10/09/2020
आज फार दिवसांनी एका थोर दत्त भक्तांची भेट झाली . सहज विषय सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर निघाला तेव्हा ते म्हणाले अहो आचार्य ,ज्याला जे काही करायचे ते करू द्या, ते प्रत्येकाचे प्रारब्ध आहे मात्र प्रत्येक घटनेवरून दत्त माहात्म्य किंवा गुरुचरित्रात आलेल्या लीलेचे स्मरण झाले पाहिजे . हे कसे शक्य आहे या प्रश्नार्थक मुद्रेने पाहत असता ते म्हणाले ,
काही एक नावाचा वारंवार होणारा उल्लेख पाहता त्याचा अर्थ आहे कंकण ,यावर दत्त माहात्म्यात एकांतात ध्यान घडते हे समजावताना हि गोष्ट आली आहे .
एका घरी एक कन्या विवाहायोग्य झाली होती . तिला वरावें या करिता काही विद्वान ब्राह्मण आले होते पण त्यापूर्वी तिच्या घरातील सर्व मंडळी काही कामानिमित्त परगावी गेली होती , घरी धेनु होती तेव्हा तिच्या सोबत कोणीतरी असले पाहिजे म्हणून या कन्येला मागे ठेवून सर्व गावी गेले होते . विद्वान ब्राह्मणांना पाहून तिने त्यांना आसन दिले आणि क्षेमकुशल विचारून त्यांच्या माध्यान्हाच्या तयारीस लागली . साळी कांडताना तिच्या हातात असलेल्या बांगड्यांचा आवाज होऊ लागला . तेव्हा तिला वाईट वाटले . ह्या आवाजाने आपल्या पूर्वजाना दूषण येईल असा तिने मनात विचार केला. म्हणून तिने केवळ दोन दोन बांगड्या हातात ठेवल्या तरी त्यांचा आवाज होऊ लागला . कंकण विरहित हात ठेवणे शास्त्रात निषिद्ध आहे तेव्हा याचा विचार करून तिने केवळ एकेक बांगडी हातात ठेवली . यामुळे आवाजही झाला नाही आणि शास्त्राज्ञेचे पालनही झाले . या गोष्टीचा आधार घेऊन महाराज म्हणतात ,बहू जमता होई भांडण l दोघांचेही होई भाषण l एक असता ध्यान घडे ll
बहू जमता होई भांडण --- हे अगदी खरे आहे . स्व स्व पक्ष सिद्ध करताना किंवा आपले मत मांडताना आपण आपल्या आवाजाची पातळी ,समोरच्याची योग्यता ,मार्दव ,नम्रता सर्व विसरून बोलत राहतो . दोघे मित्रही असलो तरी विषयांना तोटा नसतो मात्र एक असताना ध्यान घडू शकते . शकते अशाकरिता म्हणतो आहे कि विषय चिंतनाची सवय असल्याने हे सहज शक्य होत नाही . दत्त महाराज हे सर्वांचे आचार्य तेव्हा त्यांनी ह्या विषयांपासून अभय द्यावे हि प्रार्थना करीत आहे .
अहो आचार्य नित्य काही घडू द्या तो निसर्गनियम आहे पण त्याचा उपयोग आपण दत्त महाराजांच्या लीला कुठे आणि कशा वर्णन केल्या त्याच्या स्मरणाकरता केला पाहिजे --- श्री गुरुदेव दत्त !!! अभय आचार्य