समस्त वीरशैव लिंगायत समाजाला जाहीर विनम्र आवाहन!
================================
आगामी राष्ट्रीय जनगणना २०२३ च्या निमित्ताने भारतमातेचा पुत्ररूप समाज असलेल्या हिंदू वीरशैव लिंगायत समाजाने नेमकी काय भूमिका घ्यावी याचे सुस्पष्ट विवेचन करणारे आवाहन आम्ही सदरच्या पत्राद्वारे करत आहोत.
येत्या जनगणनेत, अनेक समाज समूहांना स्वतःच्या हिंदू असण्याचा विसर पडावा, यासाठी काही परक्या विचारांवर पोसलेल्या शक्तींकडून जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहेत. विविधतेतून एकता साधणाऱ्या भारतीय समाज समूहातील वैविध्यतेच्या मुद्यांना विद्रोहाचे साधन बनवणारा बुध्दिभेद सर्वदूर पसरवला जात आहे. हिंदू वीरशैव लिंगायत समाजातील काही गटांचे नेते अशा प्रकारच्या बुद्धिभेदाच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे समस्त वीरशैव लिंगायत समाज सध्या दोन प्रकारच्या अग्निदिव्यातून वाटचाल करत आहे. एका बाजूला 'वीरशैव' आणि 'लिंगायत' हे वेगळे आहेत, असे सांगून शब्दभेद करून समाजात उभी फाळणी घडवण्याचे पाताळयंत्री कारस्थान आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्राच्या मूळ प्रवाहापासून वीरशैव लिंगायत समाजाचा मोठा हिस्सा 'स्वतंत्र धर्म' म्हणून बाजूला काढण्याचे राष्ट्रविघातक षडयंत्र.
केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचा १३ जून २०१४ रोजीचा अभिप्राय राज्य शासनास पाठवला आहे. त्यात लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून हिंदू धर्माचा एक पंथ असल्याचे नमूद केले आहे. तसेच महारजिस्ट्रार (गृह मंत्रालय, केंद्र सरकार) यांनी १४ नोव्हेंबर २०१३ च्या पत्रान्वये लिंगायत हा हिंदू धर्माचा पंथ असल्याने,
२०२२ च्या जनगणनेनुसार लिंगायत समाजाची स्वतंत्र नोंद घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा व अल्पसंख्याक दर्जा देणे अनुज्ञेय नाही, असे राज्य सरकारनेही म्हटले आहे.
भारतीय राज्यघटनेत नवीन धर्म जन्माला घालण्याची किंवा कोणत्याही धर्माच्या अंतरंगात हस्तक्षेप करण्याची तरतूद मुळीच नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते २०११ पर्यंतच्या जनगणनेपर्यंत हिंदू वीरशैव लिंगायत समाजाने स्वत:चा धर्म नोंदवताना 'हिंदू' असाच नोंदवला आहे. हिंदू वीरशैव लिंगायत समाजाच्या पूर्वजांनीसुद्धा, त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक जनगणनेच्या वेळी स्वतःची नोंद हिंदू अशीच केलेली आहे. वर्षानुवर्षे वीरशैव लिंगायत समाज स्वत:ची नोंद हिंदू अशी करत आला असताना या समाजाला विशिष्ट भूलथापांच्या जंजाळात अडकवून वा समाजाची खरी ओळख मिटवू पाहणारे राष्ट्रविघातक प्रयत्न हाणून पाडण्याची निश्चित वेळ आता आली आहे.
या जनगणनेतसुद्धा समस्त वीरशैव लिंगायत समाज 'हिंदू' म्हणून स्वत:ची नोंद करण्याचा ऐतिहासिक परिपाठ दृढतापूर्वक आचरणात आणेल, याविषयी शंका नाही. हिंदू वीरशैव लिंगायत मंच या पत्रकाद्वारे आवाहन करत आहे की, आगामी जनगणना २०२२ च्या निमित्ताने प्रत्येक वीरशैव लिंगायत व्यक्तीने हिंदू धर्माच्या रकान्यात स्वतःची नोंद करावी आणि स्वत:च्या राष्ट्रभक्तीचा परिचय द्यावा.
समाजभक्ती हीच प्रेरणा, राष्ट्रभक्ती हे रूप तिचे । देशद्रोही निष्प्रभ होतील, दर्शन घडता शक्तीचे ।।
डॉ. शामा घोणसे शरद गंजीवाले डॉ. राजेंद्र हिरेमठ
(प्रांत मार्गदर्शिका) (प्रांत संयोजक) (प्रांत मार्गदर्शक)
🚩हिंदू वीरशैव लिंगायत मंच 🚩
(महाराष्ट्र प्रांत)