02/11/2025
*वैकुंठ चतुर्दशी ४ नोव्हेंबरला आहे*
वैकुंठ चतुर्दशी म्हणजे संप्रदायाच्या मर्यादा ओलांडून श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत...! या दिवशी श्रीविष्णूला बेल वाहिला, तरी चालतो आणि शिवाला तुळस वाहता येते. हे असे का ? .....
एकतर ही गोष्ट ‘हरि आणि हर’ म्हणजे ‘श्रीविष्णु आणि शिव’ यांच्यातील अद्वैत दाखवणारी आहे. दुसरे अध्यात्मशास्त्रीय कारण म्हणजे कालमाहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्रीविष्णूची पवित्रके, तसेच तुळशीमध्ये शिवाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्रीविष्णूला बेल वाहता येतो. ईश्वरप्राप्तीसाठी धडपडणाऱ्या भक्तांनी ‘शैव-वैष्णव’ भेदाच्या आधारे एकमेकांस विरोध करणे, हे त्यांची संकुचित वृत्ती आणि ईश्वराविषयीचे अज्ञान यांचे द्योतक आहे. हे अज्ञान दूर व्हावे, तसेच भक्ताने संकुचित वृत्तीचा त्याग करून म्हणजेच स्वसंप्रदायाच्या सीमा लंघून श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवावे, हाही या व्रताचा महत्त्वाचा उद्देश आहे... कारण ईश्वर हा संप्रदायांच्याच नव्हे, तर सर्वच बंधनांपलीकडे असतो.
स्वर्गमोक्षप्रदा ह्येषा शरीरारोग्यदायिनी ।
सुकलत्रप्रदा ह्येषा जीवत्पुत्रप्रदायिनी ।
न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम् ।
न चापि वैष्णवं क्षेत्रं तुल्यं हरिदिनेन च ।
*वैकुंठचतुर्दशी*
त्रिपुरारी पौर्णिमेचा आधिचा दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही चतुर्दशी 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात.वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात.
*या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असं मानलं जातं. या दिवशी चतुर्मासाची सांगता होते. या दिवशी रात्री शंकराची 1008 नावे घेऊन आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते. ज्यामध्ये भगवान श्रीशंकराला तुळशीपत्र आणि भगवान श्रीविष्णूंना बेलपत्र वाहले जाते.*
विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते. महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या शहरांमधील मंदिरांतसुद्धा 'हरिहर' पूजा केली जाते. ही पुजा मध्यरात्री केली जाते.
*वैकुंठ चतुर्दशी महत्त्व*
पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान विष्णु यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. यावेळी महादेवाने विष्णुची परिक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले. यावर भगवान विष्णु यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला.
विष्णुची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णुला वर दिला की, कार्तिक मासनंतर येणारी चतुर्दशी 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून ओळखली जाईल. जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल. या दिवशी महाभारत युध्दात ज्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे कृष्णाने श्राद्ध घातले होते. त्यामुळे या दिवशी श्राद्ध घालण्याचीही परंपरा आहे.
या दिवशी भगवान विष्णुची पुजा केली जाते. विष्णुला चंदन, फुलं, दुध, दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णुचा अभिषेक केला जातो. या दिवशी विष्णु नामस्मरण केलं जातं. विष्णुला गोड नैवद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो.
आपली संस्कृती
वैकुंठ चतुर्दशी व्रत म्हणजे, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे. गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही.
आज रात्री बारा वाजता महादेवाला तुळस आणि विष्णुला बेल व्हावा, आज हरीहर भेट झालेली आहे. आज पार्वतीने महादेव आणि विष्णूंना बसवून पूजा केली आहे, आज भस्मासुरा ला विष्णूने मोहिनी रूप घेऊन भस्मसात केले होते.
*हरिहर नमोस्तुते*🙏