी बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे.
आपला विश्वासू,
...................................
योग्य कार्यवाहीसाठी प्रत-
१) मा. डॉ. हर्षदीप कांबळे साहेब, प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन.
२) मा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, खासदार, कल्याण लोकसभा मतदार संघ.
३) मा. आयुक्त, एम.एम.आर.डी.ए., मुंबई.
४) मा. जिल्हाधिकारी साहेब, ठाणे जिल्हा.
५) मा. श्रीमती अनिता परदेशी मॅडम, सिटी इंजिनियर, क.डो.म.पा.