22/01/2026
प्रेसनोट:
सप्तशृंगगड येथील रहिवासी व ग्रामपंचायत सदस्या सौ बेबीबाई जाधव आणि श्री छगन जाधव यांनी मांडलेल्या विविध मागण्यांबाबत विश्वस्त संस्थेच्या वतीने संदर्भीय विषयांवर त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमणे बाबत मंगळवार, (ता. २०) रोजी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मा श्री अभय लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जाधव यांच्या निवेदनातील मागण्या व तक्रारीची सखोल चौकशी करण्यासाठी विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मा श्री अभय लाहोटी यांनी एक स्वतंत्र त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीमध्ये कळवणचे तालुका न्यायदंडाधिकारी, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, कळवण आणि ज्येष्ठ विधिज्ञ चैतन्य ब्राम्हणकर यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती आपला अंतरिम अहवाल ३० दिवसात सादर करणार असून, त्या अहवालानुसार पुढील नियमांतर्गत कारवाई केली जाणार आहे. ट्रस्टच्या वतीने विश्वस्त तथा कळवणचे तहसीलदार श्री रोहिदास वारुळे व विश्वस्त ॲड. ललित निकम यांनी उपोषणस्थळी जाऊन या निर्णयाचे अधिकृत पत्र उपोषणकर्त्यांना सुपूर्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार विश्वस्त मंडळ प्रतिनिधी यांनी उपोषणकर्त्यांशी त्यांच्या विविध मागणी व तक्रारी बाबत सकारात्मक व नियमांतीक निर्णय होवून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, विश्वस्त संस्थे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी उपोषण कर्ते यांना तूर्तास उपोषण मागे घेणे बाबत विनंती करण्यात आलेली आहे.